भुवनेश्वरची चित्रकारिणी

ओडिशा राज्याची राजधानी, भुवनेश्वर ही मंदिरांची नगरी आहे. त्रिभुवनेश्वर म्हणजे शिवांची नगरी असलेल्या ह्या पवित्र जागेला शैव पुराणांमधून ’एकाम्रक्षेत्र’ किंवा हरक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
Bhubaneshwar
BhubaneshwarSakal

ओडिशा राज्याची राजधानी, भुवनेश्वर ही मंदिरांची नगरी आहे. त्रिभुवनेश्वर म्हणजे शिवांची नगरी असलेल्या ह्या पवित्र जागेला शैव पुराणांमधून ’एकाम्रक्षेत्र’ किंवा हरक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सूर्यक्षेत्र कोणार्क, हरीक्षेत्र जगन्नाथपुरी आणि शिवक्षेत्र भुवनेश्वर ही तिन्ही ठिकाणे मिळून ओडिशा राज्याचा सोनेरी त्रिकोण होतो.

मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हा परिसर महामेघवहन राजवटीच्या आधिपत्याखाली आला. खारवेल हा या राजकुलातला सगळ्यात महान राजा. त्याने भारतदिग्विजय केला होता. भुवनेश्वरजवळील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांमध्ये त्याने खोदलेला शिलालेख आहे जो हाथीगुंफा शिलालेख ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

पुढे सातव्या शतकात केसरी नावाच्या सोमवंशी राजघराण्याने कलिंगमध्ये आपले राज्य स्थापन केले. भुवनेश्वरमधले सर्वांत प्रसिद्ध असे लिंगराज मंदिर याच राजवंशाने बांधले. त्यांच्यानंतर गंग राजवंशाने चौदाव्या शतकापर्यंत कलिंग देशावर राज्य केले. त्यांची राजधानी कलिंगनगरा सध्याच्या भुवनेश्वर शहराच्या ठिकाणी होती. भुवनेश्वर मधली बहुतेक सर्व जुनी मंदिरे ह्या दोन राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान बांधली गेली.

अगदी आजही भुवनेश्वर आणि आसपासच्या परिसरात शेकडो लहानमोठी पुरातन मंदिरे आपल्याला दिसतील. आज आपण बघणार आहोत हे मंदिर आहे चित्रकारिणी देवीचे, म्हणजे सरस्वतीचे. जुन्या भुवनेश्वरमध्ये प्रसिद्ध लिंगराज मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. पण लिंगराज मंदिरामध्ये कायम पर्यटकांची, भाविकांची गर्दी असते. चित्रकारिणी मंदिर मात्र त्या मानाने अगदीच शांत आहे.

सरस्वती ही विद्येची देवता, कलेची अधिष्ठात्री. साहजिकच तिचे मंदिर विद्यार्थीप्रियच असणार. अगदी आजही ह्या मंदिराच्या आवारात आसपासच्या वस्तीतले विद्यार्थी येऊन अभ्यास करताना दिसतात. मी गेले तेव्हा काही अभियांत्रिकीचे विद्यार्थी मिळून मंदिराच्या बाहेर बसून अभ्यास करत होते. विचारलं तर म्हणाले ‘यहाँ माँ सरस्वती का वास है’. मंदिर समूह पंचायतन पद्धतीचा आहे. मधोमध मुख्य रेखा मंदिर आणि त्याचा पिढा पद्धतीचा जगमोहन आणि चारी बाजूंना परिसर देवतांची चार रेखा मंदिरे, त्यांच्यापुढे जगमोहन नाही. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे, आणि आकाराने फार भव्य नसले तरी अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहे.

साधारण तेराव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधले गेले असे मानले जाते. गंग राजा नरसिंह देव प्रथम या महापराक्रमी राजाने बंगालच्या मुसलमान सुलतानाला हरवून यवनवाणीबल्लव आणि अमीरमानमर्दन अशा दोन उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक सल्तनतीवर निर्णायक विजय मिळविला. कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर हे त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे तर भुवनेश्वरचे चित्रकारिणी मंदिर त्याच्या कलाप्रियतेचे, रसिकतेचे.

कलिंग मंदिराचे साधारण दोन आडवे भाग करता येतात, जमिनीपासून जिथे शिखर सुरू होते, तिथपर्यंतचा भाग म्हणजे बडा किंवा भिंत आणि नंतर वरवर चढत जाणारं शिखर म्हणजे, गंडी. बडा म्हणजे भिंतीचेही खालून वर असे चार आडवे थर पाडता येतात, सगळ्यात खालचा थर म्हणजे पिष्टी किंवा पीठ, ज्यावर सर्व वास्तूचा डोलारा उभा असतो. त्यावर पभाग म्हणजे प्रभाग, हा वेगवेगळ्या थरांनी मिळून बनलेला असतो. त्यानंतर येतो तो भिंतीचा मोठा भाग ज्यात देवकोष्ठे बसवलेली असतात. त्याला नाव आहे जंघा. त्यावरचा शिखराला जोडणारा भाग म्हणजे बरंडा.

तसेच बडाचे म्हणजे गर्भगृहाच्या भिंतीचे उभे स्तरही असतात. गर्भगृहाच्या प्रत्येक भिंतीला दोन दिशांना दोन कोन असतात त्याना लागून असलेले स्तर म्हणजे कणिका पग आणि मधला एक स्तर म्हणजे रह-पग असे तीनच स्तर प्रत्येक भिंतीला असले तर त्या मंदिराला त्रिरथ मंदिर असे नाव आहे. पुढे मंदिरांचे आकार वाढले, भिंती उंचीला आणि रूंदीलाही भरपूर वाढल्या त्यामुळे अजून उभे स्तर रह-पग आणि कणिका-पगाच्या मध्ये निर्माण झाले. त्यांना अनुरथ पग आणि प्रतिरथ पग अशी नावे मिळाली आणि त्रिरथ मंदिर मोठे होऊन पंचरथ, सप्तरथ आणि अगदी क्वचित नवरथही झाले.

चित्रकारिणी मंदिराचे रेखा देऊळ सप्तरथ प्रकारचे आहे तर जगमोहन पंचरथ पद्धतीचे आहे. जगमोहनाच्या भिंतीवरची जंघा दोन भागात विभागलेली आहे, खालच्या भागात पाच स्तंभांवर मिथुन शिल्पे कोरलेली आहेत तर उत्तरेकडच्या भिंतीवर वरच्या भागात वेणूगोपाळाचे सुंदर शिल्प आहे. दक्षिणेकडच्या भिंतीवर खालची स्तंभनक्षी तीच आहे पण वरचे शिल्प शिव-पार्वतीविवाहाचे आहे.

बरीच शिल्पे दुर्दैवाने पुढे सोळाव्या शतकात मुस्लीम सुलतान काळा पहाडाच्या स्वारीत उध्वस्त केलेली आहेत. मंदिराच्या आवारात बरेच भग्नावशेष असेच पडलेले आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आता शांत सरस्वती नाही तर रौद्र चामुंडा आहे. त्यामुळे एक गूढ वातावरण अनुभवायला मिळते. छोटेसेच असले तरी चित्रकारिणी देवीचे हे मंदिर मुद्दाम जाऊन बघावे असेच आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com