कोणता झेंडा घेऊ हाती? (अरविंद जगताप)

The story behind title song of marathi movie Zenda by Arvind Jagtap
The story behind title song of marathi movie Zenda by Arvind Jagtap

सुरवातीच्या काळात राज्यकर्त्यांचं बरं होतं. कार्यकर्त्याच्या घरचे त्याला सांभाळून घ्यायचे. कार्यकर्ता तसाच कुणाच्या तरी सतरंज्या उचलत म्हातारा व्हायचा आणि शेवटी घरातल्या बाजेवर पडून पडून शेवटचा श्वास घ्यायचा. आता तशी परिस्थिती नाही. ही सगळी अशी परिस्थिती बघत होतो. विचार करत होतो. तेव्हा अवधूत गुप्तेनं गाणं लिहायला सांगितलं. शब्द सहज येत गेले. जणू पाठ असल्यासारखे. आपल्याच माणसांची कैफियत होती. खरंतर आपलीच!

लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो. कुठलीही गोष्ट घडली, की त्याची कथा होऊ शकते का असा विचार येत असेल तर अवघड आहे. म्हणजे सीमेवर जवान शहीद झाला, की आपल्याला जर लगेच कविता सुचत असेल तर काहीतरी चुकतंय. चिडचिड व्हायला सुरवात होते, आपण अस्वस्थ होतो तोपर्यंत आपण माणसात आहोत असं समजायचं.

खरंतर आपण जेवढं कमी लिहू आणि जास्त वाचू तेवढं आपल्यासाठी आणि समाजासाठी चांगलं असतं. पोपटराव पवार यांचं समृद्ध हिवरेबाजार बघितल्यावर किती सरपंचाना स्वतःच्या नावापुढे ‘कार्यसम्राट’ असं लावावं वाटेल? साने गुरुजी, अण्णा भाऊ साठे, चिं. वि. जोशी, भालचंद्र नेमाडे वाचल्यावर आपण कशाला कागद काळे करायचे असं वाटू लागतं. हे न लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. जो जेवढा कमी लिहितो तो तेवढा बरा लेखक असतो.

मुळात लेखकासारखं जगता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी लिहिलं, मुक्ताबाईंनी लिहिलं. निवृत्तीनाथांनी नाही लिहिलं; पण त्यांचं जगणं किती महत्त्वाचं आहे. आपण ज्ञानेश्वरांना ‘माऊली’ म्हणतो आणि या ‘माऊलीची माऊली’ झाले होते निवृत्तीनाथ. शिवाजी महाराजांच्या छायेत वाढलेल्या संभाजी महाराजांचं आयुष्य लेखकाचं होतं. संभाजी महाराजांना दीर्घायुष्य मिळालं असतं, तर त्यांनी नक्कीच इतिहासातली समृद्ध पानं लिहून ठेवली असती; पण दुर्दैवानं इतिहास घडवणाऱ्या माणसांना इतिहास लिहायला सहसा वेळ मिळत नाही. मग आपण इंग्रजांच्या आणि मुघलांच्या कागदपत्रांत आपला इतिहास शोधू लागतो. आपल्या माणसांना त्यांच्या नजरेने बघू लागतो. लोकांच्या चष्म्यातून आपण इतिहासाकडं तर पाहतोच; पण वर्तमानाकडंही विदेशी चष्म्यातून पाहण्याची आपल्याला सवय लागलीय. बोफोर्स असो किंवा राफेल, परदेशांतली वर्तमानपत्रं काय म्हणतात याला आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्व आहे आणि हे घडलंय याला जवाबदार आहे ती सगळ्या पक्षांनी गमावलेली विश्वासार्हता. म्हणूनच आज सामान्य माणसापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ः ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’

झेंड्यांची गर्दी आहे; पण झेंड्याच्या आड जे चेहरे आहेत ते खरंच त्या झेंड्याशी प्रामाणिक आहेत का? कोणता नेता कधी कुठला झेंडा खांद्यावर घेऊन मत मागायला येईल हे आपण सांगू शकतो का? आयुष्यभर एकाच विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलेली माणसं आता किती उरलीत? लोकल बदलावी तेवढ्या घाईत नेते पक्ष बदलतात. या सगळ्याचा परिणाम दिसतो तो तरुणाईवर. गाव असो किंवा शहर, चौका-चौकात तरुणांचे टोळके दिसतात. रोजगाराची चिंता, राहणीमानावर वाढत चाललेला खर्च, लग्नाचा प्रश्न. असंख्य समस्या आहेत. मुलींना शेती करणाऱ्या मुलांशी लग्न करायचं नाही. अर्थात त्यात त्यांची चूक नाही. रोज शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पिकाला भाव नाही अशा बातम्या वाचल्यावर त्या तरी कशा तयार होणार? अर्थात हा प्रश्न समृद्ध शेतकऱ्यांच्या मुलांनाही भेडसावतोय. विकास म्हणजे फक्त शहर. गावात योजना, उद्योग न्यायचेच नाहीत? या कृषिप्रधान देशात ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न एवढा गंभीर व्हावा आणि कुणी साधी त्याची दखलही घेऊ नये हे भयानक आहे. तरुणांना गेली कित्येक वर्षं वडापाव विकण्याचा पर्याय दिला जातो ही क्रूर थट्टा आहे. केवळ लग्न जमवण्यासाठी कित्येक मुलं शहरात येऊन स्थायिक होतात. मुलीच्या घरच्यांची अट असते ः नोकरी पाहिजे!

या नोकरीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यासाठी शेती विकली जाते. शेती नष्ट करण्याचं हे दुष्टचक्र आहे. पाणी आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे; पण लग्न करायला मुलगी मिळत नाही. तरुणांचं म्हणणं आहे, की ‘मुलींना शेतात काम करावं लागेल, असं वाटतं.... पण आमच्या घरातल्या स्त्रिया काय दिवसभर शेतात राबत नाहीत! चांगलं घर आहे, टीव्ही आहे, महिन्या- पंधरा दिवसाला आम्ही मॉलमध्ये जातो; पण लोकांची मानसिकताच अशी झालीय, की मुलगी गावात द्यायची नाही.’ या भयंकर समस्येत मुलांपुढं एकच पर्याय आहे- शहरात येणं. गावाकडं शेतात गडी जेवढ्या पैशात राबतोय तेवढ्या पैशात पोरं पुण्या-मुंबईत काम करतात. कारण काय तर गावाकडं राहून लग्न होत नाही. कित्येक सरपंच, तलाठी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य शहरांत राहतात. गावाकडं ये-जा करतात. मुंबई-पुण्यात राहून पैसा कमवलेले लोक निवडणुकीत उभं राहण्यासाठी फक्त गावी येतात. एमपीएससीच्या नावाखाली पुण्यात हजारो पोरं विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून येतात आणि कायमचे पुण्यात थांबतात. गावाकडं जाण्यात स्वारस्य उरत नाही. स्पर्धा परीक्षेला शेतीपेक्षा जास्त कष्ट करतात पोरं. दिवस-रात्र एक करतात. कारण आपल्या राज्यात ती एकच परीक्षा आहे, जी त्या मुलाच्या कुटुंबाचं जगणं बदलू शकते. ती एकच परीक्षा आहे, जी सहज लग्न जमवू शकते. ती एकच परीक्षा आहे, जी चार पिढ्यांचं कल्याण करू शकते. बाकी आयटी आहे; पण त्यात ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला सहज शिरता येत नाही.

आयटीचा सगळा मलिदा संपल्यावर ग्रामीण भागात त्याचे कोर्सेस आले. काही उल्लेखनीय संस्थांचा अपवाद सोडला, तर शिक्षणसंस्थांची अवस्था काय आहे? गावोगावी इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा जो बाजार आहे त्यात मुलं ना धड इंग्रजी शिकतात ना त्यांना मराठी येतं. नेत्यांनी जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा बिघडवून टाकली. शिक्षकांच्या बदल्या, खिचडी आणि खाऊचं  राजकारण यांत जिल्हा परिषद शाळांचं प्रचंड नुकसान झालं. अर्थात तरीही अशाच काही शाळाही बरं शिक्षण देतात. या शाळांत असे कित्येक शिक्षक आहेत, ज्यांच्यामुळं ग्रामीण भागांतली मुलं चमकदार कामगिरी करू शकतात; पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. 

शिक्षणाची अशी तऱ्हा, सुविधांचा अभाव आणि लग्नाचा ज्वलंत प्रश्न. या गोष्टीकडं सत्ताधारी आणि विरोधक दोघांचं लक्ष नाही. शेतकरी समस्येवर बोलणारे अचानक कुठंतरी नेते होतात, पद मिळवतात आणि शांत होतात. त्यांची परिस्थिती बदलते. आज असे कितीतरी नेते आपल्याला दिसतील जे एकेकाळी शेतकऱ्यासाठी सभेत आरडाओरडा करायचे, रडायचे, रास्ता रोको करायचे. त्यातले अनेक जण आज अदृश्‍य झालेत. शेतकरी अजूनही रस्त्यावर आहे. दरवेळी नवा माणूस शेतकऱ्याच्या नावानं रडतो. मोठा होतो. त्याचं भलं होतं.

शेतकऱ्याच्या रडण्याला किंमत नाही. शेतकऱ्यांच्या नावानं रडण्याला खूप किंमत आहे.

आता गावात सगळे झेंडे घरावर आणि बाईकवर लावून झालेत. कुठलाच झेंडा कामी आला नाही अशी भावना निर्माण झालीय. सुरवातीच्या काळात राज्यकर्त्यांचं बरं होतं. कार्यकर्त्याच्या घरचे त्याला सांभाळून घ्यायचे. एक वाया गेला असं समजून चालायचे. काही करत नसला, तरी घरची शेती आहे या कारणानं त्याचं लग्न व्हायचं. एकत्र कुटुंबात त्याच्या लेकराबाळांची आबाळ व्हायची नाही. कार्यकर्ता तसाच कुणाच्या तरी सतरंज्या उचलत म्हातारा व्हायचा आणि शेवटी घरातल्या बाजेवर पडून पडून शेवटचा श्वास घ्यायचा. आता तशी परिस्थिती नाही. एकत्र कुटुंब राहिलं नाही. वाटण्या होऊन होऊन सगळे आता अल्पभूधारक होत आलेत. त्यात एका घरात चार-पाच पक्षाचे लोक झालेत. त्यामुळं कुणा एकाला सांभाळून घ्यायची परिस्थिती राहिली नाही. सगळ्यात अवघड म्हणजे शेती आहे म्हणून लग्न होत नाही.

आता बऱ्या घरचा कार्यकर्ता मिळणं अवघड आहे. बेरोजगार तरुणांची फौज किती दिवस जमा करणार? आधीचे कार्यकर्ते लेकरं-बाळं मोठी झाल्यावर भानावर यायचे. स्वतःच्या भविष्याचा विचार करायचे. आताच्या कार्यकर्त्याला भविष्यच उरलं नाही. त्याला लग्न करायचं असलं, तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मुलाचा बाप काय करतो हे बघून लग्न जमवायची पद्धत आता राहिली नाही. मुलाच्या बापाला लग्नानंतर घरात ठेवायचं का नाही हा निर्णय नंतर होणार आहे- आधी मुलगा काय करतो हे महत्त्वाचं. त्याचा फ्लॅट आहे का? कार आहे का? बॅंक बॅलन्स आहे का?... या झाल्या अपेक्षा. मुळात या अपेक्षेला उतरणारी मुलं किती आहेत?

मुलींची संख्या कमी आहे हे एक नेहमीचं कारण आहे. ते योग्य आहे; पण आई-बाप देतील त्या घरात मुकाट्यानं जायचं हा विचार करणाऱ्या मुलींची संख्या कमी झालीय हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे चांगलंच झालंय. मुली योग्य विचार करताहेत; पण मुलांची चूक काय आहे? त्या त्या ठिकाणच्या नेतृत्वानं त्यांच्या भविष्याचा विचार केला नाही हा या तरुण पिढीचा दोष आहे का? त्यांच्या बापजाद्यानी नेत्यांवर, पक्षावर विश्वास ठेवला, नवीन नेते दिले, पक्ष निवडून दिले; पण त्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. कुणाच्याही मागं गेलो, तरी आपल्या नशिबी फरफट आहेच याची आता खात्री झालीय. आता नेत्यांनाही सहजासहजी निष्ठावान कार्यकर्ते मिळणार नाहीत. कारण नेतेच निष्ठावान राहिले नाहीत. 

...ही सगळी अशी परिस्थिती बघत होतो. विचार करत होतो. तेव्हा अवधूत गुप्तेनं गाणं लिहायला सांगितलं. कार्यकर्त्यावर. आपोआप ओळी सुचल्या. 

जगण्याच्या वारीत सुचेना वाट 
साचले मोहाचे धुके घनदाट 
आपली माणसं आपलीच नाती 
तरी कळपाची मेंढरास भीती 

शब्द सहज येत गेले. जणू पाठ असल्यासारखे. आपल्याच माणसांची कैफियत होती. खरंतर आपलीच.

उजळावा दिवा म्हणूनिया किती 
मुक्‍या बिचाऱ्या जळती वाती 

अशी किती माणसं पाहिली, जी कुठल्या तरी दिव्याला प्रकाशात आणायला वातीसारखी जळत गेली आयुष्यभर. शेवटी विठ्ठलालाच प्रश्न विचारावा वाटला ः 
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com