

डॉ. अनघा केसकर - saptarang@esakal.com
निलू निरंजना यांचे मृणालिनी चितळे यांनी लिहिलेले ‘निलू निरंजना : गोष्ट हिची पृथ्वीमोलाची’ हे चरित्र म्हणजे केवळ घटनाक्रमाच्या आधारे लिहिलेले पुस्तक नाही. ओघवत्या शैलीत केलेले हे लेखन म्हणजे एका कर्तृत्ववान व्यक्तीची यशोगाथा आहे.
पहिल्या प्रकरणात निलू यांनी नोकरीत भूषवलेली अत्त्युच्च पदे, त्यांनी बदललेली एक्याऐंशी घरे, त्यांच्यावर अकारण झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यातून पुन्हा त्यांचे जिद्दीने उभे राहणे या गोष्टी आहेत. स्पेस शटल प्रोग्राम, पाण्याखाली बोगदे बांधायचे काम, अणुऊर्जा प्रकल्प अशा कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या ‘असाइनमेंट्स’ निलू यांनी जगभरातील अनेक देशात जाऊन कशा केल्या, हे समर्पकपणे मांडण्यात आल्या आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी निलू लाम्पोक गावी असताना रोपवाटिकांमुळे सुशोभित दिसणारं हे फुलांचं गाव दोन वर्षात कसं वसलं आणि नंतर कसं ओसाड झालं ही कहाणी लेखिकेने नेमक्या शब्दांत चित्रित केली आहे.
‘कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग’ सारख्या क्षेत्रात वावरताना अतिशय जोखमीची कामे निलू यांनी पार पाडली. मात्र, या प्रवासात त्यांना पुरुषी अहंकाराचेही अनेक अनुभव आले. अशा प्रसंगी कधी विनोदाची झालर लावत, तर कधी शिस्तीचा बडगा दाखवत त्या प्रत्येकाशी जुळवून घेत निलू यांनी काम केले.