जटायूसाठी आशेचा किरण

भारतातील गिधाडांची संख्या १९९० च्या दशकात अगदी ९९ टक्के इतकी खाली घसरली होती.
jatayu bird
jatayu birdsakal

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

पुराणातील जटायू संकटात सापडले असताना एक चांगली बातमी आली. जटायू म्हणजेच या गिधाडांना विषमुक्त खाद्य मिळावे, यासाठी भारत सरकारच्या औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने दोन घातक औषधांच्या वापर, निर्मिती व विक्रीवर बंदी सुचविली आहे. ही बाब जटायूंच्या संरक्षणासाठी लाखमोलाची ठरणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश आहे.

भारतातील गिधाडांची संख्या १९९० च्या दशकात अगदी ९९ टक्के इतकी खाली घसरली होती. त्यामुळे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी डॉ. विभू प्रकाश यांच्या नेतृत्वात गिधाडांच्या संख्येतील घसरणीमागची कारणे शोधली.

गुरांना आजार झाल्यावर डायक्लोफेनाक नामक वेदनाशामक औषध दिले जाते. ते शरीरात राहून या गुरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जगणाऱ्या गिधाडांच्या शरीरात जाते. त्यामुळे गिधाडांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.

त्यामुळे मग बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी हरियानामधील पिंजोर, आसाममधील रानी, मध्य प्रदेशातील भोपाळमधील केरवा धरण, पश्चिम बंगालमधील राजाभातखावा अशा चार ठिकाणी या गिधाडांना वेदनाशामक औषधमुक्त स्वच्छ खाद्य मिळण्याची व्यवस्था केली.

त्याच वेळी बीएनएचएसने भारत सरकारच्या मदतीने २००६ मध्ये डायक्लोफेनाक या वेदनाशामक औषधाच्या गुरांच्या रोगांवरील वापरावर बंदी आणली. येथील राज्य सरकारांच्या मदतीने या चार राज्यांमध्ये बीएनएचएसने गावस्तरावर हा बंदीआदेश पोहोचविला.

गिधाडांचे बंदिस्त प्रजनन करून त्यांची संख्या वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळाले. गिधाडांची संख्या त्यामुळे देशात वाढू लागली. त्यामुळे आज या चार केंद्रांवर सुमारे ७५० गिधाडे आकाशात पुन्हा विहार करण्यासाठी वाट बघत आहेत.

परंतु जटायूंना संपविणारे फक्त डायक्लोफेनाक हे एकच वेदानाशमक औषध नव्हते. असेकलोफेनाक, केटोप्रोफेन अन्‌ निमसुलाइड ही औषधेही गिधाडांसाठी डायक्लोफेनाकसारखीच घातक होती. त्यासाठी मग बीएनएचएसने भारत सरकारच्या औषध तांत्रिक सल्लागार मंडळाकडे पाठपुरावा केला. त्याला नुकतेच यश आले.

या मंडळाने आपल्या १० मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या तीनपैकी असेकलोफेनाक व केटोप्रोफेन या दोन औषधांच्या वापर, विक्री व निर्मिती यावर बंदी सुचविली. ही फार मोठी उपलब्धी मानली जात आहे. यानंतर भारत सरकार लवकरच या आशयाची अधिसूचना जारी करेल, असा अंदाज आहे.

२००६ मध्ये बीएनएचएसने डायक्लोफेनाक औषधाच्या गुरांच्या रोगांवरील वापरावर बंदी आणली. तेव्हापासून संस्थेने हरियाना, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यांमधील गुरांची औषधे विकणाऱ्या दुकानांचे नियमितपणे सर्वेक्षण सुरू ठेवले.

सोबतच या राज्यांमध्ये ६०० ते ७०० मेलेल्या गुरांच्या मांसाचे सर्वेक्षण करून त्यात डायक्लोफेनाकचे काही अंश मिळतात काय, यावरही अभ्यास केला. ते आढळले नाहीत, तर त्या प्रदेशाला जटायू सुरक्षित प्रदेश म्हणून घोषित केले गेले.

बंदिवासात वाढलेल्या गिधाडांना आता निसर्गात मुक्त करण्याचे बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व आसाम येथील काही व्याघ्र प्रकल्पांची निवड करण्यात आली.

पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३१; तर हरियानामध्ये आठ गिधाडांना निसर्गमुक्त करण्यातही आले आहे. त्यांच्यावर उपग्रहाच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येत आहे. आकाशातून फिरत ते नजीकच्या देशात गेल्यास त्यासाठी भुतान, नेपाळ, बंगलादेश येथील पक्षी शास्त्रज्ञांसोबतही समन्वयाने काम सुरू आहे.

नुकतेच यातील चार जटायू नेपाळ व भुतान येथे पोहोचल्याचे आढळून आले. यातील एका जटायूचा वीजप्रवाह लागून मृत्यू झाला. असे असले, तरी यातील निसर्गात मुक्त केलेल्या एकाही जटायू पक्ष्याला विषबाधा झाली नाही, हे विशेष!

मेलेल्या प्राण्यांवर जगणारे आमच्या देशातील जटायू नामशेष व्हायला निघाले, ही चिंतेची बाब आहे. पुराणात संपाती आणि जटायू या दोन गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायूने सीतामातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे.

तेव्हापासून गिधाडांना हिंदू धर्मासह अनेक धर्मांमध्ये विशेष स्थान मिळाले आहे. पारसी समाजातही प्रेतांना पुरल्याने किंवा जाळल्याने निसर्गाची हानी होते, प्रदूषण होते, असा समज आहे. त्यामुळे या समाजामध्ये प्रेतांना दफन करण्यापेक्षा निसर्गातील गिधाडांना खावू देण्याची प्रथा होती.

त्यासाठी पार्थिवावर अखेरचे संस्कार करण्यासाठी मुंबईजवळ डोंगरवाडी जंगलात एका उंच टेकडीवर पारसी टॉवर ऑफ सायलेन्स बांधण्यात आले. येथे मृत्यूनंतर गिधाडांना खायला पार्थिव ठेवले जायचे.

एकाचवेळी साधारणतः २५० पार्थिव ठेवण्याची व्यवस्था या खुल्या दालनात होती; पण सुरुवातीस गिधाडे येणे कमी झाल्याने व नंतर बंद झाल्याने पारसी समाजास अडचण निर्माण झाली. गिधाडे येत नसल्याने मग पारसी समाजाला १९८० च्या दशकात येथे सौरऊर्जेवर चालणारे कॉनसंट्रेटर लावावे लागले; पण ते प्रेत नष्ट करण्यास गिधाडाएवढे प्रभावी नव्हते.

शिवाय कावळ्यासारख्या पक्ष्यांना त्याच्या आवाजाने त्रास होतो. जे काम गिधाडे अगदी काही तासांत करायचे त्यास आता काही आठवडे लागतात. त्यात मुंबई आता खूप पसरली. शहरातील टोलेजंग इमारती अगदी या ठिकाणाच्या आसपास पोहोचल्या.

काही इमारातींवरून आता हे ठिकाण दिसू लागले, तर प्रेतांची दुर्गंधीही या इमारतींमध्ये येऊ लागली. हे पाहता आता एक टॉवर बंद करण्यात आले आणि दुर्गंधी टाळण्यासाठी एक हवा शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले; तरीही हे कृत्रिम उपाय कुचकामी ठरत आहेत.

अशीच काहीशी व्यथा देशभर मरणाऱ्या गुरांचीही आहे. मरणाऱ्या गुरांना गावाशेजारी फेकून देण्यात येते. या गुरांचे मृतदेह विविध रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. गिधाडांचे स्वच्छतेचे काम करणे बंद झाल्याने पृथ्वीवरील मनुष्य व इतर प्राण्यांपुढे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.

याचा विपरीत परिणाम होऊन निसर्गचक्रातील उंदीर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता कुचकामी कृत्रिम उपाय आखण्यापेक्षा गिधाडांचे संरक्षण व संवर्धन करून त्यांची संख्या वाढविणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीने गेल्या तीन दशकांपासून जोरदार पयत्न चालविले आहेत.

पांढऱ्या पाठीची गिधाडे ही संपूर्ण जगात सर्वत्र सहज दिसून यायची. महाराष्ट्र, आसामसह इतर राज्यांमध्ये वीस वर्षांपूर्वी ही गिधाडे मोठ्या संख्येत दिसायची. झाडावर घरटी करून ती अंडी द्यायची.

लांब मानेची गिधाडे ही गंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेपासून पश्चिम बंगालच्या पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर आढळून येतात. ते उंच डोंगराच्या कपारीमध्ये घरटी करून अंडी घालतात. ही मातकट बदामी रंगाची गिधाडे या दगडांच्या रंगात मिसळून जातात. पांढऱ्या पाठीची आणि लांब मानची गिधाडे तशी वर्षभर दिसतात.

हिवाळ्यात त्यांच्या सोबतीला हिमालयीन गिधाडे दिसायची. आज पांढऱ्या पाठीची आणि लांब मानेची ही दोन्ही गिधाडे अति संकटग्रस्त झाली असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यासोबत हिवाळ्यात दिसणारी हिमालयीन ग्रीफोनही जवळपास संकटग्रस्त झाली आहेत.

युरेशीयन ग्रीफॉन ही आपल्याकडे हिवाळ्यात स्थलांतर करून येणारी प्रजाती आहे. ते आकाराने आपल्याकडील हिमालयीन ग्रीफॉन एवढेच मोठे असतात; परंतु त्यांच्या गर्द रंगाची चोच, काळे पाय आणि राखाडी रंगामुळे ते इतर गिधाडांपेक्षा अधिक सुंदर दिसतात.

दाढीधारी गिधाड हे हिमालयात आढळून येणारे गिधाड आज जवळपास संकटग्रस्त झाले आहे. याच्या चोचेजवळ असणाऱ्या पिसांच्या पुंजक्यामुळे त्याला दाढीधारी गिधाड (बिअरडेड गिधाड) असे म्हणतात. अगदी चितळसारख्या भक्ष्याची टणक अशी हाडेसुद्धा तो खावू शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य!

अशी हाडे तो आकाशात उंच नेऊन खडकावर आपटतो आणि मग फुटलेल्या हाडातील बोनमेरो खातो. इजिप्शियन गिधाड (संकटग्रस्त) आणि सिनेरस गिधाड (जवळपास संकटग्रस्त) हीसुद्धा आपल्याकडे आढळून यायची. आता या सर्वच गिधाडांच्या संख्येत प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

असेक्लोफेनाक व केटोप्रोफेन या दोन औषधांच्या वापर, विक्री व निर्मिती यावर या मंडळाने बंदी सुचविली असल्याने आता देशातील जटायूंच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. हे सर्व करताना निमसुलाइड या औषधाला का सोडून दिले ते समजणे कठीण आहे; पण उपरोक्त दोन औषधांच्या बंदी आदेशामुळे देशातील जटायूची संख्या निश्चित वाढेल, अशी अपेक्षा आहे.

(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरणसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com