

Nuremberg Movie
esakal
सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळताना कधी सदसद्विवेक बुद्धीला स्मरून स्वतःला प्रश्न विचारावेसे वाटले का? स्वतःची नैतिक जबाबदारी काय असते? नोकरी करताना बांधिलकी आलेला आदेश पाळण्याची असते की देशातील सर्वसामान्य नागरिकांवर आपण अन्याय करत आहोत, त्यामुळे तो आदेश झुगारून द्यावा असे का वाटले नाही? सत्ताधाऱ्याचा आदेश महत्त्वाचा की मानवतेचा दृष्टिकोन?
नाझी नेतृत्वाखालच्या जर्मनीने महायुद्धामध्ये अनेक देशांवर आक्रमणे केली, ज्यू धर्मीयांचा अतोनात छळ केला, अनेकांची हत्या केली. जर्मनीने सोवियत युनियनवर केलेल्या आक्रमणामध्येच अडीच कोटी लोकांचा मृत्यू झाला. जर्मनीने ८ मे १९४५ रोजी शरणागती पत्करली. १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शस्त्रे म्यान केली आणि २ सप्टेंबर १९४५ रोजी दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धात सर्वसाधारणपणे सात कोटी माणसांचा मृत्यू झाला. जर्मनीमध्ये सामूहिक हत्याकांडामध्ये (holocaust) किमान ६० लाख ज्यू धर्मीयांचा बळी घेतला. अशा या नरसंहारी महायुद्ध समाप्तीनंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सोवियत युनियन अशा देशांनी एकत्रित येऊन महायुद्धाला जबाबदार असणाऱ्या जर्मन अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा, असे ठरवले. २० नोव्हेंबर १९४५ ते १ ऑक्टोबर १९४६ या कालावधीमध्ये न्युरेंबर्ग (जर्मनी) येथे जर्मनीमधील २२ नाझी अधिकाऱ्यांवर खटला दाखल करून न्यायालयीन सुनावणी झाली. जर्मनी शरणागतीचा अंदाज येताच ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केली, त्यानंतर जोसेफ गोबेल्सने (१ मे), हेन्रीच हिमलरने (२३ मे) आणि किमान ६० जर्मन नेत्यांनी अटक होण्यापासून सुटका होण्यासाठी स्वतःचे जीवन संपवण्यासाठी तोच मार्ग पत्करला. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त इतर २२ जणांवर खटला दाखल करण्यात आला. न्युरेंबर्ग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खटल्यावर आधारित याच नावाचा चित्रपट नुकताच प्राइमवर उपलब्ध झाला आहे.