‘धक्का स्टार्ट’ गाडी गॅरेजमध्येच!

खेळात कालचा दिवस हा इतिहास असतो, वर्तमान हेच सत्य असतं! आदल्या दिवशी भले तुम्ही शतक केलेलं असेल; पण दुसऱ्या दिवशी शून्यावरून सुरुवात करण्यासारखंच ते असतं.
IPL Cricket
IPL CricketSakal
Summary

खेळात कालचा दिवस हा इतिहास असतो, वर्तमान हेच सत्य असतं! आदल्या दिवशी भले तुम्ही शतक केलेलं असेल; पण दुसऱ्या दिवशी शून्यावरून सुरुवात करण्यासारखंच ते असतं.

खेळात कालचा दिवस हा इतिहास असतो, वर्तमान हेच सत्य असतं! आदल्या दिवशी भले तुम्ही शतक केलेलं असेल; पण दुसऱ्या दिवशी शून्यावरून सुरुवात करण्यासारखंच ते असतं. १४ वर्षांत भले तुम्ही पाच वेळा विजेतेपद मिळवलेलं असेल, तरीही पुढच्या वर्षी तुम्हाला नव्यानं श्रीगणेशा करावा लागतो....हा संदर्भ कुणाविषयी दिला जातोय हे एव्हाना लक्षात आलं असेलच. आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला आणि ग्लॅमर असलेला...सचिन तेंडुलकर, झहीर खान अशा ‘डगआऊट’मधील अनेक तारांकित खेळाडूंनी नटलेला ‘मुंबई इंडियन्स’चा संघ यंदा गटांगळ्या खात आहे.

त्याविषयीचा हा संदर्भ आहे. ‘पहिल्या सहापैकी सहा सामन्यांत पराभव,’ अशी वेळ आयपीएलच्या इतिहासात खचितच एखाद्या संघावर आली असेल. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमरा हे क्रिकेटविश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडू, तरीही सहा सामन्यांत पराभव काही टाळता आला नाही. मुळात ‘ट्वेन्टी-२०’ हा प्रकारच बेभरवशाचा. एखादी विकेट किंवा एखादा षटकार होत्याचं नव्हतं करून टाकतो. त्यामुळे पाठीशी विक्रमांचा कितीही चकचकाट असला तरी प्रत्येक वेळी त्याला नव्यानं लकाकी द्यावीच लागते, तरच तुमचं ग्लॅमर अबाधित राहतं...

नाव मोठ, लक्षण खोटं!

‘मुंबई इंडियन्स’चं सध्या तरी ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ अशीच स्थिती झाली आहे. क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारात एखादा खेळाडूही मॅचविनर होऊ शकतो. मुंबई संघात असे किमान पाच खेळाडू आहेत; पण सध्याचा कामगिरीचा आलेख पाहता, ‘नाव मोठं...’ अशीच स्थिती. कधी कधी काही सामन्यांचे निकाल अखेरच्या चेंडूवर लागतात. दोन-चार धावांनी किंवा एक-दोन विकेटनी विजय-पराजय यांच्यातलं अंतर स्पष्ट होतं. अशा वेळी पराभूत संघानंही मैदान गाजवलेलं असतं; त्यामुळे त्यांचीही मान ताठ असते. ‘मुंबई इंडियन्स’च्या खेळाडूंच्या माना मात्र झुकलेल्याच आहेत.

पंधरावं वरिस धोक्याचं!

गेल्या चौदा मोसमांचं एक पर्व होतं. यंदा दोन नवे संघ आले आणि काही रिटेन खेळाडूंचा अपवाद वगळता सर्वच खेळाडूंची अदलाबदल झाली. दोन नव्या संघांनी वेगळ्या विचारांनी आपल्या संघांची मोट बांधली, त्यासाठी यंदाचा मेगालिलाव अत्यंत महत्त्वाचा होता. संघबांधणीचा तो पाया होता. लिलावातून अतिशय काटेकोरपणे खेळाडू आपल्या संघात घेणं महत्त्वाचं होतं. ‘मुंबई इंडियन्स’ला लिलावाचं चक्रव्यूह भेदता आलं नाही. हे पंधरावं वरिस तरी त्यांच्यासाठी धोक्याचंच ठरत आहे!

रोहितची संभ्रमावस्था

‘मुंबई इंडियन्स’ला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिल्यामुळे रोहितचा भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी विचार होऊ लागला होता.

आता तर तो तिन्ही प्रकारांत भारतीय संघाचा नेता आहे; पण या आयपीएलमध्ये सलग सात सामन्यांत त्याचा पराभव होतो, वेळेत षटकं पूर्ण न केल्याबद्दल दोनदा दंड होतो, यावरून रोहितची एकाग्रता ढळली असल्याचं स्पष्ट होतं. इतकंच नव्हे तर, सलामीवीर फलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरत आहे. भारतीय संघासाठीसुद्धा ही चिंतेची बाब आहे. यापुढं मोठा पल्ला गाठायचाय. इंग्लंडदौरा, त्यानंतर या वर्षात ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा, पुढील वर्षी भारतात होणारी मर्यादित षटकांची (५०-५०) विश्वकरंडक स्पर्धा...अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धा असताना रोहितवर आत्ताच कर्णधारपदाचं दडपण आलं तर पुढं कसा निभाव लागणार हा प्रश्नच आहे.

आता भवितव्य काय?

काहीशा अशाच परिस्थितीचा मुंबई संघानं याअगोदर सामना केला होता. सलग चार सामने गमावल्यानंतर त्यांनी विजेतेपदास गवसणी घातली होती. मुंबई संघाबाबत ‘धक्का स्टार्ट गाडी’ असंही म्हटलं जातं. ही गाडी सुरू होण्यासाठी, म्हणजेच विजयपथावर येण्यासाठी, वेळ लागतो; पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. कारण, त्या वेळी आठ संघ होते, आता १० संघांची लीग आहे. आठ संघ असताना प्लेऑफ गाठण्यासाठी किमान सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक असायचं. म्हणजेच, सहा सामने गमावले तरी निभाव लागू शकेल अशी समीकरणं इतर संघांच्या गुणांवरही अवलंबून असायची. आता दहा संघ आहेत. यातील चारच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. चुरस तीव्र असणार आहे. त्यामुळे किमान नऊ सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबई संघानं उरलेले आठ सामने जिंकले तरी ही ‘गाडी गॅरेजमध्येच’ राहण्याची शक्यता अधिक आहे.

मुंबई-चेन्नई...हम साथ साथ है!

आयपीएलच्या १४ मोसमांपैकी मुंबई आणि चेन्नई हे संघ अनुक्रमे पाच वेळा आणि चार वेळा विजेते राहिले आहेत. या दोन्ही संघांतील द्वंद्व म्हणजे आयपीएलचा खरा थरार असंही समजलं जातं. आयपीएलवर अधिराज्य गाजवणारे हे दोन संघ यंदाच्या दारुण अपयशातही साथ साथ आहेत...काय हा योगायोग!

कोणती आहेत प्रमुख कारणं?

  • ईशान किशनसाठी त्यांना १५ कोटींहून अधिक खर्च; पण तेवढ्या मोलाची कामगिरी त्याच्याकडून नाही.

  • पुढच्या वर्षीपासून जोफ्रा आर्चर आपल्या संघात यावा यासाठी खिशात असलेली मोठी रक्कम खर्च केली.

  • या दोन खेळाडूंवर अधिक खर्च केल्यामुळे इतर खेळाडू संघात घेता आले नाहीत.

  • जसप्रीत बुमरानंतर बासिल थंपी हा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज.

  • मॅचविनर फिरकी गोलंदाजाचा अभाव.

  • रोहित शर्मा, कायरन पोलार्डचं अपयश.

  • सुमार क्षेत्ररक्षण, सोडले जाणारे सोपे झेल.

  • मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने, मेंटॉर सचिन तेंडुलकर, संघसंचालक झहीर खान यांच्या मार्गदर्शनाचाही सकारात्मक परिणाम नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com