रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण; पण...

रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण; पण...

रंगपंचमी हा सण बहुतांश ठिकाणी साजरा केला जातो. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी साजरी केली जाते. त्यापूर्वी येणाऱ्या धुलिवंदनच्या सणापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

द्वापरयुगात गोकुळात बाल कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर (मित्रांवर) पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असतात. हे करत असताना उन्हाचा तडाखा कमी होत असतो. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.

थंडावा मिळावा म्हणून अंगावर पाणी

रंगपंचमी हा सण मुख्यत: वसंत ऋतूशी संबंधित आहे. या सणाला विशेष असे महत्त्व आहे. हा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची परंपरा आहे. 

होळीशी संबंधित गायली जाते गीतं

देशातील काही भागात या सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष असे महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. उत्तर प्रदेशातील व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेतात, असे मानले जाते. त्यामुळे याला धार्मिक महत्त्व आहे. 

रंगोत्सव, होलिकोत्सव प्रकार

भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतीयांमध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते.

दोन ते पाच दिवस केला जातो साजरा

होळी आणि रंगपंचमी या सणाला विशेष असे महत्त्व आहे. इतर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजराही केला जातो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

नैसर्गिक पदार्थापासूनही केले जातात रंग

रासायनिक रंगांपासून होणारे धोके पाहता नैसर्गिक रंग वापरले जात आहेत. याचे प्रमाणही आता वाढले आहे. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. तसेच फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,  हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.

इतिहासात आहे दाखला

भगवान श्रीकृष्णाने मथुरा आणि वृंदावन येथे गोप-गोपींसह रंगपंचमी खेळल्याचे प्रमाण (दाखला) आहे. त्यावरची काव्ये आणि चित्रे चांगलीच लोकप्रियही आहेत.

गाव स्वच्छ करण्याचा उद्देश

रंगपंचमीच्या मागचा उद्देश चांगला होता. त्या निमित्ताने ग्रामस्वच्छता होत असे. तसेच गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न युवकांकडून केला जात होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com