कांचीपुरमची कामाक्षी

कांची येथील कामाक्षीमंदिर हे देशातील देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.
Kamakshi Ammanmandir
Kamakshi AmmanmandirSakal

कांचीपुरममधील श्रीविष्णूंना समर्पित वरदराज पेरुमलमंदिर, शिवांना समर्पित एकाम्रेश्वरमंदिर आणि देवी पार्वतीचं कामाक्षी अम्मनमंदिर या तिन्ही मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ म्हणजेच ‘त्रिमूर्तिवास’ असं नाव आहे हे आपण गेल्या वेळच्या लेखात पाहिलं.

आज आपण कांचीपुरमची अधिष्ठात्री देवता, कामाक्षी अम्मनच्या मंदिराला भेट देऊ. शिवांचं एकाम्रेश्वरमंदिर असलेली ‘शिवकांची’ आणि श्रीविष्णूंचं वरदराज पेरुमलमंदिर असलेली ‘विष्णुकांची’ या कांचीपुरमच्या दोन्ही भागांच्या मधोमध असलेली ही ‘शक्तिकांची’ आणि तिथलं हे कामाक्षीचं भव्य मंदिर म्हणजे इतिहास, आख्यायिका, पुराणकथा, द्रविड स्थापत्य आणि भारतीय वास्तुकला यांचा अनोखा संगम आहे. जवळजवळ पाच एकराच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या मंदिराची खासियत म्हणजे इथली पद्मासनात स्थित असलेली देवी कामाक्षीची सुंदर मूर्ती.

कांची येथील कामाक्षीमंदिर हे देशातील देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. शिवपत्नी सतीनं तिचा पिता दक्ष यानं तिच्या पतीचा म्हणजे शिवांचा अपमान केला म्हणून योगाग्नी प्रज्वलित करून देहत्याग केला. प्रिय पत्नीचा वियोग असह्य झालेल्या संतप्त शिवांनी सतीचं अचेतन शरीर खांद्यावर घेऊन भीषण तांडव सुरू केलं. सर्व ब्रह्मांड डळमळू लागलं तेव्हा इतर देवांनी भयभीत होऊन श्रीविष्णूंना विनवलं आणि श्रीविष्णूंनी आपलं सुदर्शनचक्र सोडून सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे जिथं जिथं पडले तिथं तिथं देवीची मंदिरं निर्माण केली. ती देवीची शक्तिपीठं. सतीदेवीची नाभी जिथं पडली नेमकं तिथंच कांचीपुरमचं हे कामाक्षीमंदिर उभारलं आहे असा भाविक हिंदूंचा विश्वास आहे. या नाभीस्थानाचं प्रतीक असलेला एक रौप्यस्तंभ मंदिराच्या गाभाऱ्यात आजही दिसतो. नाभीचं प्रतीक म्हणून या खांबाला मधोमध एक छोटंसं छिद्र आहे.

मूळ मंदिराची वास्तू कधीची आहे याबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नाही; पण मूळ वास्तू सहाव्या शतकापासूनच्या आधीची पल्लव राजांनी बांधलेली वास्तू असावी. मंदिराच्या मंडपातील पल्लवकालीन सिंहशिल्पे याची साक्ष देतात. पुढं चोळ/चोल राजांनी मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यानंतर पांड्य राजे, विजयनगरचे राजे आणि मदुराईचे नायक या सर्व राजवंशांनी या मंदिराला सढळ हस्ते राजाश्रय दिला.

पल्लव राजे तसंच चोळ राजे परंतक, राजा राजा, राजेंद्र चोल द्वितीय आणि कुलोत्तुंग तृतीय यांच्या कारकीर्दीत कोरले गेलेले शिलालेख आजही या मंदिराच्या बाराशे वर्षांच्या इतिहासाचा पुरावा देतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, इथं पूजल्या जाणाऱ्या कामाक्षीदेवीचं म्हणजे पार्वतीदेवीचं स्वरूप हे ‘अविवाहित स्वरूप’ समजलं जात. मदुराईची मीनाक्षी आणि काशीची विशालाक्षी ही दोन्ही देवींची स्वरूपं ही ‘विवाहित स्वरूपं’ समजली जातात; पण कांचीची कामाक्षी ही सुईच्या अग्रावर उभी राहून शिवासाठी तपस्या करणारी कुमारिका आहे.

असं म्हणतात की कामाक्षीदेवी ही तापसी असल्यामुळे रौद्र स्वरूपात या मंदिरात विराजमान असायची; पण आदी शंकराचार्यांनी ‘सौंदर्यलहरी’ हे स्तुतीपर स्तोत्र रचून देवीला शांत केलं आणि तेव्हापासून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामाक्षी बनून शांत स्वरूपात देवी या मंदिरात नांदते आहे. स्वतः श्रीशंकराचार्यांनी स्थापित केलेलं श्रीयंत्र आजही या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीच्या पायापाशी असल्याचं दाखवलं जातं. कामाक्षीदेवीची गाभाऱ्यातली मूर्ती गंडकी पाषाणापासून तयार करण्यात आलेली असून ती अत्यंत सुरेख आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला गायत्रीमंडप असं नाव आहे. कामाक्षी अम्मन ब्रह्मासनावर पद्मासन घालून बसलेली आहे. तिला चार हात आहेत, खालच्या दोन्ही हातांत इक्षुकोदंड म्हणजे उसाचं धनुष्य आणि पाच फुलांचा पुष्पशर आहे, तर वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आहेत. देवीच्या डाव्या खांद्यावर एक पोपट आहे. देवी नेहमीच सालंकृत आणि फुलांनी सजवलेली असल्यामुळे मूर्तीचं मूळ सौंदर्य बघता येत नाही; पण मूर्तीच्या चेहऱ्यावरच्या शांत भावावरून आपण मूर्तीच्या सौंदर्याची कल्पना करू शकतो.

असं मानलं जातं की कामाक्षी अम्मनमंदिराच्या गर्भगृहाच्या चार भिंती या चार वेदांचं प्रतीक आहेत, तर गायत्रीमंडपातील २४ खांब हे गायत्रीछंदाच्या 24 अक्षरांचं प्रतिनिधित्व करतात. गर्भगृहाच्या मुख्य दरवाजाला बिल्वद्वार असंं नाव आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावरील शिखराला सोन्याचा पत्रा मढवलेला आहे. तो सकाळच्या उन्हात झळाळत असताना बघणं हा एक सुंदर अनुभव आहे.

कामाक्षी अम्मनमंदिराचं आजचं बहुतेक बांधकाम हे साधारणतः चौदाव्या शतकाच्या आसपासचं असलं तरी हे मंदिर फार पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेले तमिळ शैव संतकवी नायनमार यांची पदं असलेल्या ‘तेवारम’ या ग्रंथात अप्पर आणि सुंदरार यांनी कामकोट्टम कांचीचा उल्लेख केला आहे, तर सातव्या शतकातील संगमकवी आदियारकुनाल्लार यांनी ‘कांचीकोत्ता कामाक्षी’ हे पद रचलं आहे, तर भागवतपुराणात बलारामाच्या तीर्थयात्रेच्या कथेत कामकोटीपुरी कांचीचा उल्लेख आहे, म्हणजेच हे शक्तिस्थल फार पुरातन काळापासून उपासनेत आहे.

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला अन्नपूर्णादेवी आणि सरस्वतीची स्वतंत्र मंदिरं आहेत. दुर्वास ऋषी आणि आदी शंकराचार्यांचीही मंदिरं इथं आहेत. दुर्वास ऋषींनी इथं देवीची प्रार्थना केली आणि प्रथम श्रीचक्र स्थापित केलं असं मानलं जातं. ‘सौभाग्यचिंतामणी कल्प’ या आपल्या ग्रंथात दुर्वास ऋषींनी लिहून ठेवलेला विस्तृत पूजाविधी आजही या मंदिरामध्ये अनुसरला जातो.

विशेष म्हणजे, श्रीविष्णूंच्या ‘१०८ दिव्य देसम’ मंदिरांपैकी एक थिरुवलनूर, जिथं श्रीविष्णूंची वराहस्वरूपात पूजा करण्यात येते, तेही मंदिर कामाक्षी अम्मनमंदिराच्याच प्राकारात आहे. मंदिरप्राकाराच्या चारी बाजूंना गोपुरे आणि दरवाजे आहेत. गोपुरांवर सुरेख संदला-शिल्पन किंवा स्टको वर्क आहे. चुना, बारीक रेती, जिप्सम, पाणी यांचं मिश्रण घोटून तयार केलेला गुळगुळीत गिलावा म्हणजे संदला किंवा सानला आणि या मिश्रणाचा उपयोग करून केलेली गोपुरावरची मूर्तिशिल्पनिर्मिती म्हणजे संदला-शिल्पन. कामाक्षी अम्मनमंदिराच्या गोपुरावरची संदला शिल्पे आवर्जून बघण्यासारखी आहेत.

भारतातल्या शाक्तपरंपरेचं भूषण असलेलं हे कांचीपुरमचं कामाक्षी अम्मनमंदिर बघितल्याशिवाय तुमची ‘कांचीयात्रा’ पूर्ण होऊच शकत नाही.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com