

Organic Farming Success Story
esakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी - sarikachatuphale.kulkarni@gmail.com
एका गावात एक आजीबाई राहत असत. आयुष्यभर शाळेत शिक्षिका म्हणून शिकवल्यावर निवृत्तीनंतर आजीबाई गावाकडे फार्म हाउस बांधून राहू लागल्या. कोरोना काळात काही दिवस त्या गावाकडे जाऊन राहिल्या होत्या तेव्हाच खरे तर त्यांचा हा विचार पक्का झालेला होता. श्रीधर वेम्बू यांनी जसे झोहो कंपनीचे काम तमिळनाडूमधील गावखेड्यांमध्ये नेले तसे आपणही आपल्या गावाकडे जाऊन उर्वरित आयुष्य घालवावे आणि त्या निमित्ताने गावाचा विकास करावा, असा आदर्श आजीबाईंनी डोळ्यांसमोर ठेवला होता.
एवढेच नव्हे तर ‘कमी तेच जास्त’ असे मिनिमलिस्ट लोकांचे तत्त्वज्ञान आजीबाईंनी अंगीकारले होते. त्यानुसार अगदी जीवनावश्यक असेल तेवढेच जवळ ठेवावे, बाकीच्या सगळ्या वस्तूंचा त्याग करावा हेदेखील आजीबाईंनी ठरवले होते. आजीबाईंच्या घरात करमणुकीच्या फारशा वस्तू नव्हत्या. पण आजीबाई शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या असल्याने शिकवण्याचा बाणा अंगी होता. गावातील सगळ्या मुलांना जमवून त्या शिकवत असत.