रोज रोज झुरत मरण्यापेक्षा 'कोरोना' झाला तरी चालेल पण...

corona
corona

पुणे : कोरोना व्हायरसने आपल्या राज्यात अक्षरश: थैमान घातले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या हजारावर पोहचली आहे. या आजाराचा परिणाम आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बांधकाम मजुर, फेरीवाले, घर काम करणाऱ्या मोलकरणीसह ज्यांचे हातावर पोट आहे त्या सर्वांना बसला आहे. लॉकडाउन असल्याने ज्या लोकांकडे काम केले, त्यांच्याकडूनही पैसे मिळत नसल्याने उसनवारी व उधारी चुकवण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न या सर्वांना पडला आहे. बांधकाम मजुर, फेरीवाले, घर काम करणाऱ्या मोलकरणी शहरात कोणी रोजंदारीवर तर कोणी महिन्यावर काम करणारे आहेत. काही मजुरांना ठेकेदार महिन्याभरासाठी रोजंदारीवर बोलावतात, तर काही रोजंदारीवर काम करतात. महिनाभरासाठी हे जितके दिवस कामावर येतील तितक्या दिवसाचा पगार त्यांना दिला जातो. मात्र, सध्या कामेच बंद असल्याने सर्वांवरच घरी बसण्याची वेळ आली आहे. पुढे काम आणि पैसे मिळणार आहेत, या आशेवर अनेकांनी उधार-उसनवारी केली आहे. आता ते पैसे कसे चुकवायचे, हा प्रश्न आहे. सध्या काही संस्था, संघटना मोफत शिधा वाटप करीत आहेत. मात्र, ही मदत सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय हे संकट केव्हा टळणार, काम परत कधी सुरु होणार याची सगळ्यांना भीती आहे. 

सगळ्यात भीषण स्थिती हि आहे की,  घर काम करणाऱ्या महिलांची. या परिस्तिथीचा आढावा 'इसकाळ'ने  घेतला आहे. घरकाम करणाऱ्या महिलांची घरगुती अडचणी, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिला इतरांच्या घरी जेवण बनवण्यासाठी आणि धुनी-भांडी करण्यासाठी जातात. पण काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळेच घरकाम करणाऱ्या महिलांना घरीच बसावे लागत आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी घरीच बसण्यास सांगितले. अशावेळी नेमके काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेक घरकाम करणाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

सोलापूर शहरामधील काम करणाऱ्या सुनंदा काटगावकर म्हणाल्या की, घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. दुसऱ्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिला आजवर उपेक्षित राहिले आहेत. त्यात कोरोना व्हायरसमुळे आमच्या कामावरही त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपले घर कसे चालणार... आपला उदरनिर्वाह कसा होणार... असा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे. घरकाम करणाऱ्या महिला त्यांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यातच काही महिला लांबून जेवण बनवण्यासाठी किंवा घर कामासाठी जात असतात. या महिला वेगवेगळ्या भागात फिरून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नागरिकांनी आमच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या अडचणी वैयक्तिक आणि घरगुती असल्या तरी कोणीही ऐकून घेत नाही. यावर मार्गदर्शन होत नाही. 

पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला सतावत आहे

 याच शहरात काम करणाऱ्या अनिता रोहिटे म्हणाल्या कि, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसमुळे आमच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आम्हाला काही दिवस सुट्टी घेण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आता आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला सतावत आहे. मुंबई, पुण्यासारखे संकट इकडे गंभीर नसले तरी कोरोनाच्या भीतीने मालकाने आम्हाला काम बंद करण्यास सांगितल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

 'कोरोना' झाला तरी चालेल पण काम मिळायला पाहिजे

 पिंपरी चिंचवडमधील घर काम करणाऱ्या संध्या पाटील म्हणाल्या कि या कोरोनामुळे माझ्या संसाराचं सारं गणितच बिघडून गेले आहे. गेल्या महिन्यात वीस बावीस दिवस काम केले होते म्हणून कामाचे पैसे मिळाले. चालू महिन्यात घरी बसून असल्यामुळे एक रुपयाही हातात येणार नाही. माझे पती आणि मुलगा रोजंदारीवर काम करतात तेही घरीच असल्यामुळे अवघड झालं आहे. घरातील गरजा भागवण्यासाठी काही गोष्टी दुकानदार, दूधवाला यांच्याकडून उधार आणायचो. गेल्या महिन्यातील उधारी चुकवली तरी दुकानदार आता माल देत नाही. दुकानदार म्हणतो कि आता तुम्ही तिघांकडे काम नाही. पैसे कोठून देणार. घरात असणारे खाण्यापिण्याचे सामान चार पाच दिवस टिकेल एवढंच आहे. रेशन दुकानांवर स्वस्त सामान देण्याची सरकारने व्यवस्था केली आहे. असं त्यांना सांगितल्यावर संध्या म्हणाल्या कि ते दुकान कधी उघडतं तर कधी नाही. उघडलं तरी नंबर येईपर्यंत सामान संपून जाते. चकरा मारून मारून पायाचे तुकडे पडले. आमच्याशी बोलताना शेवटचं वाक्य असं काही बोलल्या कि त्यांच्याबरोबर आमच्या डोळ्यात पाणी आलं. संध्या पाटील म्हणाल्या कि याचा खूप कंटाळा आलाय असं वाटतंय कि कोरोना झाला तरी चालेल पण काम मिळायला पाहिजे. रोज रोज झुरत मरण्यापेक्षा काही दिवस व्यवस्थित खाऊन मेलेलं काय वाईट.  

मालक काय म्हणतात? 

ही परिस्थिती अजून काही दिवस कायम राहिल्यास काय होऊ शकते याचा छोटासा हा अंदाज आहे. ज्या लोकांकडे घरकामासाठी महिला येतात आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या महिलांचा सहानुभूतीनं विचार करून चालू महिन्याचा पगार देणार का ? हा प्रश्न विचारला. यावर बोलताना पुण्यातील राजेश शिंदे यांनी सांगितले, कोरोना हा संसर्गातून पसरतो. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते आमच्यामध्येही आहे. आम्हीही आमच्या घरकाम करणाऱ्या बाईला सुट्टी घेण्यास सांगितले आहे. राहिला प्रश्न पगाराचा तर आमचाही पगार अजून झालेला नाही कधी होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही इच्छा असूनही पैसे देऊ शकत नाही. हिच अवस्था ज्यांच्याकडे घर कामाला बाई आहे त्यांनी सांगितले. हि परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहे पण ते पुरेसे पडत नाही. आता खरी गरज आहे ती म्हणजे तुम्ही आम्ही मिळून सहानुभूतीने विचार करण्याची.  शेवटी काय तर आलेले हे संकट लवकरात लवकर जाईल अन सगळं पूर्ववत होईल हि अपेक्षा करूयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com