तीन नंबरचा पक्ष सत्तेत अन् एक नंबरचा...

congress-shivsena-ncp logo
congress-shivsena-ncp logo

राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, हे वाक्य अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर अगदी खरे आहे, हे कोणीही सांगू शकेल.  

विधानसभा निवडणूकीत तीन नंबरची मतं मिळवणारा पक्ष सत्तेत तर एक नंबरची मतं मिळवणारा पक्ष विरोधात बसणार आहे. राजकारणात काहीही घडू शकते अथवा घडवले जाऊ शकते, हे खरे ठरले आहे. या घडामोडींचे आपण साक्षीदार ठरलो आहोत. विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या 105 जागा, शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादी काँग्रेसने 54, काँग्रेस 44, मनसे 1 तर अपक्षांच्या 28 जागा आल्या. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधीही केला. पण, राजकारणात काहीही घडू शकते, हे मात्र खरे.

भाजपचा मित्र पक्ष शिवसेना भाजपपासून दुरावला गेला आणि तिथेच भाजपला पहिली ठेच बसली. पण, एक नंबरचा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता मिळवण्यासाठी पाऊल उचलायला सुरवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला अन् तिथेच महाराष्ट्राचे राजकारण फिरले.

महाराष्ट्र साखर झोपेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी वर्तमानपत्र वाचण्यापूर्वीच शिळे झाले. घराच्या किचनपासून ते फाईव्हस्टार हॉटेलपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकापासून ते मोठ-मोठ्या पदव्या घेणाऱे सर्वच जण राजकीय घडामोडींवर चर्चा करू लागले. ठिकठिकाणी पैजाही लावल्या जाऊ लागल्या. दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकारणाशिवाय दुसरे काही घडतच नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

वृत्तवाहिन्यांवर तर या घडीची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, सूत्रांकडील माहिती क्षणाक्षणाला दाखवली जात होती. राजकीय घडामोडी वेगाने घडत होत्या. प्रत्येकजण पाहात होता. जाणून घेत होता. सर्व काही विसरून घडामोडीत सहभागी होत होता. प्रत्येक क्षणाची घडामोड हातामधील मोबाईलवर जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता.

राज्यात वेगाने घडणाऱया राजकीय घडामोडींचे प्रकरण अखेर न्यायालयात गेले. न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले होते. न्यायालयाने निकाल दिला अन् राजकीय वातावरण निवळू लागले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींचा अंदाज आला. अजित पवार यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आणि राजकारण काय असते, हे अनुभवायाला मिळाले.

राजकीय घडामोडीत एका दगडात अनेक पक्षी मारले गेले अथवा नाही, याचे अंदाज अनेकांनी बांधले वर्तवले. पण, एक नंबरचा पक्ष विरोधात आणि तीन नंबरचा पक्ष सत्तेत आला. यालाच राजकारण म्हणातात, हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com