गर्भपात, बाई आणि समाज

‘माझं शरीर, माझा हक्क’ ही घोषणा सध्या अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर ठरवण्यात आल्यानंतर निनादत आहे.
Abortion
AbortionSakal
Summary

‘माझं शरीर, माझा हक्क’ ही घोषणा सध्या अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर ठरवण्यात आल्यानंतर निनादत आहे.

‘माझं शरीर, माझा हक्क’ ही घोषणा सध्या अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर ठरवण्यात आल्यानंतर निनादत आहे. या अनुषंगाने असंख्य गोष्टी आहेत ज्यावर चर्चा होण्याची गरज आहे. भारतात गर्भपात कायदेशीर आहे; पण त्याभोवती असलेले सामाजिक, नैतिक, आर्थिक, धागेदोरे इतके घट्ट आहेत, की बाईला वाटलं म्हणून ती गर्भपात करून आली इतकं सोप्पं मात्र नाहीय...

मुळात गर्भपात हा शब्द कानावर आला की अजूनही ते मूल विवाहबाह्य संबंधांतून आलं असणार म्हणूनच पाडायचं असणार, असा एक समज असतो. गर्भपात करण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यात मूल खूप लहान असणे, बलात्कारातून आलेले गर्भारपण, मुलामध्ये जन्मतःच वैद्यकीय दोष असणं, पालकांचे वादग्रस्त संबंध किंवा मूल नको असणे आदी. त्यातही मूल नको असणे हे गर्भपातामागील अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. एका बाईला नियमित पाळी येते ती साधारण १२-१३ व्या वर्षापासून. हल्ली हे वय अजून कमी होतंय आणि ती जवळपास ५० व्या वर्षापर्यंत सुरू राहते. म्हणजे जवळपास मला जर आयुष्यात ४०० वेळा पाळी येणार असेल, तर ४०० वेळा गर्भार राहण्याचा प्रसंग येऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोन मुले हवी असतील, तर मग ३९८ वेळा काय करायचं? त्यावर विविध गर्भनिरोधक साधने, शस्त्रक्रिया आदी उपाय आहेत; पण त्यातूनही गर्भ राहिला तर...? हे मूल जन्माला घालायचं किंवा नाही हा अधिकार बाईकडे असला पाहिजे. कारण शरीरसंबंध जरी दोन माणसे करत असली, तर त्यातून निर्माण होणारे मूल हे महिलेच्या शरीरात वाढणार आहे.

आता या सगळ्याकडे ‘काय बाई, आजकालच्या मुलींना करियरपुढे काही सुचतच नाही. त्यांना मुलबाळं नकोच असतात. नात्यांचा ओलावाच नष्ट होत चालला आहे’, अशी बोंब मारण्यात काही अर्थ नाही. काहींना मुले जन्माला घालावीशी वाटतात; तर काहींना नाही. इतकं सोप्पं आहे खरं तर हे. म्हणजे त्यांना मुले आवडत नाहीत असाही त्याचा अर्थ नसतो! प्रत्येकीचे काही वेगळे कारण असू शकते; पण प्रत्येकीला आपण हे विचारतो का, हा मुळात पहिला प्रश्न आहे. लग्नानंतर लवकर पाळणा हलणार आहे ना याची घरामध्ये अगदी वाट पहिली जाते. कारण लग्न हे प्रजोत्पादनासाठीच केल्याचा असलेला समज.

काही वर्षांपूर्वी हरियाणामधील एका गावात चित्रीकरणासाठी गेले होते. दिल्लीपासून ६० किलोमीटर दूर फार तर... तिथल्या बायका गप्पा मारत होत्या.

पहिला प्रश्न- ‘लग्न झाले आहे का?’

‘हो...’

मग ‘बालक कितने है?’

‘मी म्हणलं नाहीयेत...’

आणि मग कळीचा प्रश्न झाला, ‘नाही का होऊ दिली नाही?’

मी होऊ दिली नाही म्हणल्यावर एक खुसपुस चर्चा रंगली.

संध्याकाळी चार तरुण मुली मला घेऊन कोपऱ्यात गेल्या, मुले कशी होऊ द्यायची नाहीत ते विचारायला, तेही गुपचूप. नवऱ्याला न कळू देता करायचं तर काय करायचं? कारण जर गर्भधारणा झाली तर मूल जन्माला घालायचंच असतं आणि त्यांना ते इतक्यात नको होतं. संततीनियमनाबद्दल आपल्याकडे जितकी माहिती दिली गेली पाहिजेत, ती अजून दिली गेली नाही. नको असलेली गर्भधारणा असेल, तर गर्भपाताकडे अजूनही खूप हिंसक नजरेने पाहिलं जातं. यात मातृत्वाचा अतिरिक्त उदो उदो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. एखाद्या महिलेला आई व्हावंसं वाटत नसेल, तर तिच्याकडे अजूनही विचित्र नजरेनं पाहिलं जातं. महिला म्हणून समाजात कमजोर मानलं जातं तिथे गर्भपाताबद्दल काय बोलणार? याचा अर्थ भारतात गर्भपात होत नाहीत का, तर बक्कळ होतात. अगदी लिंगचाचणी करूनही होतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्री गर्भ नको, मुलगी व्हायला नको, म्हणून गर्भपात करवले जातात. यातही निर्णय हा सासू-सासरे-नवरा यांनीच घेतलेला असतो. ज्या बाईचं शरीर आहे, त्या बाईला तिच्या शरीरासंदर्भात निर्णय कधी घेता येणार आहेत?

असो. इथे सुरक्षित गर्भपाताबद्दल बोलणेही गरजेचे आहे. २०१५ मध्ये सुशीला सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं, की एकूण गर्भधारणेच्या एक तृतीयांश गर्भपात होतात आणि निम्म्यापेक्षा अधिक गर्भधारणा या नियोजित नसतात. त्यातील असंख्य गर्भपात हे असुरक्षितपणे केलेले असतात. गर्भारपणात, मूल जन्माला देताना होणारे मृत्यू आणि असुरक्षित गर्भपातामुळे होणारे मृत्यू या सर्वांची संख्या चक्रावणारी आहे. अजूनही भारतात जवळपास रोज १० महिला या असुरक्षितरीत्या केलेल्या गर्भपातामुळे मृत्यमुखी पडतात. हजारो महिला अनके व्याधी आणि विकार घेऊन जगतात. या सगळ्या महिला कोण असतात, त्यांना माहितीय का की त्यांच्या शरीरावर खरं तर त्यांचा अधिकार असतो, हा खरा कळीचा प्रश्न आहे. किती महिलांना माहितीये की त्या ‘नाही’ म्हणू शकतात? महिला स्वतःहून लैंगिक संबंध, गर्भार राहणे, मूल जन्माला घालणे, यातल्या कशालाही ‘नाही’ म्हणू शकतात.

जाड, बारीक, काळ्या, गोऱ्या, उंच, ठेंगण्या, ठुसक्या, मुरमविरहित, मुरूम-पुटकुळ्यांसहित कुठल्याही प्रकारच्या शरीराच्या बायका, स्वतःच्या शरीरावर हक्क सांगू शकतात. माझा रंगच असा आहे, माझं वजनच जास्त किंवा कमी असं म्हणून मग ‘काही’ म्हणता येतं नाही, हा अजून पुढचा कॉम्प्लेक्स आहे. त्यावरही बोलूयात, पण आधी हे लक्षात घेऊयात, की आपलं शरीर, त्यावरील प्रत्येक अवयव, आपली योनी, आपले स्तन, आपलं गर्भाशय यावर आपला अधिकार आहे. याव्यतिरिक्त इतर कुणीही काहीही सांगत असेल तर ते खोटं आहे.

beingrasika@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com