ते थोडं बघा बेसिकली, आमचा language चा जरा problem आहे.. तसं म्हटलं तर आमची mother tongue मराठी आहे, पण तरी मराठीशी पूर्ण comfortable आहोत असंही म्हणता येत नाही, अन् मराठी पूर्ण परकीही म्हणता येत नाही.
म्हणजे लहानपणापासून मराठी as such कधी शिकलोच नाही नं.. म्हणजे असं hardcore म राठी.. आम्ही एकतर ICSE, CBSE, किंवा स्टेट बोर्डात शिकलेलो.. त्यात कॉर्पोरेशनच्या सरकारी शाळांमध्ये शिकण्याचा प्रश्नच येत नाही.. आम्ही सारे मग private semi English किंवा fully English medium शाळांमध्ये भरती झालो.
त्यात mathematics अन् science ध्ये निम्मा वेळ संपायचा.. घरी मार्क आधी विचारले जाणार maths science अन् English चेच.. मराठीचं तर textbook म्हणजे हे आपलं, पाठ्यपुस्तकसुद्धा maths- science- English च्या निम्म्याहून अर्ध.. पूर्ण इंग्रजीवाल्या शाळांमध्ये तर आम्हाला चौथीपर्यंत मराठी शिकवतच नाहीत..
बघ बघ,
घर बघ,
आई घर बघ..
हा पूर्ण इंग्रजीवाल्यांना पाचव्या वर्गात येणाऱ्या मराठी या विषयाचा पहिला घडा.
हसन चल,
कमल चल,
भरभर चल..
हा दुसरा धडा. जोडाक्षरं वगैरे आम्हाला साधारण सहावीत शिकवतात. त्यात जोडाक्षरं नेमके लिहायचे कसे, हे कळायला आमची सातवी उजाडते.
ती देवनागरी का काय ती लिपी म्हणजे आणखी एक अवघड भानगड. पेपरमध्ये मार्क पाडायचे म्हणजे पटपट लिहायला नको? पाचवीची पहिली टर्म साधारण वरील दिलेल्या धड्यांवर आधारित प्रश्नाची तीन शब्दांच्या एका वाक्यात उत्तरं लिहिण्यात साधारण सुखात जाते. दुसऱ्या टर्मपर्यंत आमच्या कोर्सची मजल साधारण आठ-आठ शब्दांच्या दोन वाक्यांच्या उत्तरापर्यंत जाते. सहावीच्या शेवटच्या टर्ममध्ये जोडाक्षरं introduce झाल्यामुळे संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा असा एक पाच मार्कांचा प्रश्न येतो. तोही सुटतो कसा बसा. पण मराठीचा खरा राग सातवीपासून येऊ लागतो. देवनागरी लिपी काय इंग्रजीतल्या cursive writing सारखी थोडीच आहे, की एकदा ठेवला पेन कागदावर की उचलायची गरजच नाही. शिवाय या cursive writing ची वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून शाळेत सवय लावलेली असते. मराठी हा विषयच उशिरा आलेला, त्यात त्या देवनागरीतल्या असंख्य काना, मात्रा, वेलांट्या अन् देवनागरीत लिहिताना तरी कितीतरी वेळा पेन उचलावं लागतं, या कशाचीच सवय नसल्यामुळे पेपर लिहिताना वेळ अपुरा पडतो. जगात पुढं नोकरीधंदा मिळवायला आम्हाला लागणार इंग्रजीच, त्यात मराठी हा स्कोअरिंग विषयही नाही, म्हणून मराठीची आणखीनच घृणा वाटू लागते. दहावीनंतर कशी बशी ती मराठी नावाची ब्याद पाठून सुटतेच अखेर.
मग काय, नंतरच्या आमच्या so called professional जगात, knowing fluent English compulsory अशी अट आम्हाला अनेक जागी घातली जाते. मित्रमैत्रिणी मराठी असो किंवा अमराठी त्यांच्याशी बोलताना आम्ही जाणून हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो, कारण इंग्रजीचं इम्प्रेशन friend circle ध्येही खास पडतं ना! Internship वगैरेंच्या मुलाखतींमध्ये तर इंग्लिशच बोलावं लागतं. आमच्या सोशल मीडियाची भाषाही इंग्रजीच आहे, चुकीचे का होइना, पण caption आम्ही इंग्रजीतच टाकतो.. मग त्या मराठीचं करायचं काय.. ती बाबा, आजोबा, आई, आजी, यांच्याशी संवाद साधायलाच तर तेवढी लागते.
विज्ञान शाखेच्या साऱ्यांचाच मराठीशी फारसा संबंध येतच नाही, कला शाखावालेही मग वेगळे विषय निवडतात, मराठीच्या वाट्याला फारसं कुणी जात नाही. तरीही कधी मधी येतो असा एखादा वेडा दाराशी, कळकळीनं दार ठोठावतो.. त्या बोअर माणसाला दाराशी पाहिलं की वैताग होतो. अवघड शब्दांत काहीबाही बरळत बसतो.. कुसुमाग्रज, बोरकर, दांडेकर, मर्ढेकर, तेंडुलकर, संत, भागवत, जी. ए, पु.ल, कोल्हटकर, ग्रेस, ढसाळ, नेमाडे, अशी काहीबाही अवघड नावं घेत घेत बोलत सुटतो.. शाळेत मराठी दिवसाच्या कार्यक्रमात या कुसुमाग्रजांचं नाव तेवढं ऐकलं आहे.. पण हे बाकी सारे कोण.. काही कळेनासं होतं, अन् मग त्याची बडबड ऐकता ऐकताच गुंगी येते. जाग आली की तो वेडा नाहीसा झालेला असतो. त्या वेड्याची दारावरची थाप आताशा ओळखीची झाली आहे.. तो वेडा दार ठोठवायचं बंद करेल काही दिवसांत या खात्रीनं, तशी थाप ऐकू आली की आताशा आम्हीच दरवाजा उघडायचा बंद केला आहे...