

Indian Economy 1700
esakal
शेफाली वैद्य
ब्रिटिशांच्या भारतातल्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या तीनचार दशकांतच हे चित्र पूर्णपणे बदललं, नव्हे पद्धतशीरपणे बदलवण्यात आलं. एखादी भरभराटीत असलेली अर्थव्यवस्था जेव्हा अशी अचानक वेगाने आकुंचन पावायला लागते, तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात, पण त्यातले सर्वांत मोठे कारण असते त्या अर्थव्यवस्थेचा कुणीतरी जाणीवपूर्वक, ठरवून मोडलेला कणा!
अठराव्या शतकाच्या प्रारंभी भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होती. प्रख्यात आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, डॉ. अँगस मॅडिसन यांच्या ‘काँटुअर्स ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी’ या ग्रंथात त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार इसवी सन १७०० मध्ये जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा सुमारे पंचवीस टक्के होता, तब्बल एक चतुर्थांश! भारताच्या आर्थिक समृद्धीचा कणा इथली वस्त्रकला होती. भारतात विणले जाणारे कापड जगभर निर्यात व्हायचे. इथल्या कापडाचे पक्के, चमकदार रंग, तलम सुती आणि रेशमी धागे, वेगवेगळ्या आकर्षक डिझाइन्स हे सारेच जगभर प्रसिद्ध होते. इतक्या हजारो वर्षांमध्ये भारतामध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली होती, पण इथली वस्त्रकला जागतिक बाजारपेठेत आपले स्थान टिकवून होती.