कांचीपुरमचं कैलासनाथ मंदिर

आज आपण ओळख करून घेणार आहोत ती पल्लव राजांनी बांधलेल्या एका भव्य शिवालयाची. सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहविष्णू या पल्लव राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली.
Kanchipuram Kailashnath Mandir
Kanchipuram Kailashnath MandirSakal

गेल्या तीन लेखांमधून आपण आजच्या तामिळनाडू राज्यात चोळ राजांनी बांधलेल्या तीन भव्य मंदिरांची ओळख करून घेतली; पण तामिळनाडू राज्यात अशी अनेक भव्य मंदिरं आहेत. पल्लव, पांड्य आणि चोळ या तीन राजवंशांनी आजच्या तामिळनाडू राज्याच्या वेगवेगळ्या भागांत आपापली राज्यं स्थापन केली. या तिन्ही राज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, या राजवंशातल्या राजांनी रणांगणात तर शौर्य गाजवलंच पण; कला, स्थापत्य आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांतल्या विद्वानांना उदारहस्ते आश्रयही दिला आणि अनेक भव्य मंदिरंही बांधून घेतली, जी तामिळनाडूमध्ये आजही दिमाखात उभी आहेत.

आज आपण ओळख करून घेणार आहोत ती पल्लव राजांनी बांधलेल्या एका भव्य शिवालयाची. सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहविष्णू या पल्लव राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली. सिंहविष्णूनं कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज करून आपल्या राज्याची व्याप्ती वाढवली. त्याचा पुत्र महेंद्रवर्मा हा मोठा प्रसिद्ध मंदिरनिर्माता होता. त्यानंच चेन्नईजवळच्या महाबलीपुरम इथं मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देवळं खोदून काढण्याचं काम करून घेतलं. ही देवळं आज ‘पांडवरथ’ म्हणून ओळखली जातात. त्यानंच ‘मत्तविलासप्रहसन’ नावाचं संस्कृत प्रहसन लिहिलं. संस्कृत भाषेतलं आज अस्तित्वात असलेलं हे पहिलं प्रहसन!

त्याचा खापरपणतू दुसरा नरसिंहवर्मा यानं कांचीपुरममध्ये कैलासनाथ अथवा राजसिंहेश्वरनामक शिवालय बांधलं. ‘नगरेषु कांची’ या शब्दात साक्षात् कविकुलगुरू कालिदासानं ज्या कांचीपुरमनगरीचं वर्णन केलं आहे, ते कांचीपुरम अगदी आजही तिथल्या मंदिरांसाठी आणि हातमागावर विणलेल्या झोकदार जरी-पदराच्या कांचीपुरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी आजही या शहरात अक्षरशः पावलागणिक एक मंदिर आहे. आज कांचीपुरम कामाक्षीदेवीच्या मंदिरासाठी ओळखलं जात असलं तरी कांचीपुरममध्ये शिवाची, विष्णूची आणि देवीची मिळून हजारभर तरी लहान-मोठी मंदिरं असतील. त्यातलं सगळ्यात पुरातन मंदिर म्हणजे ‘कैलासनाथार कोविल’ किंवा कैलासनाथाचं मंदिर.

सध्याच्या कांची शहराच्या एका कोपऱ्यात असलेलं हे भव्य मंदिर इसवीसनाच्या आठव्या शतकात पल्लव राजा राजसिंह नरसिंहवर्मन दुसरा यानं बांधायला सुरुवात केली. पुढं त्याचा मुलगा महेंद्रवर्मन तिसरा यानं हे मंदिर पूर्ण केलं. दगडावर दगड रचून बांधलेलं हे पल्लव द्रविड स्थापत्यशैलीतलं पहिलं मंदिर. यापूर्वी, आधी सांगितल्यानुसार, पल्लव राजांनी महाबलिपुरमची एकपाषाणी मंदिरं बांधली होती. त्याआधी कदाचित लाकडी मंदिरंही बांधली असावीत; पण काळाच्या ओघात ती लुप्त झाली.

कांचिपुरमचं कैलासनाथमंदिर मात्र आज इतक्या शतकांनंतरही दिमाखात उभं आहे. या मंदिराचं मूळ नाव राजसिंहेश्वरमंदिर होतं, असे इथल्या शिलालेखात उल्लेख आहेत. स्वतः महाराजा राजसिंह नरसिंहवर्मननं या मंदिराचा उल्लेख ‘कांची महामणी’ म्हणजे ‘कांचीचं सगळ्यात सुंदर रत्न’ असा केला आहे. भगवान श्रीशिवशंकरांचं हे भव्य मंदिर इथल्या शिवशिल्पांसाठी प्रख्यात आहे.

दक्षिण भारतातल्या उत्तुंग शिवमंदिरांमधून श्रीशिवशंकरांच्या मूर्तींचं ‘शिवागम’ या ग्रंथामधून वर्णिलेले अनेक आविष्कार मंदिरांच्या बाह्य भिंतींवर आणि स्तंभांवर कोरलेले असतात. शंकरांची पार्वतीशी विवाह करतानाची कल्याणसुंदरमूर्ती, अंधकासुराचा वध करतानाची अंधकासुरवधमूर्ती, नृत्यमग्न शिवतांडवमूर्ती, शिव-पार्वतीसोबत कार्तिकेय असलेली सोमस्कंदमूर्ती, प्रकृती आणि पुरुष ही सृष्टीची दोन वेगळी; तरीही परस्परांना पूरक अशी तत्त्‍वं आहेत हे दर्शवणारी अर्धनारीनटेश्वराची मूर्ती, उग्र अशी भैरवमूर्ती, सौम्य अशी ध्यानमग्न दक्षिणामूर्ती असे कितीतरी शिवमूर्तींचे नयनमनोहर आविष्कार दक्षिणेतल्या शिवमंदिरांमधून दिसतात.

कांचीपुरमचं कैलासनाथमंदिर शिवांच्या सुंदर मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेल्या प्रत्येक शिवशिल्पाच्या चेहऱ्यावर एक गूढ, नयनमनोहर असं मंदस्मित आहे. त्या स्मिताबद्दल असं सांगतात की, वातापीच्या चालुक्यांची आणि कांचीच्या पल्लवांची अनेक पिढ्या लढाई चालू होती. कधी पल्लवांची सरशी व्हायची, तर कधी चालुक्यांची; पण धर्मांध परकीय आक्रमकांसारखी या दोन राजवंशांची विध्वंसक वृत्ती नसल्यामुळे त्यांनी एकमेकांच्या देवगृहांचा सदा आदरच केला. कांचीच्या या कैलासमंदिराविषयी असं सांगतात, की हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर काही दशकांतच चालुक्य राजा विक्रमादित्यानं कांचीवर स्वारी केली आणि विजय मिळवला. विजयी राजा म्हणून जेव्हा विक्रमादित्य हे मंदिर बघायला वाजत-गाजत आला तेव्हा इथल्या शिवमूर्तींच्या मंद स्मितानं त्याला इतकं प्रभावित केलं, की त्यानं या मंदिराला दाने तर देऊ केलीच; पण इथलेच स्थपती त्यानं आपल्या राज्यातल्या पट्टडक्कलला नेऊन तिथं विरूपाक्षाचं भव्य मंदिर उभारलं.

प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक आर. नागास्वामींच्या मते, ‘हे एक मंदिर जर आपण समजून घेतलं तर आपल्याला संपूर्ण द्रविड हिंदुमंदिरांचं स्थापत्य कसं असेल ते समजू शकतं. कांचीपुरमचं हे कैलासनाथमंदिर म्हणजे पल्लव स्थापत्यकलेचा परमोत्कर्षबिंदू आहे.’

मंदिराच्या दर्शनी प्राकारभिंतीच्या आतल्या बाजूला अनेक देवकोष्ठे आहेत, ज्यांमध्ये शिवांच्या विविध अवस्थितीतल्या मूर्ती बघायला मिळतात. मंदिराच्या दर्शनी भिंतीतल्या देवकोष्ठांमध्ये भिक्षाटनशिव, नृत्यशिव, लिंगोद्भवशिव, गंगाधरशिव, किरातार्जुनयुद्ध या अप्रतिम शिवप्रतिमा बघायला मिळतात. द्राविड स्थापत्यशैलीची सगळी वैशिष्ट्यं, म्हणजे शिखरावरची स्तूपी, मुख्य मंडपाबाहेरचा मुखमंडप, भव्य रंगमंडप, अंतराळ आणि गर्भगृह इथं पूर्णपणे विकसित झालेली बघायला मिळतात. याच मंदिरापासून प्रेरणा घेऊन चालुक्यांनी पट्टडक्कल इथलं विरूपाक्षमंदिर आणि राष्ट्रकूटांनी वेरूळचं कैलासनाथमंदिर बांधून घेतलं.

या मंदिराचा पाया आणि बाहेरची दर्शनी भिंत ही कठीण अशा ग्रॅनाईट दगडात बांधलेली आहे; पण आतल्या मंदिरासाठी काहीसा मऊ असा वालुकाष्म दगड वापरलेला आहे. काळाच्या ओघात हा वालुकाष्म दगड काहीसा झिजून गेलाय आणि त्यामुळे बऱ्याच शिल्पांचे बारकावे आणि चेहऱ्यावरचे भाव आता तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत, तरीही जे उरलंय ते इतकं भव्य आणि सुंदर आहे, की हे मंदिर बघायला आलेली व्यक्ती भारावून गेल्याशिवाय राहत नाही. सध्या या मंदिराची व्यवस्था भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे.

चेन्नईहून स्वतःच्या वाहनानं पहाटे निघालो तर एका दिवसात आपण कांचीपुरमची काही प्रसिद्ध मंदिरं बघून मुक्कामाला चेन्नईला परत येऊ शकतो.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com