#MokaleVha चूक माझी की तुझी?

Mokale-Vha
Mokale-Vha

मिलिंद, मुग्धा अगदी खुशीत दिसत होते. काय-काय सांगू, असे झाले होते. मला एक वर्षापूर्वी माझ्याकडे आलेले मिलिंद, मुग्धा आठवले. धुसफुसत, चिडचिड करत दोघेही क्‍लिनिकमध्ये आले होते. या दोघांना मी खूप आधीपासून ओळखत होते. दोघेही उच्चशिक्षित, समंजस, चांगले करिअर असणारे होते. दोघांच्या घरचे वातावरणही सुसंस्कृत होते. परंतु लग्नाला ५-६ महिने होतात तोच भांडण, अबोला असे कलहनाट्य सुरू झाले. दोघांना यासाठी सल्ला हवा होता. 

त्यांची एकमेकांच्या तक्रारी सांगण्याची अनुक्रमणिका सुरू होती. दोघांचा रागाचा आवेश ओसरेपर्यंत मी शांत राहिले. मग म्हणाले, ‘‘एकेकाने बोला. स्वतःची अडचण सांगा.’’

दोघांनीही आरोप प्रत्यारोप करत दुसरा कसा चुकतो, ते सांगितले. थोडक्‍यात अजून त्यांनी लग्न मनाने स्वीकारले केले नव्हते. लग्नानंतर जसे शारीरिक बदल होणार तसेच मानसिक बदलही होणार, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दोघांची फरफट होत होती. ‘‘मला सांगा, अगदी तुमच्या घरासारखेच वातावरण तुमच्या मित्रमैत्रीण, शेजारी, नातेवाईक यांच्याकडे असते का?’’ 
‘नाही. प्रत्येक घरात थोडाफार फरक असतो.’’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘लग्नानंतर दोन कुटुंब एकत्र येतात. पण या दोन्ही घरांना स्वतःचा चेहरा असतो. म्हणजे त्या कुटुंबाच्या बोलण्याच्या, खाण्याच्या, वावरण्याच्या अशा सवयी असतात. त्यामुळे या सवयी समजून घ्यायला पाहिजेत. नात्यांना रुळायला, रुजायला वेळ द्यायला हवा. सतत तुलना, टीका यामुळे गैरसमज होतात आणि अस्वस्थता येते. मिलिंद, मुग्धा नवीन आहे, हे लक्षात घेऊन तू तिला घरात रुळायला मदत करायला हवीस. ती आता तुझ्या घरातील सदस्य आहे, हा विश्वास द्यायला हवा.’’ 

‘हो, खरे आहे. काही वेळेस आम्ही गैरसमज करून टोकाचे बोलतो. शब्दाने शब्द वाढतो आणि सगळे बिनसते.’’ 
‘कोणीच १००% परफेक्‍ट नसते. तेव्हा तुम्हाला एकमेकांचे जे गुण भावतात त्यांनी तुम्हाला तुमचे स्वतःचे घरटे बनवायचे आहे. यासाठी एकमेकांना समजून घ्या. रोज १० मिनिटे तरी संवाद साधा. एकमेकांची प्रशंसा करा.’’ ‘आमच्या ऑफिसच्या वेळा अशा आहेत की, बरेचदा आम्हाला बोलायला वेळ मिळत नाही.’’ 
‘वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. जाणीवपूर्वक प्रयत्न करा. तुमच्या भाषेत हा task आहे, असे समजा.’’ 
‘पण मतभेद होतात त्याचे काय?’’ 
‘आपले आई-वडील, भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्याशीही आपले मतभेद होतात ना तसेच हे पण स्वाभाविक आहे. फक्त आपापले अहंकार बाजूला ठेवा. दुसऱ्याच्या मनोभूमिकेतून विचार करा. यातून मध्य मार्ग निघेल, जो दोघांना मान्य असेल.’’ 

‘राग आला, चिडचिड झाली तर काय करणार?’’
‘आपण कुकरची वाफ मुरल्यावर कुकर उघडतो, नाहीतर हातावर गरम वाफ येऊन हात भाजतो. तसेच आपला पारा चढला असेल तेव्हा थोडावेळ शांत राहावे. आवेग ओसरला की योग्य दिशेने विचार सुरू होतात. लग्नात ‘नांदा सौख्यभरे’ असा आशीर्वाद देतात. त्याचा अर्थ आहे, ‘दोघांनी मिळून परिवारामध्ये सौख्य निर्माण करा.’ सहजीवन म्हणजे जो जसा आहे तसा स्वीकारणे. एक वरचढ एक खाली असे नाही तर दोघेही समान आहेत. स्वतःची स्पेस जपा, पण तसे करताना दुसऱ्याच्या स्वत्वाला धक्का लावू नका. आर्थिक व्यवहार स्वतंत्र ठेवलेत तरी एकमेकांना माहिती द्या. गैरसमज वेळच्यावेळी बोलून दूर करा. नात्यात मोकळा संवाद, विश्वास, एकमेकांचा बिनशर्त स्वीकार ही त्रिसूत्री लक्षात ठेवा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com