वैभवसंपन्न ‘जागतिक वारसा’

भारताच्या पर्यटन क्षेत्रात ज्या भागाला सुवर्ण त्रिकोण म्हणजेच ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटलं जातं, त्या दिल्ली-आग्रा-जयपूरपैकी एक जयपूर सर्वांत जास्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.
City Palace, Jaipur
City Palace, Jaipursakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

भारताच्या पर्यटन क्षेत्रात ज्या भागाला सुवर्ण त्रिकोण म्हणजेच ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटलं जातं, त्या दिल्ली-आग्रा-जयपूरपैकी एक जयपूर सर्वांत जास्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करते. दिल्ली, आग्र्याला भेट देणारा पर्यटक आवर्जून जयपूरसुद्धा बघतो. मध्ययुगातील मोजक्याच नियोजनबद्ध निर्मिती केलेल्या शहरांपैकी एक म्हणजे जयपूर शहर.

भरपूर संग्रहालयं, प्रचंड प्रमाणात ऐतिहासिक वास्तू, आजूबाजूला बरेच किल्ले, मोठा इतिहास असलेले राजवाडे , कपडे आणि दागिन्यांची बाजारपेठ, जगप्रसिद्ध मिष्टान भांडारं या गोष्टी जयपूरला देशातील सर्वांत प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत नेऊन ठेवतात. शहरात असलेल्या उत्कृष्ट वास्तुशैलीतील अनेक इमारतींमुळं २०१९ मध्ये युनेस्कोनं जयपूरला जागतिक वारसा शहर घोषित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळं इतिहासप्रसिद्ध पावलेले मिर्झा राजे जयसिंह, त्यांचा मुलगा रामसिंह हे इथल्या कछवाह राजपूत घराण्यातले राजे, रामसिंहचा मुलगा जयसिंह (दुसरा) यानं जयपूर शहराची स्थापना केली. त्यापूर्वी राजधानी अंबर अथवा आमेर नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यावर होती. आजूबाजूला तीन किल्ले आणि भव्य तटबंदीने वेढलेल्या जयपूरची निर्मिती ही मराठा साम्राज्याचा जो प्रचंड विस्तार झाला होता त्याचा आमेरला असलेला धोका ओळखून झाल्याचं सांगण्यात येतं. राजघराण्याचं निवासस्थान असलेलं ‘सिटी पॅलेस’ हे शहराच्या येणाऱ्या पर्यटकांच्या आर्कषणांचा केंद्रबिंदू आहे.

१७२७ मध्ये सुरू झालेल्या बांधकामात, राजघराण्यातील पुढच्या पिढ्यांनी १९४९ पर्यंत भर घातली. राजस्थानमधील जुन्या शहरांमध्ये असणाऱ्या मुख्य राजवाड्याला अथवा मुख्य जुन्या शहरात प्रवेश करताना भव्य दरवाजांची निर्मिती केली जायची. तसेच दरवाजे सिटी पॅलेसला सुद्धा आहेत. शहराच्या विविध भागांमधून प्रवेश करण्यासाठी राजेंद्र पोल, वीरेंद्र पोल, उदय पोल हे दरवाजे आहेत. पोल म्हणजे दरवाजा.

सिटी पॅलेसच्या मोठ्या भागाचे रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आलं असून अत्यंत देखणं असं संग्रहालय आहे. वस्त्र दालन, शस्त्र दालन, चित्र दालन, मुबारक महाल, चंद्र महाल, सभा निवास, सर्वतो भवन असे संग्रहालयाचे विविध विभाग आहेत. आवड असेल तर संपूर्ण दिवस येथे जातो.

सिटी पॅलेस वास्तुकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे, याचे उदाहरण म्हणजे `स्किडमोर, ओविंग अँड मेरील`या वास्तू रचनाकारांनी सिटी पॅलेस येथील मयूर दरवाजापासून प्रेरणा घेऊन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल २ ची अंतर्गत रचना केली.

एक प्रकारे शहराचाच भाग असणाऱ्या जवळच्या टेकड्यांवर एका बाजूला आमेर आणि जयगड हे किल्ले आहेत तर दुसऱ्या बाजूला नहार गड हा किल्ला आहे. आमेर हा राजधानीचा किल्ला होता आणि जयपूरच्या स्थापनेनंतर सुद्धा अनेक वर्ष वापरात असल्याने किल्ल्यावरील ८० टक्के वास्तू अजूनही शाबूत आहेत. हा किल्ला ‘जागतिक वारसा स्थळ’ असून दररोज सरासरी पाच हजारापेक्षा जास्त पर्यटक हा किल्ला बघण्यासाठी येतात.

किल्ला चार मुख्य प्रांगणांमध्ये विभागलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला लाइट आणि साउंड शो दररोज सायंकाळी दाखवला जातो. किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास ध्वनिप्रकाश योजनेतून अमिताभ बच्चन यांच्या निवेदनातून समजावून सांगण्याचा उत्तम प्रयत्न वाटला. आमेर किल्ल्याजवळ असलेल्या चील का टिला नावाच्या डोंगरावर जयगड किल्ला आहे.

आमेरपासून जयगडला जाण्यासाठी मोठा भुयारी मार्ग आहे. मध्ययुगीन काळातील जगातील सर्वांत मोठी हलवता येणारी तोफ या जयगड किल्ल्यावर आहे. इथल्या गाइडकडून या तोफेच्या सुरस कहाण्या ऐकायला मिळतात. गमतीचा भाग म्हणजे प्रत्यक्षात ही तोफ कोणत्याच लढाईत वापरण्यात आलेली नव्हती. हा किल्ला अजूनही राजघराण्याच्या मालकीचा आहे.

जयपूरमध्ये अजून एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मिर्झा राजा जयसिंह, रामसिंह यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आलेला संबंध, स्थानिक लोक असतील किंवा ऐतिहासिक स्थळे दाखवणारे गाइड असतील अथवा आजूबाजूच्या राजघराण्यातील लोक असतील, आवर्जून सांगतात.

सिटी पॅलेसप्रमाणं जयपूर शहराच्या अगदी मध्यभागी असलेलं अल्बर्ट हॉल संग्रहालय येथील विविध शस्त्रांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या विविध भागांत अनेक राजवाड्यांची निर्मिती राजघराण्याकडून झाली. त्यातील प्रसिद्ध म्हणजे जलमहाल आणि हवामहाल. गुलाबी शहर अथवा ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आधी गुलाबी अजिबात नव्हतं.

१८७६ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा हा जयपूरला भेट देणार असल्यानं त्यानिमित्तानं शहर गुलाबी केलं गेलं आणि नंतर नवीन घरांना सुद्धा तोच पायंडा पडला.

पूर्वीच्या काळात आसपासचे राजे-राजवाडे आणि सरदार घराण्यातील लोक जयपूरला कामकाजासाठी येऊन राहिले आणि त्यांनी त्यांचे राजवाडे मुख्य राजवाड्याच्या अवतीभवती बांधले. आज यातील अनेक राजवाड्यांचं रूपांतर आलिशान हॉटेल्समध्ये आणि संग्रहालयांमध्यं झालंलं आहे. जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलपैकी एक, रामबाग पॅलेस ४७ एकरमध्ये पसरलेलं असून हे या राजवाड्यांपैकीच एक आहे.

सिटी पॅलेसमधून बाहेर पडल्यावर लगेचच इथले मोठे बाजार आहेत आणि या बाजारांना जोडणारे ३०० बाय ३०० फुटांचे भव्य चौक आहेत. या चौकांना चौपार असे म्हणतात. सध्या सर्वांत प्रसिद्ध खरेदीसाठी असलेला बापू बाजार असला, तरी सुद्धा पूर्वी फक्त चार मुख्य बाजार होते. जोहरी बाजार, किशन पोल बाजार, गंगोरी बाजार आणि सिरेह देवरी बाजार.

जयपूरच्या पूर्वांपार चालत आलेल्या रत्नशाळा जगप्रसिद्ध असून अजूनही जगभरातून मोठे उद्योगपती, राजघराणी मौल्यवान रत्न व दागिने खरेदीसाठी जोहरी बाजारात येतात. शोभेच्या वस्तूंची सुद्धा मोठी बाजारपेठ येथे आहे. जयपूरची मिष्ठान्न भांडार परंपरा अतिशय जुनी असून काही दुकानांचा इतिहास तर तीनशे वर्षांपेक्षा जुना आहे. त्यातील लक्ष्मी मिष्ठान्न भांडारमध्ये एकाच छताखाली राजस्थानमधील विविध भागातील मिठाईचे प्रकार चाखता येतील.

जयपूरच्या आसपासचा पन्नास किलोमीटर परिघातील परिसर सुद्धा अतिशय सुंदर असून इतिहासप्रेमींनी, खाद्यप्रेमींनी वेळ काढून भेट द्यावी असा आहे. अलवर, बिशनगढ, कनोटा या ठिकाणांचं आवर्जून नाव घेता येईल. कनोटा येथील पॅलेस सुंदर असून येथील संग्रहालयामध्ये काही जगावेगळी गोष्टी आहेत. ठाकूर अमरसिंह यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जगभर फिरून देशोदेशींच्या पाककृतींच्या तब्बल ४४ खंडांची निर्मिती केली.

ज्यामध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त पाककृती आहेत. यातील काही मोजके पदार्थ तुम्हाला येथील पॅलेसमधील रेस्टॉरंटमध्ये चाखता येतील. जयपूरच्या आसपासच्या जंगलात पूर्वीच्या काळी राजघराण्यातील लोक आणि त्यांचे सरदार शिकारीसाठी जात असत, त्या वेळी राहण्यासाठी त्यांनी आसपासच्या भागात हंटिंग लॉज बांधलेले होते, ज्यांना स्थानिक भाषेत शिकारबाडी असंही म्हणतात.

रामगढ, झलना, सरिस्का हे प्रसिद्ध हंटिंग लॉज आहेत. जयपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. हा परिसर बघण्यासाठी बराच वेळ हाताशी हवा, म्हणूनच या शहराला धावती भेट टाळा, जितकं हळूहळू तुम्ही जयपूर बघत जाल, तितक्या विविध गोष्टी हे शहर तुम्हाला उलगडून दाखवेल.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, त्यांचा भर साहसी पर्यटनावर असतो.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com