ऐकून घेणारे ‘कान’ होऊ... (डॉ. हमीद दाभोलकर)

dr hamid dabholkar
dr hamid dabholkar

सुशांतसिंहच्या आत्यहत्येनंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी असे विचार व्यक्त केले. आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आत्महत्येचे विचार मनात येणं हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचं लक्षण आहे. ही अस्वस्थता कोणालाही अनुभवाला येऊ शकते. त्याच्यामागे जैवि-मनो-सामाजिक अशी तीन प्रकारची कारणं असू शकतात. या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात हे लक्षात घेतलं पाहिजे.

स्वत:ला जीवापाड जपणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतात. स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला मागंपुढं न पाहणारी माणसंदेखील या समाजात दिसून येतात. या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह राजपूतसारखा एक तरुण अभिनेता स्वत:च्याच हातानं आयुष्य संपवून घेतो, या या घटनेकडे कुठल्या नजरेनं बघावे, हा प्रश्न आपल्यातल्या अनेकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात असं वाटतं.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. भरतात दरवर्षी दोन लाखपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्यानं होतो. त्यामधल्या निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या १५ ते ३५ या वयोगटातल्या म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळलो आणि काही दिवसांनी हे विसरून गेलो एवढ्यापेक्षा हा खूप गंभीर विषय आहे. ‘युवाल नोवा हरारी’ हा आजच्या जगाचा एक महत्त्वाचा भाष्यकार असं म्हणतो, की ‘युद्ध आणि दहशतवाद यापेक्षा ‘आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.’ कोरोनाच्या साथीमुळे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर समाजातले मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बातम्यांमध्ये आपण रोज बेरोजगारीनं कोणी तरी जीवन संपवून घेतल्याचं वाचतो. समाज म्हणून वरच्या प्राधान्यक्रमानं आपण हाताळायला पाहिजे असा हा प्रश्न आहे.

यामधली सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ती म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजार याविषयी आपल्या समाजात असलेलं प्रचंड अज्ञान आणि गैरसमज. शरीराचा आजार आपण जितक्या सहजपणे स्वीकरतो, तसा मनाचा आजार अजिबात स्वीकारत नाही. मनाचं आजारपण ही अजूनही आपल्या समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट समजली जाते. ‘मनाचा आजार हा काहीतरी कलंक आहे,’ असं आपल्या समाजात त्याकडे बघितलं जातं. स्वाभाविकपणे मानसिक आजाराचा उपचार घेण्यापेक्षा लोक तो लपवण्याचा प्रयत्न करतात. यामधून जर कोणी उपचारांपर्यंत पोचला, तर मानसिक उपचारांविषयी असलेल्या प्रचंड गैरसमजांच्यामुळे पूर्ण उपचार घेतला जात नाही. ‘मानसोपचारतज्ज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात’, ‘त्यांच्या औषधांची सवय लागते!’ अशा अनेक गैरसमजांना बळी पडून लोक उपचार पूर्ण करत नाहीत. आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींबद्दलदेखील खोलवर रुजलेले गैरसमज आपल्या समाजात आहेत. ‘आत्महत्येचा विचार बोलून दाखवणारे लोक हे नाटक करत असतात’ अथवा ‘जो गरजते है वो बरसते नाही’ असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचे विचार बोलून दाखवते, तेव्हा ती ‘माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही आहे आणि मला मदतीची गरज आहे,’ असं सांगत असते. त्याकडे आपण खूप संवेदनशीलतेनं बघणं आवश्यक आहे.

सुशांतसिंहच्या घटनेनंतर सोशल मीडिया वर #My Door Is Open नावाची एक मोहीम चालली. ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. मानसशास्त्रातले अनेक अभ्यास असं सांगतात, की आत्महत्या करण्यापूर्वीच्या आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात. अत्यंत ताणाच्या प्रसंगी स्वत:ला इजा करून घेण्याचे विचार हे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी उपलब्ध आहोत, ही मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचे आत्महत्येचे विचार शांतपणे ऐकून घेणं आणि त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं ही आव्हानात्मक गोष्ट आहे. यामध्ये आपण जर ‘भावनिक प्रथमोपचार’ कसे द्यावेत, याचं जर छोटं प्रशिक्षण घेतलं असेल, तर आपण अधिक प्रभावीपणे हे काम करू शकतो. परिवर्तन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत कोविडच्या कालखंडात भावनिक प्रथमोपचार देऊ शकतील, अशा दोनशेपेक्षा अधिक मानसमित्र आणि मैत्रिणींना मोफत प्रशिक्षण देण्यात आलं. याचा त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाना जवळच्या लोकांना मोठा फायदा झाला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले ऐकणारे अनेक ‘कान’ तयार करू शकतो. केवळ भावनिक प्रथमोपचारदेखील सर्व काही करू शकतील, असं समजणं बरोबर नाही. आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नातली ती केवळ पहिली; पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर अशा प्रत्येक मानस मित्र/मैत्रिणींनी तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांच्या सोबत जोडलेलं असणं आवश्यक आहे. त्यामुळे आत्महत्येच्या विचारांचं गांभीर्य आणि तीव्रता ओळखायला शिकणं आणि मानसोपचारतज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे करणं अत्यंत आवश्यक आहे. जगभरात आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नात अशा गेटकीपरचं/भावनिक मदत देणाऱ्या द्वाररक्षकांचं महत्त्व दिसून आलं आहे. काही वेळा मनात आत्महत्येचे विचार येणं हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचंदेखील लक्षण असतं. यामध्ये व्यक्तीला भास आणि भ्रम होत असतात. अशा वेळी उपचार हे तज्ज्ञाच्या थेट देखरेखीखालीच होणं आवश्यक असतं, हेसुद्धा आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.
‘आत्महत्या करणं’ हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असा आपल्याकडे खोलवर रुजलेला आणखी एक गैरसमज आहे. सुशांतसिंहच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी असे विचार व्यक्त केले. आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आत्महत्येचे विचार मनात येणं हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचं लक्षण आहे. ही अस्वस्थता कोणालाही अनुभवाला येऊ शकते. त्याच्यामागे जैवि-मनो-सामाजिक अशी तीन प्रकारची कारणं असू शकतात. जैविक पातळीवर मेंदूतलं सिरोटोनिन द्रव्य आणि काही जनुकं याच्याशी निगडित असल्याचे अनेक अभ्यास आता झाले आहेत. मानसिक पातळीवर स्वभाव दोष, टोकाचा उतावीळपणा ही कारणं आहेत, तर सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता, व्यसनाधीनता अशा स्वरूपाची करणं दिसून येतात. या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात हे आपण समजून घेतलं पाहिजे.
स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर याविषयी आपण अनेक गोष्टी करू शकतो. सतत निराश वाटणं, झोप न येणं अथवा जास्त झोप येणं, भूक कमी होणं, सारखी चिडचिड होणं, अस्वस्थता राहणं, टोकाचे विचार येणं अशी लक्षणं आपल्याला स्वत:ला किवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून आल्यास आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. तरुणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात करिअर आणि प्रेम /आकर्षण यामधल्या गोंधळाच्या मधून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्य आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. याविषयी कुटुंबात मोकळेपणानं बोलण्याचं वातावरण निर्माण करण्यातून अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते. ‘आयुष्यात अपयश आलं म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही’ हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो. अपयशाला सहजपणे सामोरं जाणारी मानसिकता घडवण्याचं महत्त्वदेखील या निमित्तानं अधोरेखित होतं. शासनच्या आरोग्य यंत्रणेच्यामार्फत ज्या विविध स्वरूपाच्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये मानसिक आरोग्याच्या आणि आत्महत्याप्रतिबंधक सुविधांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करणं आवश्यक आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येविषयी वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी असंवेदनशील असं रिपोर्टिंग केलं. यामधून अनेक वेळा अनुकरणातून होणाऱ्या आत्महत्या वाढू शकतात. माध्यमांनीदेखील आत्महत्या रिपोर्टिंगविषयीच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे. आत्महत्यांची ही साथ रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला अशा प्रयत्नांत सहभागी व्हायचं असेल, तर जरूर आम्हाला ९५६१९११३२० वर एक मेसेज करा. आपण सगळे, शासन आणि माध्यमं यांनी एकत्र प्रयत्न केले, तर नक्कीच आपण आत्महत्यांमधून होणारे अनेक मृत्यू टाळू शकू, असा विश्वास वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com