

Santiniketan Art Journey
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
केरळमधल्या के. एस. राधाकृष्णन यांनी कलाशिक्षणाचे धडे गिरवले ते शांतिनिकेतनमध्ये. पैशापेक्षा जनतेसाठी कला हाच मूलमंत्र त्यांनी तिथे आत्मसात केला. प्रत्येक कलााकार स्वतःसाठी काही प्रतीके निवडतो. राधाकृष्णन यांना असा माणूस अचानक सापडला. पुढे तो त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत उमटत गेला. राधाकृष्णन यांच्या कामात पुन्हा पुन्हा पुढे येणारा विचार म्हणजे त्याची जनता कलेवरील श्रद्धा. कलाकृती लोकांची झाली पाहिजे, असे त्यांना वाटते.
पावसामुळे भिजलेल्या एका पोस्टकार्डामुळे के. एस. राधाकृष्णन शांतिनिकेतनला पोहोचले. तिथे ते जे शिकले त्यामुळे शिल्पकला आणि कला ही जनतेसाठीच आहे फक्त भिंतीआड नव्हे, अशी श्रद्धा जीवनभर राहिली. ‘ते पूर्णपणे भिजलेलं होतं; तारखेशिवाय बाकीचं सगळं धुऊन गेलं होतं,’ राधाकृष्ण यांना अजून आठवते. केरळातील त्यांच्या घरी ते पोस्टकार्ड पोहोचले, ते दिवस मान्सूनचे होते. ते पत्र होते शांतिनिकेतनमधील प्रवेशासंबंधी. पावसामुळे बाकीचा मजकूर दिसत नव्हता. फक्त मुलाखतीची तारीख तेवढी स्पष्ट होती. आज पन्नास वर्षांनंतरही राधाकृष्णन यांना सारे आयुष्य ढवळून टाकणारा तो विलक्षण क्षण आठवतो.
१९७० च्या दशकात ते ऐन तरुण असताना आपण पुढे काय करायचे याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांच्या काकाने त्यांना चित्रे काढायला शिकवले होते. सदासर्वदा हा तरुण चित्रे काढत असे. ते त्यांना सहजी जमत असे. चित्रकार व्हायचे हे उघड होते परंतु शांतिनिकेतनच का? ‘मी जेमतेम अठरा वर्षांचा होतो. आज मला लोक विचारतात, मी कसं ठरवलं ते. मी त्या प्रश्नाचं नीट उत्तर देऊ शकेन असं वाटत नाही. गेलंच पाहिजे असं मला वाटलं हे मात्र खरं!’ या सहज घेतलेल्या निर्णयामुळे ते अशा जागी पोचले की शांतिनिकेतन हे फक्त आर्ट स्कूल राहिले नाही.