त्या गोळ्या अन् तो काळ गेला कुठं...

वरशाच्या सुरवातीला सण याचा त्यो २६ जानेवारी... यादिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं न्ह्याय ह्ये म्हायती हुतं पण तितकंच महत्वाचं कायतरी हाय आस वाटायचं...
Bullock
Bullocksakal

वरशाच्या सुरवातीला सण याचा त्यो २६ जानेवारी... यादिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं न्ह्याय ह्ये म्हायती हुतं पण तितकंच महत्वाचं कायतरी हाय आस वाटायचं... पोरा पोरींची एकमेकांच्या हाताला धरून गावातन प्रभात फेरी निगायची... हात धरणारी आवडती आसंल तर फेरी बी संपू नये असं वाटायचं, नसलं तर ती जिथं आसल तिकडं लक्ष्य आसयच... घोषणा दिवून घसा दुकायचा... पण शाळेत आलं की चार आण्याला चार आश्या चार गोळ्या भेटायच्या म्हणून घोषणा कमी करायचो न्हाय ...आता त्यो २६ जानेवारी काय ते कळलं पण त्या गोळ्या कुठं गेल्या, ह्ये कळलं न्हाय...?

मार्चमधी रंगपंचमी याची... रंग घ्याला पैसे नसायचं, पिचकारी कुणाकुणाकडंच आसायची.. तव्याचं काळ, हळदी कुंकू... असले रंग करून तोंडाला फासयचो... न्हायतर नुसतंच पाणी घिवून माग लागायचं... दिवसभर आन खाल्लंय का पाणी पेलय कळायचं न्हाय...कोण कोण तर तोंड बघून ओळखायचं न्हाय, एवढा रंग त्यला लावल्याला असायचा... गुलाल तर दोन दोन दोन दिवस कानामाग तसाच घिवून शाळेत जायला लागायचं...दुपारच्याला ह्या असं जाऊन हिरीत उड्या टाकायच्या तवा कुट पंचमी थांबायची..!आता रंग इकत घेता यतुय पायजे एवढा, पण दिवसभर फिरणारी दोस्त कुठं गेली कळत न्हाय..?

एप्रिलमधी गुडीपाडवा याचा... आदल्या दिवशी कळाक आणण्यापासन नुसती पळापळ... आबा आदल्या दिवशी तालुक्याला जाऊन घाटी आणायचं... गुडी उभी करायला सगळ्यात आधी कोण उठतंय आन सगळ्यात उंच गुढी कुणाची जातीया हे बघायला मज्जा याची... आधी सारवाण मग गुडीभवती रांगुळी, भीतीवर शेणाचं पांडव.. जेवणात पुरणाची पुळी खायच्या आधी कडुलिंबाचा वाटल्याला पाला खाताना तोंड कसंतरीच हुयाच... मग संध्याकाळी गुढी खाली घितली की घाटीवर तुटून पडायचो.. कुणाच्या वाट्याला आखी तर कुणाच्या वाट्याला आर्धी घाटी याची... आता घाटी तशीच दोन दिवस पडून त्याला मुंग्या लागत्यात ही घाटीसाठी भांडणारी भावंड गेली कुठं?

जुलैमधी येतो बेंदूर, शेतकऱ्याचा पयला आन हक्काचा सण... आदल्या दिवशी वड्यातन बैल धून आणायची... वावरातन माती आणून बारक बैल करायच...सकाळी पहाट उटून घरातल्या मोट्या बैलांवर झुल चढवायची...शेतीच्या कामात दोस्तासारखं साथ देणाऱ्या बैलाची जंगी मिरवणूक काढायची... ढोल लिझिम खेळत गावच्या पाराला यडा काढायचा.. बैलांच्या मागनं पोर वरडत नुसती गलका करत पळायची... मिरवणूक काढून बैल पुन्हा घराकडं याची ...घरी निवून बैलास्नी ओवाळणी द्यायची.. घास भरवायचा आन मग आपुन घास घ्याचा...त्यो पार आजुनबी तिथंच हाय मग ती बैल गेली कुटं ?

ऑगस्टमधी येती नागपंचमी..! गावाबाहेरनं कुनीतरी मातीचा नाग बनवून आणायचा... कव्हातरी त्यो हितच मंदिराच्या बाहेर बनवायचा जुन्या गावात.. नागाची एक दगडी मूर्ती हाय.. पोर त्याला आडातलं पाणी आणून धून पुसून घ्याची.. दिवसभर पोरी निवद दाखवायला याच्या... माडीवर नींबुळया घिवून बसलेली पोर नेम धरून त्या पोरीसनी टिपायची... त्या दिवशी पोरीसनी उलटं कायबी बोलता यायचं न्हाय...त्येनंच्याबर रागातच का व्हयना एवडीचं काय ती नजरानजर व्हायची... आता ती नागाची मूर्ती तशीच हाय.. झाडावर निंबुळया वाळून खाली पडायला लागल्या, मग त्या निवद दावायला येणाऱ्या पोरी गेल्या कुटं...?

( सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ ‘ यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com