Lal bahadur shastri jayanti: संवेदनशील साधेपणा...

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखले जाते
Lal bahadur shastri jayanti: संवेदनशील साधेपणा...
sakal

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या शास्त्री यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. मात्र अतिशय मृदू स्वभावाच्या लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानला कठोर धडा शिकवला होता. १९५६ मध्ये रेल्वेमंत्री असताना रेल्वे अपघात झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या साधेपणाचे किस्से सांगितले तर आजच्या पिढीला असा माणूस होऊन गेला यावर विश्वासही बसणार नाही. लाल बहादूर शास्त्री यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार दिवंगत कुलदीप नय्यर यांनी ‘बियाँड द लाईन’ या त्यांच्या आत्मचरित्रात लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे, सुसंस्कृतपणाचे अनेक किस्से लिहिले आहेत.

अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ अर्थातच ‘नाम’चे अधिवेशन इजिप्तची राजधानी कैरो येथे आयोजित करण्यात आले होते. भारत त्यावेळी ‘नाम’ राष्ट्रांच्या चळवळीचे नेतृत्व करत होता. या अधिवेशनाला भारताकडून स्वत: पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित राहिले. या दौऱ्यात त्यांचा मुक्काम हिल्टन या जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. मात्र शास्त्रींना बाहेरचे जेवण आवडत नसायचे. म्हणून त्यांनी सोबत एक छोटासा स्टोव्ह नेला होता. ते हॉटेलवर परतल्यानंतर स्टोव्हवर जेवण बनवायचे. कुलदीप नय्यर तेव्हा यूएनआयचे रिपोर्टर म्हणून तो दौरा कव्हर करत होते. त्यांना शास्त्रीजींचे हे साधेपण विलक्षण भावले. भारताचा पंतप्रधान स्वत:चे जेवण स्वत: बनवतो, अशी बातमी केली. मात्र प्रत्यक्षात या बातमीमुळे शास्त्रीजी अडचणीत आले. भारताच्या पंतप्रधानांच्या या कृतीने हॉटेलच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचे सांगत, हिल्टन हॉटेल व्यवस्थापनाने शास्त्रीजींना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. मात्र इजिप्तचे तत्कालीन पंतप्रधान नासेर यांच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण थांबवले.

वीज वाचवण्यासाठी काळोखात

कामराज योजनेमुळे मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी जुंपण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांचीही मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला कुलदीप नय्यर गेले. बंगल्यात पूर्णपणे काळोख होता. लाल बहादूर शास्री दिवाणखान्यात बसले होते. केवळ तिथलेच लाईट सुरू होते. दिवे का बंद केलेत, हा प्रश्न विचाल्यावर शास्त्रीजींनी उत्तर दिले. ‘‘आता मी मंत्री राहिलो नाही. हे वीजबिल मलाच भरावे लागेल. ते मला कुठे परवडणार? त्यामुळे आवश्यक तेवढी वीज मी वापरायचे ठरवले.

अतिरिक्त खर्चासाठी स्तंभलेखन

लाल बहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घरखर्च भागवणे कठीण जात असायचे. त्यावेळी खासदारांना पगारही तुटपुंजा होता. घरात कार्यकर्त्यांची कायम वर्दळ, त्यामुळे घरखर्चाला अतिरिक्त पैसे कसे जमवायचे, या विवंचनेत शास्त्रीजी होते. त्यावेळी कुलदीप नय्यर यांनी त्यांना चार वर्तमानपत्रांत स्तंभलेखन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकांत स्तंभलेखन करायचे. त्यातून त्यांना महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे दोन हजार रुपये मिळायचे. त्यातून त्यांचा अतिरिक्त घरखर्च भागायचा.

राजभवनात गेले नाहीत

लाल बहादूर शास्त्री केंद्रीय गृहमंत्री असताना जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित या त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. त्यावेळी बहुतांश केंद्रीय मंत्री मुंबईत आले की राजभवनात थांबत असायचे. विजयालक्ष्मी पंडित यांनी नेहरूंना पत्र लिहून राजभवनाचे रूपांतर डाक बंगल्यात केल्याची तक्रार केली. गृहमंत्री असल्यामुळे शास्त्रींना या तक्रारीची एक प्रत मिळाली. शास्त्री यांना खूप दु:ख झाले. त्या दिवसापासून त्यांनी राजभवनावर थांबायचे नाही, असं ठरवलं. त्यानंतर मुंबईत आल्यावर कितीही वेळ होवो, शास्त्री आणि त्यांचा स्टाफ विमानतळावर थांबायचे. त्याचा खूप त्रासही होत असायचा.

मृत्यूनंतर बँक बॅलेन्स शून्य

तत्कालीन एकसंध सोव्हियत रशियाचे महत्त्वाचे शहर असलेल्या ताश्कंदच्या दौऱ्यावर असताना लाल बहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र गृहमंत्री, पंतप्रधानसारख्या सर्वोच्च पदावर गेलेल्या, शास्त्रींचा बँकबॅलेन्स अगदी शून्य होता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते कामराज यांनी कुलदीप नय्यर यांना फोन करून शास्त्रींच्या पश्चात आर्थिक परिस्थितीबाबत विचारणा केली. शास्त्रींजीनी आयुष्यभरात काहीच कमावले नसल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारित करून शास्त्रीजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानाची पेन्शन त्यांच्या पत्नीला लागू केली.

असाही साधेपणा

केंद्रीय गृहमंत्री म्हणून ते एकदा रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी लेनिनग्राड शहरात ते रशियन बोल्शेई बॅले ग्रुपचा शो पाहायला गेले. मात्र त्या शोदरम्यान ते खूप अस्वस्थ होते. तेव्हा कुणीतरी त्यांना विचारले, ‘‘शास्त्रीजी, तुम्ही कम्फरटेबल आहात का?’’ त्यावेळी ते म्हणाले, ‘‘माझी पत्नी बाजूला बसली आहे. आणि त्या नृत्यांगनांनी तोकडे कपडे घातले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघताना मला जरा अवघडल्यासारखे वाटतंय.’’

मीना कुमारीला ओळखले नाही

एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी त्यांच्या ‘पाकीजा’च्या फिल्म सेटवर लाल बहादूर शास्त्रीजींच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केला. ‘पाकीजा’च्या अभिनेत्री मीना कुमारी या त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर होत्या. कमाल अमरोही यांनी शास्त्रीजींचे स्वागत केले आणि त्यांना मीना कुमारी यांच्यावर एक छोटेखानी भाषण देण्याची विनंती केली. मात्र देशात प्रचंड लोकप्रिय असलेल्या मीना कुमारीबद्दल शास्त्रीजींना काहीच माहिती नव्हते. त्यांनी हळूच कुलदीप नायर यांना या अभिनेत्रीचे नाव काय आहे, हे विचारले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मीना कुमारी यांचे नाव आयुष्यात पहिल्यांदा आज ऐकल्याची जाहीर कबुलीही त्यानी दिली.

vinod.raut@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com