होरपळ बालमनांची (मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर)

mohana prabhudesai jogalekar
mohana prabhudesai jogalekar

अमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं वळणाऱ्या विद्यार्थ्यांची मनं ओळखायला त्यांचे पालक कमी पडत आहेत का याकडंही लक्ष देणं भाग आहे.

"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला,''... मैत्रिणीचा फोन आला, तेव्हा मी गाडी चालवत होते. रेडिओवर आमच्या गावातल्या, शार्लटमधल्या विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरू झाली आणि पोटात गोळाच आला. तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथंच शिकायला आहे. ती सुखरूप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची मुलं तिथं शिकायला- त्यामुळं नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हती. विद्यापीठाच्या आवारात जायला- यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे टेक्‍स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळं या हल्ल्यात कमी जीवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले, तर चार जण जखमी झाले. या दोन जणांपैकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकऱ्यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीनं मारेकऱ्याला जमिनीवर लोळवलं, तिथं असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकऱ्याला त्यांनी धरून ठेवलं; पण पडता पडता मारेकऱ्यानं झाडलेल्या गोळीत रायली मृत्युमुखी पडला. एकवीस वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरून येतात, शब्द अपुरे पडतात. "पळा', "लपा' किंवा "धैर्यानं मारेकऱ्याचा सामना करा' ही तीन सूत्रं हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातल्या रायलीनं निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई- वडिलांना आश्‍चर्य वाटत नाही. तसंच त्याला ओळखणाऱ्या सर्वांनाच. त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनंही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास साश्रूनयनांनी उभे होते. अमेरिकेन जनतेपुढची ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. यूएनसीसीमध्ये घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. सातवीत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्यानं वर्गातल्या बाकावर लिहिलं ः ""I`ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses.`` मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्‍यं वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्यानं लिहिलेल्या या संदेशाचं कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल, तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते; पण त्याच दरम्यान फ्लोरिडा राज्यातल्या शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते- त्यामुळंच परिणामही. झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही मुख्याध्यापकांनी दिली. त्याचाच परिणाम म्हणून तीन दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे. सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडं पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशा वेळेस पालकांना मन घट्ट करून अशी परिस्थिती उद्‌भवली, तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो. "कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं,' या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणीव वेदनादायी असते; पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्दैवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमांतून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का? सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनांमुळं शाळांना यावर कडक कारवाई करणं भागच आहे; पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का? अशा घटना घडल्या, की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदुका सोपवायला हव्यात, या अंतिम निष्कर्षाप्रतही बऱ्याचदा खूप जण येतात. मात्र, शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

हातात बंदुका येतात कशा?
मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्यानं वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यांत 21 ही वयोमर्यादा झाली आहे; पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ साठ टक्के विद्यार्थ्यांनी "बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते,' अशी कबुली दिली आहे. बऱ्याचदा घरातल्या मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते. कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळं बंदूक वापरली जाते, तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बऱ्याचदा आधीच कुणाच्या तरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातली बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते; पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. बेछूट गोळीबार करून ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे, तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करून हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. सन 2007 मध्ये व्हर्जिनिया पॉलीटेक्‍निकमध्ये झालेल्या गोळीबारात 32 मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलानं आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठं कमी पडली हे पाहून त्याप्रमाणं नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

माहितीचा अभाव
सन 2012 मध्ये सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली वीस चिमुरडी मुलं आणि सहा शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. मात्र, या वेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नवीन आणि त्या दिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्यानं! कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे, त्याप्रमाणंच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच; पण ज्या वर्गातली मुलं बळी पडली त्यातल्या एका वर्गात शिक्षिका नवीन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिनं वर्गाचं दार लावण्याऐवजी प्रथम मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलानं दार उघडलं. मुलं कुठं आहेत या त्याच्या प्रश्नावर तिनं वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलानं तिच्यावर गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयानं थरकाप उडाला. मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली आणि बंदूकधारी मुलानं बेछूट गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला, काहींनी जीव गमावला. दुसऱ्या वर्गात फक्त त्या दिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्दैवानं तिच्याकडं दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातल्या सर्व बाबी योग्यं तऱ्हेने अमलात आणल्यामुळं इतर वर्गातली मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातल्या बहुतेक मुलांचा अंत झाला. अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत; पण याची सुरवात झाली ती 20 एप्रिल 1999 रोजी. कोलोरॅडो राज्यातल्या लिटीलटन कोलंबाईन हायस्कूलमध्ये दोन तरुणांनी बेछूटपणे केलेल्या गोळीबारात 13 मुलं मारली गेली, तर 30 हून अधिक जखमी झाली होती. यानंतर अनेक राज्यांत शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथं जिथं जीवितहानीचं प्रमाण जास्त आहे, त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत सात हजारहून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्त्वाचा उपाय नॅशनल रायफल असोसिएशनच्या (एनआरए) वर्चस्वामुळं आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळं दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची. मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे- "मार्च ऑफ अवर लाइव्ह्ज' (March of Our Lives). गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनीच सुरू केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्‍चय करून प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे. सरकारनं या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत. शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्रीअगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुऱ्या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे. "मार्च ऑफ अवर लाइव्ह्‌ज' ची अलिकडची चित्रफित हृदयद्रावक आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरू होताना दाखवलं आहे. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचाऱ्यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफीत पाहणाऱ्यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी! ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते सांगताना दाखविली आहे. शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेनं सांगितलेल्या खालील ओळींनी.
Lockdown, lockdown let`s all hide,
Lock the doors and stay inside,
Crouch on down, don`t make a sound,
And don`t cry or you;ll be found

"जनरेशन लॉकडाऊन' असं या चित्रफितीचं नाव आहे. अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबत कायदा करण्याऐवजी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच राजकारणी समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडं बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का, त्या मुलांचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता का लागत नाही, याकडंही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर नक्की उपाय काय हे काळच ठरवेल; पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरितच राहणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com