आई अकरा मुलांची

अर्धापूरला माझे मामा, भागवतराव निरगुडे यांचं दुकान आहे. मी माझ्या गावी पाटनूरला गेलो, की अर्धापूरला चक्कर होतेच होते.
Mother
Mothersakal

अर्धापूरला माझे मामा, भागवतराव निरगुडे यांचं दुकान आहे. मी माझ्या गावी पाटनूरला गेलो, की अर्धापूरला चक्कर होतेच होते. त्या दिवशी मी मामांच्या दुकानावर मामाची वाट बघत थांबलो होतो. मी दुकानाच्या पायऱ्यांवर फोनवर बोलत थांबलो होतो. मी समोर नजर टाकली तर एक महिला रस्त्यावर झाडलोट करत खूप वेळ फोनवर बोलत होती. त्या महिलेच्या जवळून जाताना तिचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं.

तिच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं, ती तिच्या मुलांशी बोलत आहे. थोड्या वेळानं पुन्हा माझ्या लक्षात आलं, ती कुण्या एका मुलासोबत नाही तर ती अनेक मुलांसोबत बोलत आहे. मी तिला म्हणालो, ‘मावशी, तुम्ही शाळेत मुले नेऊन सोडायचे काम करता का?’ ती म्हणाली, ‘नाही.’ मी म्हणालो, ‘तुम्ही केव्हापासून वेगवेगळ्या मुलांशी बोलताय असे मला जाणवलं.’ ती म्हणाली, ‘मी माझ्याच मुलांशी बोलते.’ मी रस्त्यावर जाऊन उभा राहिलो.

माझी नजर मित्राला शोधत होती. ती मला म्हणाली, ‘दादा, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का?’ मी म्हणालो, ‘हो’, असं करत आमचं बोलणं सुरू झालं. बोलता बोलता मी तिच्या फोनवर झालेल्या संवादावर पुन्हा आलो. तेव्हा तिनं मला सांगितलं, ‘मेरे ग्यारा बच्चे है. दिवसभर सर्वांची खुशाली विचारावी लागते.’

तिचं बोलणं ऐकून मी एकदम अवाक झालो. येणाऱ्या माणसांकडं माझं लक्ष नव्हतं. माझं लक्ष होतं, ही महिला तिचं कुटुंब, हे सगळे जण काय करीत असतील, काय खात असतील, त्यांच्या जगण्याची पद्धती कशी असेल याकडं.

अंगावर लुगडं, हातात मोठा झाडू, तोंडामध्ये तंबाखू, पिशवीमध्ये तंबाखूचं साहित्य, मोबाइल, ती बाई एकदम धाडसी दिसत होती. माझा मोबाइल मी बंद केला आणि त्या महिलेशी मी बोलत होतो. तिच्या बोलण्यामधून तिचा एकूण परिवार, तिच्या घरातलं वातावरण आणि ती करत असलेलं काम हे सगळं काही माझ्यासमोर आलं. तिला जेव्हा माझ्याविषयी विश्वास वाटायला लागला, तेव्हा ती माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोकळेपणानं देत होती.

तिचं काम आटोपलं होतं. ती आता घराच्या दिशेनं निघाली होती. तिच्याबरोबर बोलत बोलत मीही रस्त्यानं चालत होतो. येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना ती नमस्ते जी, नमस्ते जी, म्हणत होती. तामसा रोडवरून, बसस्थानक आणि पुढं अर्धापूर पोलिस स्टेशनसमोरून आम्ही जुन्या भागात शिरलो. बाजाराचा दिवस असल्यामुळं छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांची आजूबाजूला गर्दी दिसत होती.

रस्त्यावर तीन दगडांवर चूल मांडत भाकरी थापणाऱ्या एका बाईची त्या महिलेनं विचारपूस केली. मी ज्या बाईबरोबर चालत होतो, बोलत होतो तिचं नाव सरूबाई. सरूबाईंचं माहेर वसमत, धर्मानं मुस्लीम. सरूबाईंचे वडील शेतमजूर. त्यांनी नात्यांमध्येच, म्हणजे सरूच्या वडिलांनी सरूचा विवाह केला. सरूबाईंचे सासू-सासरे प्रचंड धार्मिक.

अपत्य हे देवाची देणगी असते आणि त्या प्रसादाला नाही म्हणायचं नाही, या सासऱ्यांच्या विचारांतून एक दोन नव्हे तर सात मुलं आणि चार मुली सरूबाईंना झाल्या. अकरा मुलांची आई, तरीही साठी ओलांडतानाही सरूबाई प्रचंड उत्साही आहेत.

सरूबाई मला सांगत होत्या, ‘प्रत्येक मुलगा अभिमान वाटावा असं काम दिवसभर करतो. घरामध्ये शिक्षणाचा गंध नव्हता. कारण तसे संस्कार नव्हते. घरात टीव्ही नव्हता. कारण सरूबाईंच्या सासऱ्यांनी मी मरेपर्यंत घरात टीव्ही आणायचा नाही, असं बजावलंय. सात मुलांमध्ये कोणी भंगार विकण्याचं काम करतो. कोणी रस्त्यावर मांस विकण्याचं काम करतो. कोणी बस स्थानकावर चुरमुरे विकायचं काम करतो. कुणी भाजी विकण्याचं काम करतो.

सगळे जावई आणि मुली अर्धापूरमध्ये छोट्या छोट्या व्यवसायात व्यस्त असतात. माझा नवरा अहमद दिवसभर काम करून रात्री दारू प्यायचा. सुनांच्या आग्रहास्तव त्यांनी दारू सोडली. पुढं काय झालं कळलं नाही. वर्षभरामध्ये त्यांचं निधन झालं. सरूबाई नवऱ्याच्या आठवणी सांगत होत्या. मुलं आली, नातू आले तरी त्यांचं माझ्यावर प्रेम कधी कमी झालं नाही. मरतानाही त्यांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला.’

नवऱ्याच्या आठवणीनं सरूबाईंचे डोळे पाणावलेले. त्यांची नात तिच्या मांडीवर खेळत होती. सायंकाळी काम आटोपून सगळ्यांच्या येण्याची वेळ झाली होती. येणारा प्रत्येक जण हातामध्ये खाण्यासाठी आणत सरूबाईंच्या समोर ठेवत होता. सरूबाई प्रत्येकाला माझी ‘मामा आहे, मामा आहे’ म्हणून ओळख करून देत होत्या.

सर्व जण एकत्रित जेवायला बसले. त्या पंगतीत मी नवखा, पण जेवत होतो. सरूबाईंचे सासरे प्रचंड धार्मिक, मुस्लीम धर्मात असणारे सर्व ग्रंथ घरामध्ये होते, पण ते ग्रंथ वाचण्यात फार रुची सरूच्या कुठल्याही मुलाला दिसत नव्हती.

त्या कुटुंबाकडं बघिल्यावर माझ्या मनात दोन प्रश्न कायम होते. अकरा मुलांची आई असूनही सरूबाई अजूनही एकदम ठणठणीत आहेत. अवघ्या कुटुंबाचा भार सरूवर आहे. त्या या वयातही दिवसभर प्रचंड काबाडकष्ट करतात. अवघ्या कुटुंबाची पकड सरूबाईंकडं आहे.

अकराच्या अकरा मुलांना यशस्वी रीत्या योग्य त्या मार्गावर चालवण्यासाठी सरूबाई सफल झाल्या आहेत. आनंद पैशानं मिळत नाही, खूप संपत्ती आहे म्हणून नाही मिळत आनंद. रोजच्या कामात आणि समाधानामध्ये मिळतो आनंद. हे त्या कुटुंबाकडं पाहून मला जाणवत होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com