चेतना तरंग : पाच अंतर्दृष्टिकोन

प्रेम हा तुमचा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रेमाला जेव्हा व्यक्त होण्याची संधी मिळते, तेव्हा तुमचे प्रेम एखाद्या बाह्य वस्तूमध्ये गुंतते.
चेतना तरंग
चेतना तरंग sakal

प्रेम हा तुमचा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रेमाला जेव्हा व्यक्त होण्याची संधी मिळते, तेव्हा तुमचे प्रेम एखाद्या बाह्य वस्तूमध्ये गुंतते. तुमची दृष्टी बाह्यजगतात अडकून पडते, तेव्हा तुमच्या स्वभावाकडे परत येण्यासाठी एक अंतर्दृष्टीची आवश्यकता असते.

  • पहिले ज्ञान वा अंतर्दृष्टी आहे वेदना. वेदना तुम्हाला बाह्यवस्तूपासून दूर करून तुमच्या शरीराकडे व मनाकडे वळवते.

  • ऊर्जा हे दुसरे ज्ञान आहे. ऊर्जेचा एक किरण तुम्हाला तुमच्या स्वत्वाकडे परत आणतो.

  • ईश्वरी अथवा दैवी प्रेम हे तिसरे ज्ञान आहे. दैवी प्रेमाची एक झलकदेखील तुम्हाला अतिशय परिपूर्ण करते आणि इतर सर्व सुखोपभोगांपलीकडे नेते.

  • परमानंद ही चौथी अंतर्दृष्टी होय. शारीरिक अस्तित्वाची अंशतः जाणीव ठेवून आपल्या चेतनेचे उच्च बिंदूपर्यंत उच्चाटन होते, त्या अवस्थेला परमानंद म्हणतात.

  • अद्वैताची ओळख वा जाणीव ही पाचवी अंतर्दृष्टी आहे. सर्व काही एकच आहे, एकात्म आहे. दुसरे असे काही नाही, ही जाणीव आपल्या दृष्टीला स्रोताकडे परत आणते.

  • प्रेम जेव्हा वाढत जाते, तेव्हा परमानंद असतो.

  • प्रेम वाहते होते, तेव्हा करुणा असते.

  • प्रेमाचा स्फोट होतो, तेव्हा ते क्रोध असते.

  • प्रेम नासते, तेव्हा ते मत्सर होते.

  • प्रेम पूर्ण नकारात्मक होते, तेव्हा ते घृणा बनते.

  • प्रेम कृतिशील होते, तेव्हा परिपूर्ण होते.

  • प्रेम जाणते, तेव्हा ते ‘मी’ असते.

साधकाची सहा चिन्हे

१. आपल्याला खूप कमी ज्ञान आहे याची कबुली ः अनेक लोक ज्ञान नसतानाही आपल्याला खूप सारे ज्ञान आहे, असे समजतात. आपल्या मर्यादित ज्ञानात ते अडकून पडतात. त्यामुळे नवे काही शिकत नाहीत. साधक मात्र सुरवातीलाच जाणतो की त्याला खूपच कमी ज्ञान आहे.

२. नवे शिकायची तयारी ः अनेक लोक आपल्याला खूप कमी ज्ञान आहे, हे कबूल करतात, पण नवे काही शिकायला तयार नसतात. ते साधक नव्हेत.

३. नव्या गोष्टी जाणण्याची तयारी आणि स्वतःचीच मते न बनवणे ः काही लोक नवे शिकायला तयार तर असतात, पण त्यांच्या पूर्वग्रहीत धारणा आणि बंद असलेली मने त्यांना शिकू देत नाहीत.

४. ज्ञानाच्या मार्गावर राहण्याचा पूर्ण एककेंद्रित संकल्प ः काही लोक खुल्या मनाचे असतात, पण ते एककेंद्रित नसतात आणि संकल्पाला चिकटून राहात नाहीत. ते वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्ञानाचे तुकडे उचलू पाहतात, पण या मार्गावर प्रगती करत नाहीत.

५. सत्य आणि सेवा यांना आत्मसुखाहून अधिक प्राधान्य देतात ः काहीवेळा एककेंद्रित आणि संकल्पशील लोकसुद्धा क्षणैक सुखोपभोगासाठी मार्गावरून भरकटतात.

६. संयम आणि सहनशीलता ः काही लोक एककेंद्रित आणि संकल्पाला धरून असतात, क्षणैक सुखांच्या नादी लागत नाहीत पण तरीही त्यांना संयम नसतो आणि सहनशीलता नसते. ते सतत निराश आणि चंचल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com