

Shivaji Maharaj Agra Visit
esakal
आदिलशाहीची राजधानी विजापूर जिंकण्याची योजना फसल्यानंतर; शिवाजीराजे, आदिलशाही व कुत्बशाही हे तिघे आपल्याविरुद्ध चालून येतील अशी भीती जयसिंहाला वाटू लागली. त्यामुळे औरंगजेबाच्या आदेशावरून ऐनकेनप्रकारे शिवाजीराजांना बादशाहाच्या भेटीसाठी जाण्यास जयसिंहाने राजी केले.
आग्रा भेटीची पार्श्वभूमी ः खरे पाहता, मिर्झाराजासोबतच्या तहात राजांनी अशी अट घातली होती की, त्यांच्यावर मुघली मनसब स्वीकारण्याची सक्ती केली जाणार नाही किंवा मुघल दरबारात उपस्थित राहण्याचीही आवश्यकता भासणार नाही. मात्र विजापूरवरील पराभवानंतर दख्खनेतील राज्यकर्ते मुघलांविरुद्ध एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे राजांना दख्खनेतून दूर पाठविणे जयसिंहासाठी आवश्यक झाले होते. त्यामुळे त्याने राजांना बादशाहाच्या भेटीसाठी राजी करण्याकरिता अनेक युक्त्या वापरल्या. अखेर राजांनी आग्र्याला जाण्याचे निश्चित केले. औरंगजेबासारख्या कपटी माणसाच्या भेटीसाठी जाण्यास प्रचंड धोका असतानाही राजांनी तो का पत्करला असेल? याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे, आदिलशाही व कुत्बशाही जिंकण्यासाठी राजांना दख्खनमधील मुघली सैन्याचे सेनापतीपदी देण्याचे आमिष जयसिंहाने दाखविले. मुघली साम्राज्याची अफाट संसाधने हाती आली तर त्याचा स्वराज्यासाठी मोठा फायदा होईल, हे राजांनी ओळखले. शिवाय जयसिंहाने मुघली दरबारात राजांच्या सुरक्षेची व आग्र्याहून सुखरूप परत येण्याची अत्यंत गंभीर शपथ घेतल्याने राजांनी जाण्याचे निश्चित केले.