वक्तृत्वाचा आदर्श (राम नाईक)

ram naik
ram naik

सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण करत असताना दुसऱ्यांची टिंगल उडवणं, टर उडवणं असं अनेकदा होऊ शकतं. कोपरखळी मारणं आपण समजू शकतो; पण काही वेळा ती पातळी सुटू शकते. सुषमाजींच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वक्तृत्वात संयम होता. त्यांच्या दीर्घ काळातल्या इतक्या भाषणांत त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक पातळीवर टीका कधी केली नाही. अटलजींच्या वक्तृत्वातसुद्धा तो भाग होता. त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांचं वक्तृत्व वैशिष्ट्यपूर्ण होतं; पण त्यांच्या भाषणाला शब्दांबरोबर वैचारिक धारही तितकीच महत्त्वाची होती.

सुषमा स्वराज यांची माझी पहिली भेट १९८०मध्ये झाली. भारतीय जनसंघाचे पूर्वीचे लोक जनता पक्षातून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, तेव्हा भाजपचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत होतं. त्यावेळी मी मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो. त्या नात्यानं त्या अधिवेशनाची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. सुमारे ५५-६० हजार कार्यकर्ते होते. त्यावेळी महिलांचं वेगळं संमेलन होतं. तेव्हा आमच्या पक्षाच्या दिल्लीतल्या महिला कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, की ‘तुम्ही मुंबईतले असल्यानं जयवंतीबेन मेहता यांचं भाषण नक्कीच ऐकाल; पण आणखी एक चांगलं भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल. ते भाषण तुम्ही चुकवू नका.’ ते भाषण होतं सुषमा स्वराज यांचं. ते भाषण अतिशय प्रभावी होतं. ते ऐकतानाच माझ्या मनात आलं, की आपण अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तृत्वाचं खूप कौतुक करतो. त्यातला संयम, भाषा यांचं कौतुक करतो; पण या अटलजींच्या तोडीच्या वक्त्या आहेत. मी त्यांचं अभिनंदनही केलं. माझा आणि त्यांचा खरा जवळचा संबंध पुढं तीन महिन्यांनी आला कार्यकारिणी बैठकीच्या वेळी. त्यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून घेतलं होतं आणि मी मुंबई भाजपचा अध्यक्ष या नात्यानं सहभागी व्हायचो. तिथून ओळख वाढत गेली. पुढं मी सन १९८९मध्ये लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेलो आणि १९९९०मध्ये स्वराज यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभा आणि लोकसभा मिळून त्या सात वेळा संसद सदस्य होत्या. मीही संसद सदस्य, भाजपचा प्रतोद अशा वेगवेगळ्या भूमिकांतून काम करत होतो. हे एकत्र काम करत असताना त्यातून परिचय वाढला, विश्वास वाढला. त्यांचं वक्तृत्व मात्र आपल्याला काही जमत नाही, हे मात्र जाणवायचं. त्यांना मी ‘तुमचं वक्तृत्व द्या आम्हाला,’ असं गंमतीनं सांगत असे.

सर्वांत प्रभावी वक्तृत्व
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण करत असताना दुसऱ्यांची टिंगल उडवणं, टर उडवणं असं अनेकदा होऊ शकतं. कोपरखळी मारणं आपण समजू शकतो; पण काही वेळा ती पातळी सुटू शकते. सुषमाजींच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वक्तृत्वात संयम होता. त्यांच्या दीर्घ काळातल्या इतक्या भाषणांत त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक पातळीवर टीका कधी केली नाही. अटलजींच्या वक्तृत्वातसुद्धा तो भाग होता. त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांचं वक्तृत्व वैशिष्ट्यपूर्ण होतं. इंग्रजी, हिंदीबरोबरच संस्कृतचाही त्यांचा चांगला अभ्यास होता; पण त्यांच्या भाषणाला शब्दांबरोबर वैचारिक धारही तितकीच महत्त्वाची होती. भाजपमध्ये प्रमोद महाजन, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर असे विविध पिढ्यांचे अनेक प्रवक्ते झाले; पण सुषमा स्वराज या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होत्या. ती कामगिरी त्यांनी उत्तम केली. त्या मेहनत खूप घ्यायच्या. वक्तृत्वातली शब्दांची निवड, जोर या सगळ्या गोष्टी होत्याच; पण अभ्यासही होता.

बोललेलं कृतीत
बोललेल्या गोष्टी कृतीत आणण्याबाबतही त्या तितक्याच तत्पर होत्या. त्याबद्दलची एक आठवण सांगतो. कोकण रेल्वेचं उद्‍घाटन होतं. त्यावेळी मी रेल्वे राज्यमंत्री होतो आणि नितीशकुमार रेल्वेमंत्री होते. त्यावेळी या कोकण रेल्वेच्या उद्‍घाटनाच्या निमित्तानं दोन टपाल तिकिटं काढली पाहिजेत अशी कल्पना मी मांडली. कोकण रेल्वेबाबतचं आणि या कोकण रेल्वेची कल्पना ज्यांनी मांडली ते या. ब. वालावलकर यांच्यावर टपाल तिकीट काढायला पाहिजे, असं मी म्हटलं. सुषमाजी त्या वेळी माहिती-प्रसारणमंत्री होत्या. आमच्या कल्पनेनुसार कोकण रेल्वेचं टपाल तिकीट निघालं, पण दुसरं म्हणजे वालावलकर यांच्यावरचं टपाल तिकीट मात्र निघू शकलं नाही. मी त्या कार्यक्रमात ते बोलून दाखवलं. स्वराज यांनी तिथल्या तिथं ते मान्य केलं आणि ते टपाल तिकीट काढीन असं सांगितलं. असं तिकीट काढण्यासाठी बरीच पूर्वतयारी लागते. पहिलं तिकीट तत्परतेनं झालं; पण दुसरं तिकीट राहिलं होतं. मात्र, हे टपाल तिकीट काढण्याची ग्वाही त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवली. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. परराष्ट्रमंत्री असताना पाकिस्तानमधल्या मुलीला ट्रीटमेंट देण्याबाबतच्या प्रसंगासारख्या अनेक प्रसंगांत त्यांनी संवेनशीलता दाखवून दिली. काहींनी हे राजकारण आहे असं म्हटलं; पण मी म्हणेन की ‘हे संवेदनशीलतेचं राजकारण’ होतं. दीर्घकाळ वेगवेगळी मंत्रालयं हाताळत असताना त्यांनी उत्तम काम केलं. परराष्ट्र मंत्रालय त्यांनी कार्यक्षमतेनं सांभाळलं. नंतरच्या काळात प्रकृती ठीक असतानाही त्यांनी खूप चांगली कामगिरी केली.

त्यांची एक वेगळी आठवण आहे. ‘सकाळ’मध्ये मी लिहिलेल्या लेखांचं पुढं ‘चरैवती’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्याचे अकरा भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यात तीन भाषा परदेशी होत्या. जर्मन, फारसी आणि अरबी अशा तीन भाषांमध्येसुद्धा त्याचा अनुवाद झाला. मी त्याचं आमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा ‘माझी प्रकृती चांगली असती तर मीच या कार्यक्रमात बोलायला आले असते,’ असं त्या म्हणाल्या. मात्र, त्यांनी सचिवांना सांगून इस्राईल, इराण, अरबी जगतातले राजदूत, प्रमुख अधिकारी अशा सगळ्यांना निमंत्रणं पाठवायची व्यवस्था केली. खरं तर ते काम त्यांचं नव्हतं; पण खऱ्या संघटकाकडं दुसऱ्याला प्रोत्साहन देण्याचं जे कौशल्य असतं ते त्यांच्याकडं निश्चितच होतं. तेच यातून जाणवलं. इतर पक्षांपेक्षा भाजपची महिला आघाडी तुलनेनं प्रभावी अशी असते. त्यात स्वराज यांचं मोठं योगदान होतं. अभ्यास वर्ग घेणं, महिलांच्या उन्नतीसाठी काम करणं असं त्या करत राहिल्या.

सुधीर फडके यांनी ‘सावरकर’ चित्रपट काढला, तेव्हा दिल्लीत त्याचा शो व्हावा; अटलजी, लालकृष्ण अडवानी यांनी तो पाहावा अशी फडके यांची खूप इच्छा होती. सुषमाजी तेव्हाही माहिती-प्रसारणमंत्री होत्या. त्यामुळं मी त्यांच्याकडं गेलो आणि ही इच्छा सांगितली. सुषमाजी यांना अर्थातच सावरकर यांच्याबद्दल माहिती होती. त्या म्हणाल्या, ‘‘मी सगळे मंत्री आणि खासदार यांच्यासाठीच एक स्पेशल शो करते.’’ त्यांनी त्याप्रमाणं तो शो आयोजित केला आणि फडके यांचा यथोचित सन्मानसुद्धा केला.

मी अंदमानमध्ये स्वातंत्र्यज्योत तयार केली होती. मात्र, आचारसंहितेमुळं तिचं उद्‍घाटन होऊ शकलं नव्हतं. नंतर पुढं तिथली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या कवितेच्या ओळीची पट्टीसुद्धा काढण्यात आली. मला खूप राग आला होता. सुषमाजी तेव्हा पक्षाच्या लोकसभेतल्या उपनेत्या होत्या. त्यांना मी हा विषय लावून धरण्याची विनंती केली. त्यांनी लोकसभेत तो विषय लावून धरला. एवढंच नव्हे, तर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आंदोलन करू असं म्हणाल्या आणि त्याप्रमाणं केलंही. अशा प्रकारे बोललेले विचार कृतीत आणून देण्याची त्यांची वृत्ती होती.

शेवटच्या काळात त्यांची प्रकृती बरी नव्हती. मे २०१९ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला, तेव्हा मी त्यांना फोन केला होता. ‘‘तुम्ही माझ्या पावलावर पाऊल टाकलंत,’’ असं मी त्यांना सांगितलं होतं. त्याच वेळी ‘‘मला १९९४मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर पुढची २५ वर्षं मी कार्यरत राहिलो आहे. त्यामुळं बऱ्या व्हा आणि कामाला लागा,’’ अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, तसं होणं नव्हतं. एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. तीनशे सत्तर कलमाबाबत संसदेमध्ये निर्णय झाला, तेव्हा ‘हा दिवस यावा यासाठी मी आयष्यभर वाट पाहत होते,’ असा ट्वीट त्यांनी केला आणि त्यानंतर तासाभराच्या आतच त्यांना हार्ट ॲटॅक आला आणि त्या गेल्या. हा एक दुर्दैवी योगायोग म्हणाला लागेल.
(शब्दांकन : मंदार कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com