लाल विटांचं सिरपूरचं लक्ष्मणमंदिर

प्रख्यात कला इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार सिरपूरचे लक्ष्मण मंदिर इसवीसन ५२५ ते ५४० च्या दरम्यान बांधले गेले.
Laxman Mandir
Laxman MandirSakal

छत्तीसगड म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती तिथली आदिवासी संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगले. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की भारतातले सर्वांत जुने विटांनी घडलेले मंदिर छत्तीसगड राज्यात सिरपूर येथे आहे? रायपूर जवळील महासमुंद जिल्ह्यात महानदीच्या तीरावर सिरपूर हे आजचे छोटे गांव प्राचीन काळी श्रीपूर म्हणून ओळखले जात असे. महाकोसल राज्याची वैभवसंपन्न राजधानी होती श्रीपूर. श्रीपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आजही तिथल्या प्राचीन इतिहासाच्या खुणा पदोपदी सापडतात. यातील एक प्रमुख ठिकाण म्हणजे सिरपूरचे लक्ष्मण मंदिर.

हे मंदिर देशात सापडलेले सर्वांत जुने लाल विटांनी बांधलेले मंदिर आहे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दीड हजार वर्षांहूनही जास्त जुने असलेले हे मंदिर भूकंप, पूर, विध्वंसक इस्लामी आक्रमणे आदी अनेक विनाशकारी आपत्तींना तोंड देऊनही भक्कम उभे आहे.

प्रख्यात कला इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार सिरपूरचे लक्ष्मण मंदिर इसवीसन ५२५ ते ५४० च्या दरम्यान बांधले गेले. श्रीपूर येथे एकेकाळी महाकोसलवर राज्य करणाऱ्या सोमवंशी राजांचे राज्य होते. हे राजे शैव होते. या शैव राजांपैकी एक राजा होता सोमवंशी हर्षगुप्त. पण त्याची पत्नी राणी वस्तादेवी ही मगध राजा सूर्यवर्मा यांची मुलगी परम विष्णुभक्त होती. राजा हर्षगुप्ताच्या मृत्यूनंतर राणीने आपल्या पतीच्या आठवणीसाठी हे मंदिर बांधले. ती सती गेली नाही की विधवा म्हणून रडतही बसली नाही. आपल्या मुलाच्या नावाने तिने काही वर्षे राज्यकारभार चालवला आणि हे भव्य, सुंदर मंदिर बांधवून घेतले. तेही दीड हजार वर्षांपूर्वी. हिंदू स्त्रीला पती निधनानंतर समाजात काहीच अधिकार नव्हते म्हणणाऱ्या लोकांना दुर्दैवाने अशा गोष्टी दिसत नाहीत!

उत्तरभारतात प्रचलित असलेल्या नागर शैलीत बांधलेले हे मंदिर भारतातील पहिले लाल विटांनी बांधलेले मंदिर मानले जाते. लक्ष्मण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात विटांवर कोरून नाजूक कलाकृती बनवल्या गेल्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. सामान्यतः अशी सुंदर कोरीवकामे दगडावरच केली जातात कारण दगड हे एक कठीण आणि टिकाऊ असे माध्यम असते. भाजलेली वीट मऊ आणि ठिसूळ असते. कोरीव काम करताना सहज तुटू शकते. पण सिरपूरच्या लक्ष्मण मंदिरावरचे कोरीव काम अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे.

सामान्यतः नागर मंदिरात असतात तसे गर्भगृह, अंतराळ आणि सभा मंडप हे लक्ष्मण मंदिराच्या रचनेचे मुख्य भाग होते. दुर्दैवाने आता सभामंडप उध्वस्त झालेला आहे. अंतराळ आणि गर्भगृह शाबूत आहेत. विशेष म्हणजे मंदिर लाल विटांचे असले तरी खालचा चौथरा हा वोल्कॅनिक बॅसाल्ट म्हणजे जांभ्या दगडात उभारलेला आहे. हा दगड ह्या भागात मिळत नाही. तो ओडिशातून महानदी मार्गे गलबतांमधून आणला गेला असावा असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे.

या मंदिराच्या गर्भगृहाची पूर्ण दगडी द्वारशाखा हे ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. द्वारशाखेवरच्या ललाटपट्टावर शेषशायी भगवान विष्णुची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. ब्रह्मा मूर्तीच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान आहे. देवी लक्ष्मी भगवान विष्णुच्या चरणी बसलेली आहे. या ललाटपट्टावरून असे वाटते की आज जरी या मंदिराला लक्ष्मण मंदिर म्हणून ओळखत असले तरी हे एकेकाळी श्रीविष्णुचे मंदिर असावे. येथे उत्खननात सापडलेली श्रीविष्णुची एक भग्नावस्थेतीतली एक अत्यंत सुंदर मूर्ती शेजारच्याच म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ती मूर्ती एकेकाळी या गर्भगृहात असली पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. द्वारशाखेवर एका बाजूला भगवान विष्णुचे दशावतार चित्रित केले गेले आहेत. सध्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती आहे ती लक्ष्मणाची मानली जाते. ही मूर्ती पाच मस्तके असलेल्या शेषनागावर विराजमान आहे.

सिरपूरचे लक्ष्मण मंदिर पारौली आणि भितरगावच्या गुप्त मंदिरांच्या परंपरेतील मानले जाते. १९५४ आणि १९७७ च्या उत्खननात, नंतरच्या गुप्त काळातील मंदिरांचे अवशेषही सिरपूर येथे सापडले आहेत. सिरपूरचे वर्णन करणारा उल्लेख ताम्रपट्ट जवळच्याच राजीम येथे उत्खननात सापडला आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, पुढे बाराव्या शतकात सिरपूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने तत्कालीन श्रीपूरचे संपूर्ण वैभव हिरावून घेतले. या भूकंपात संपूर्ण श्रीपूर नष्ट झाले पण हे लक्ष्मण मंदिर होते तसेच राहिले. पण त्यानंतर तेराव्या शतकाच्या दरम्यान, महानदीच्या भयंकर पूराने सिरपूरमध्ये हाहाकार केला.

पुढे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर वारंगलच्या काकतीय राज्याच्या हद्दीत वसले होते. पण १३१० मध्ये, जेव्हा अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने आपल्या सैन्यासह दक्षिणेवर स्वारी करून तिथल्या देवस्थानांचा विध्वंस केला तेव्हा सिरपूरवरही हल्ला करून तिथली मंदिरे आणि बौद्धविहार त्याने उध्वस्त केले असे अमीर खुसराऊ याने आपल्या बखरीत नमूद केले आहे. या सर्व विनाशकारी आपत्तींमुळे सिरपूरची अनेक मंदिरे आणि देवस्थाने तोडली गेली आणि पुढे अनेकदा महानदीला आलेल्या पुरात त्यांचे अवशेष मातीत बुडून गेले, आणि सिरपूर हळूहळू लोकांच्या विस्मृतीत गेले. १९७७ मध्ये झालेल्या उत्खननात छत्तीसगडचे नावाजलेले पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण कुमार शर्मा ह्यांनी इथली बरीच नवी मंदिरे शोधून काढली. आज सिरपूर मध्ये पाहण्यासारखे खूप आहे. सिरपूर रायपूर विमानतळापासून पंचाहत्तर किमी अंतरावर आहे. पूर्ण दिवस इथली विविध मंदिरे, बौद्ध विहार आणि इतर पुरातन अवशेष बघताना कसा जातो तेच कळत नाही.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com