#MokaleVha दोन ओळींमधले अंतर

#MokaleVha दोन ओळींमधले अंतर

सोळा वर्षांचा ओजस मला सांगत होता, ‘प्लीज माझ्या बाबांना सांगा, मी काहीही म्हटले तरी त्यांना प्रॉब्लेमच असतो. मला सांगा मॅडम, मी आता मोठा झालोय ना! मग मला काही कळतच नाही का? का बाबा सतत मागे लागतात? वैतागून घरातून निघून जावेसे वाटते.’ तसा तो समंजस आणि गुणी मुलगा; पण थोडा वैतागून, चिडून बोलत होता.

मी म्हणाले, ‘सात दिवस थांब. बाबा म्हणतील तेच फक्त कर. मग आपण पुन्हा भेटू.’ तो ‘हो’ म्हणून गेला.

दरम्यान, त्याच्या बाबांशी बोलले, ‘मुलगा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चिडचिडा, उद्धट, रागीट झालाय, असे म्हणता! मग यावर ‘असे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारला का?’
त्यावर त्याचे बाबा त्याच्या करिअरबाबत जास्त संवेदनशील दिसले. आसपासची मुले संगतीने कशी शिक्षण सोडून वाम मार्गाला लागली व चांगले मार्ग सोडल्याचा दाखला देऊ लागले. माझे बाळ गुणी आहे; पण वाया जाऊ नये म्हणून जाणीव करून देतोय म्हणाले. ‘कमावतो ते त्याच्यासाठीच. त्याने माझ्याही पेक्षा मोठा ऑफिसर व्हावे, असे मला वाटते....’ अशा बऱ्याच अपेक्षा बोलून झाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सात दिवस तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे वागू द्या त्याला. कुठलीही अपेक्षा न करता, काहीही न बोलता. 
आठव्या दिवशी दहा मिनिटांच्या फरकाने वेगवेगळ्या वेळेला दोघांना बोलावले.
ओजस आला. ‘बाबा मला एकदाही रागावले, ओरडले नाहीत. मला आनंदी बघून उलट खूष झाले. मला माझ्या आवडीनिवडी विचारून मनमोकळे बोलले. माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मला प्रवेश घेण्याबाबत आणि फी लागली तर भरूया, या शब्दांनी विश्वासाने खांद्यावर हात ठेवला. आत्मविश्वास वाढवला,’ असे म्हणत ओजसच्या डोळ्यांत पाणी दाटले.

तो गेल्यानंतर थोड्या वेळाने बाबांना बोलावले, ‘बोला काय बदल?’
‘मॅडम, आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर विचार केला. त्याला जाणीव आहे, तो संस्कार विसरला नाही. त्याची अनुभव कमी असणारी वाट, त्याची कौशल्ये, आवड पाहून त्याने निवडलेल्या त्या वाटेवर लक्ष देण्याचे काम फक्त मला करायचे होते. विश्वासाचा हात दिला, तर त्याने घट्ट मिठी मारली.’

त्यांना समजावत मी म्हणाले, ‘प्रत्येक पालकाने थोडातरी विश्वास ठेवून वयात येणाऱ्या अपत्याला त्यांचे छोटे आभाळ द्यावे. आपण मात्र दुरून काळजीपूर्वक लक्ष ठेवावे, त्याच्याही नकळत. आपल्या खांद्यावर विसावलेले मूल उद्या त्याच्या भक्कम खांद्यावर जबाबदारी उचलेल आणि तुम्ही मनोमन विसावलेले असाल! आता त्यांना डगमगताना सावरावे, पसरले तर आवरावे. दोन ओळींमध्ये वयाचे, एका पिढीचे, विचारसरणीचे अंतर असते. अशावेळी हक्काने संवाद करायचा. बघा वाक्य पूर्ण होता होता, आयुष्याचे पान अर्थपूर्ण होऊन जाईल.’

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com