Sunday Special : तुम्ही पाहिलंत का गणपतीचं गाव?

Ganpati
Ganpati

रायगड जिल्ह्यातील पेण...या गावात गणेशमूर्ती साकारण्याचा मोठा उद्योग आहे. हजारो कामगारांची, कारागिरांची कुटुंबे गणेशमूर्ती तयार करण्याच्या उद्योगावर पोसली जात आहेत. श्रावण सुरू झाला आणि गणपती बनविण्याची लगबगही या परिसरात सुरू झाली आहे. या इंडस्ट्रीचा हा खास रिपोर्ताज...

तांबडशेत. पेणपासून पाचेक किलोमीटरवरच्या हमरापूरला मागे टाकले की हे गाव येते. छोटेसेच. रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्तींचे कारखाने. प्लास्टिकच्या निळ्या कापडाने झाकलेले. त्यात कामात व्यग्र असलेले कलाकार. एका कारखान्याजवळ थांबलो. एक वयोवृद्ध कलाकार मूर्ती रंगविण्यात व्यग्र होते.

पांढरा शर्ट, पांढरी टोपी, डोळ्यांना चष्मा, हाताला घड्याळ. टिपिकल शेतकरी. हे शंकर राजापाटील. सोबत त्यांची कारभारीण. त्याही गणपतीच्या कामात व्यग्र. ‘माहिती घ्यायला आलोय’ म्हटल्यावर अगत्यपूर्ण स्वागत केले. बाहेर पाऊस पडत होता. ‘आधी चहा घ्या, मग बोलू’ म्हणाले. 

विचारले, ‘हे काम कधीपासून सुरू केले?’ 

ते सांगू लागले, ‘आमचे चुलते होते सीताराम पाटील. गावातले गणेशमूर्तीचे कारखाने पाहून त्यांनीही १९६० मध्ये कारखाना टाकला. ते तेव्हा शाडूच्या मातीच्याच मूर्ती बनवीत. त्याकाळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) नव्हतेच. गुजरातमधून शाडू माती आणायचे. पण तेव्हा दळलेली माती नाही मिळायची. मातीची ढेकळं येत. ती उखळात कुटून बारीक करायची. माती वस्त्रगाळ करायची. मग ती भिजवून मळून दोन दिवस थप्पी मारून ठेवायची. चांगली सेट झाली, की मग साच्यात दाबून मूर्ती पाटावर उभी करायची.’ 

‘पण मग मूर्तीच्या कोरीवकामाचे काय? ते साच्याद्वारेच व्हायचे का?’ 
ते म्हणाले, ‘छे छे... सगळं कोरीवकाम हातानेच. अगदी डोळे, दागिने, जानवं... सगळंच. मग फिनिशिंग आणि रंगकाम. तेही हातानेच.’ 
मध्येच त्यांच्या पत्नी वनिताबाई हसत हसत सांगू लागल्या, ‘अहो, तेव्हा सायकलच्या चाकात हवा भरायचा पंप वापरायचे रंग स्प्रे करायला. मी पंप मारायची आणि हे रंगकाम करायचे.’ 

याच कारखान्यात शंकर पाटील शिकले. १९७५ मध्ये स्वतःचा स्वतंत्र कारखाना काढला.’ ते सांगत होते- ‘त्या वेळी मोजक्‍याच मूर्ती तयार होत. प्रत्येक काम हाताने करावे लागे. यंत्राचा वापर खूपच कमी. काही मोठ्या कारखानदारांकडेच मशीन असत. आता तसे काही राहिलेले नाही. आता अनेक कामे यंत्राने होतात. पीओपीच्या मूर्ती तर दागिने वगैरे कोरीवकामासहित साच्यात तयार होतात. त्यामुळे कष्ट वाचले. वेळ वाचला; पण कलाकार आपली कला हरवून बसले. आता बघा ना, नव्या कलाकारांना मातीच्या मूर्तीचे कोरीवकाम जमतच नाही. तसे फारच कमी कलाकार राहिलेत आता.’ 

‘पण इथल्याच मूर्तींना एवढी मागणी का? असं काय असतं त्यांच्यात?’ 
‘ब्रॅंड तयार झालाय ना... शंभर-सव्वाशे वर्षांपासून. पण तो का तयार झाला? मूर्तीच्या डोळ्यांतल्या जिवंतपणामुळे. जाणकार माणूस असला ना, तर तो मूर्तीचे डोळे बघून सांगू शकतो की ही मूर्ती पेणला घडलीय की नाही ते. एवढा जिवंतपणा असतो त्यांत. अस्सल कारागिरीचा वारसा आहे तो. इथल्या काही कलाकारांनी तो जपलाय.’ 

‘इथले कलाकार म्हणजे?’ 
‘हमरापूर, जोहा, तांबडशेत, कळवा आणि दादर ही पेणच्या जवळची पाच गावं आणि तिथले शेतकरी हेच इथले कलाकार, कारखानदार, कारागीर आणि मजूरही.’ शंकर पाटील म्हणाले. 

ही पाचही गावे आगरी समाजाची. या व्यवसायात अजूनतरी परप्रांतीयांनी हात घातलेला नाही. सुमारे दीड हजार कारखाने आहेत या गावांत. प्रत्येक कारखान्यात १० ते २० कारागीर आणि मजूर. एकूण सुमारे १५ ते ३० हजार कारागीर या व्यवसायावर उपजीविका करतात. त्याशिवाय वाहतूक व्यावसायिक, कच्चा माल विकणारे एजंट, मूर्तीविक्रेते अशा काही लाख लोकांचे जगणे यावर अवलंबून आहे. 

हे सगळे समजून घ्यायचे, या मूर्तिकारांचे, कारागिरांचे, मजुरांचे विविध प्रश्न, त्यांच्या मागण्या आणि त्याचबरोबर पेणचे या व्यवसायातील महत्त्व याबाबत ‘अधिकृत’ माहिती घ्यायची तर श्रीकांत देवधर यांची भेट अपरिहार्य ठरते. पेणला गणपतीचे गाव बनविण्यात ज्या काही घराण्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यात देवधरांच्या घराण्याचा अग्रक्रम. १८८० मध्ये भिकाजीपंत देवधर यांनी येथे गणपतीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे पुत्र बाबूराव यांनी तो व्यवसाय सुरू ठेवला. मात्र आपल्या पुढच्या पिढीने हा व्यवसाय करू नये, अशी बाबूरावांची इच्छा होती. पण त्यांचे अकाली निधन झाले आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी, नारायण ऊर्फ राजाभाऊ आणि वामनराव यांना हा व्यवसाय पुढे चालू ठेवणे भाग पडले. पुढे ही दोन्ही भावंडे वेगळी झाली.

राजाभाऊंनी ‘प्रभात कला केंद्रा’चे काम पाहिले; तर वामानरावांनी ‘कल्पना कला केंद्र’ सुरू केले. त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजेच राजाभाऊंचे चिरंजीव आनंद आणि वामनरावांचे पुत्र श्रीकांत हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये शिकून या व्यवसायात उतरले. 

देवधरांना आधी फोन करून ‘कल्पना कला केंद्रा’त गेलो. विविध देश फिरून आलेले देवधर पेण गणेश मूर्तिकार व व्यवसायिक विकास संस्थेचे अध्यक्ष आहेत. 

ते सांगू लागले, ‘या व्यवसायाचे एक चक्र आहे. साधारणतः श्रावणात मूर्तींची विक्री सुरू झाली, की मूर्तिकारांना पैसे मिळू लागतात. मात्र त्यांचा खर्च वर्षभर सुरूच असतो. तेव्हा मग सर्वच कारखानदार बॅंकेचं कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट वगैरे घेतात. ते भांडवल वर्षभर वापरलं जातं. मूर्तींची विक्री झाली की त्याची सव्याज परतफेड केली जाते, की कारखानदार पुढच्या वर्षाच्या कर्जासाठी तयार. केवळ पेण भागातल्याच बॅंका पाहिल्या, तर इथं दरवर्षी दीड-दोन कोटींच्या कर्जाचं वाटप होतं.  इथे जागेची अडचणही मोठीच आहे. आम्ही सरकारपुढे एक प्रस्ताव ठेवला होता, की एक क्‍लस्टर हब तयार करा आणि मूर्ती कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून द्या. तिथं पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा द्या. बाकी आमचं काही मागणं नाही. जागेचं भाडं, सुविधा शुल्क भरायला आम्ही तयार आहोत. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या आणि जगप्रसिद्ध असलेल्या पेणच्या या व्यवसायाकडे सरकार गांभीर्याने पाहतच नाही. आमच्या अडचणी समजून घेत नाही. या व्यवसायाचं विकासाचं प्रारूप तयार करताना सरकारने मूर्तीव्यावसायिकांशी चर्चा करावी. वास्तववादी योजना बनवाव्यात. तसं केलं तर या व्यवसायाचा चांगला विकास होईल.’ 

हे बोलणे सुरू असतानाच शरद पिलोलकर आले. ते पेणमधल्या ‘श्रवण आर्टस’चे मालक. गणपतीच्या डोळ्यांची ‘आखणी’ करणारे जे नावाजलेले कलाकार पेणमध्ये आहेत, त्यातले हे एक. ते सांगू लागले, ‘पेणच्या मूर्तींची खासियत म्हणजे डोळ्यांतील जिवंत असे भाव. ते सारं कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असतं. त्यासाठी काही वेगळे रंग वापरले जात नाहीत. या डोळ्यांमध्ये रंग भरण्याला आखणी म्हणतात. ती करणारे मोजकेच २०-२५ कलावंत आहेत पेणमध्ये. साऱ्या कारखान्यांत फिरून तेच आखणी करतात. त्यांचं काम तेवढंच. ‘तुम्ही स्वतः किती मूर्तींचे डोळे रंगवता? आणि त्याच्या मानधनाचं कसं असतं?’ 

पिलोलकर म्हणाले, ‘वर्षभरात पाच-सहा हजार मूर्तींचे डोळे रंगवतो. त्याचं मानधन मूर्तीच्या उंचीवर आणि कलाकाराच्या कौशल्यावर ठरतं. मूर्ती जितकी मोठी आणि कलाकाराचं कौशल्य जितकं चांगलं तितकं मानधन जास्त. पण कलाकाराचं कौशल्य प्रत्येक मूर्तीत पणाला लागत असतं. डोळ्यांत जीव ओतावा लागतो त्याला.’  खरेच होते ते. पेणच्या मूर्तींतील प्रसन्नता, शांत-आश्वासक भाव त्याच्या खरेपणाची ग्वाही देत असतात. पेणच्या गणपतींची लोकप्रियतेचे रहस्य दडले आहे ते त्यातच! arvindrpjuhu@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com