स्वत:त असे घडवा बदल

changes yourself
changes yourself

मागील लेखामध्ये आपण आयुष्याचे संतुलन कसे सांभाळायचे, हे शिकलो. संतुलन बिघडण्यामागची काही कारणे जाणली. सर्व कारणांवर ‘दुसऱ्याला दोष न देता आपण आपल्यात बदल करणे गरजेचे आहे’ हे आपल्याला उमजते, तेव्हा आपण ‘स्व-जागरूक’ होतो. स्वतःमध्ये बदल घडविणे म्हणजेच स्व-परिवर्तन आणणे. 

आता हे स्व-परिवर्तन आणायचे कसे? खालील मुद्दे तपासून पाहू...
तुम्ही कायम भूतकाळात जगत असता 

तुम्हाला कायम काहीतरी चुकत आहे, असे वाटते  

तुम्ही कायम दुसऱ्यांना दोष देता तुम्हाला कायम वेळ कमी पडतो 

तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आनंद होत नाही 

तुम्हाला कायम भविष्याची चिंताच वाटते

हे सर्व तुम्ही अनुभवत असाल, तर तुम्हाला १०० टक्के स्व-परिवर्तनाची गरज आहे हे मनाशी पक्के करावे लागेल. हे परिवर्तन तुमच्यापासून सुरू होते. स्वतःच्या परिवर्तनाची जबाबदारी तुमचीच आहे. तुमच्या आयुष्याचा आजपर्यंतचा प्रवास, आलेले अनुभव, भेटलेले लोक व या सर्वांचा तुमच्यावर प्रभाव व परिणाम नक्की कसा झाला आहे, हे फक्त आणि फक्त तुमचे मनच जाणते. इतर लोक तुम्हाला सहानुभूती देऊ शकतात, काही प्रमाणात मदत करू शकतात व एका मर्यादेपर्यंत तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात; पण तुमच्या विचारांची, भावनांची तीव्रता व त्याचे स्वरूप तुमचे मनच योग्य जाणते. आपले आयुष्य बदलण्यासाठी आपणच आपल्या परिवर्तनाची जबाबदारी उचलायला हवी. 

 स्व-परिवर्तानाचे 3 चरण आहेत
स्व-जागरूकता 

स्वत:ची जागरूकता आपण कोण आहोत व कोण नाही, हे ओळखण्याबद्दल आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेण्याचा अर्थ असा आहे, की आपण आपले व्यक्तिमत्त्व, आपले चारित्र्य, आपला हेतू, आपले सामर्थ्य, आपला कमकुवतपणा, आपल्या आवडी, आपली भीती आणि आपल्या इच्छेबद्दल सजग आहात. स्व- जागरूकता आणण्यासाठी काही मूलभूत बदल घडवावे लागतात. ते कधी विचारांचे, कधी सवयीचे तर कधी दृष्टिकोनाचे. 

स्वतःचा स्वीकार
आपण ‘आहे तसे’ स्वतःला स्वीकारणे म्हणजेच स्वतःवर बिनशर्त प्रेम करणे. वयाच्या आठव्या वर्षानंतर स्वतःबद्दल काही मते बनतात. त्यात पालक हा सर्वांत महत्त्वाचा घटक. पालक जग दाखवतील, तसे आपण पाहतो. जेव्हा पालक स्वतःला स्वीकारतात, तेव्हाच ते मुलांना स्वतःला स्वीकारायला शिकवू शकतात. पालक त्यांच्या आई-वडिलांसारखे नाहीत, तर आपली मुले आपल्यासारखेच विचार करतील ही अपेक्षा करणे अयोग्य. सुरवातीला पालकांकडून एक ‘योग्यतेचे सर्टिफिकेट’ मिळणे खूप महत्त्वाचे होते, त्यामुळे आपण आपले विचार, निर्णय पालकांना आवडतील अशाच पद्धतीने आत्मसात करतो. हेच सर्टिफिकेट नंतर आपल्यावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तींकडून मिळवण्याची धडपड सुरू होते. स्वतःचं वेगळेपण चूक आहे असा भ्रम निर्माण होतो. हाच भ्रम पुढे जाऊन स्वतःचा स्वीकार थांबवतो. स्वतःचा स्वीकार न करता परिवर्तन अधिक अवघड जाते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वतःचे परिवर्तन 
स्वतःमध्ये नक्की कोणते बदल आणायचे आहेत याची स्पष्टता घेऊन ते अंमलात आणणे म्हणजेच स्व-परिवर्तन. हे बदल आणण्यासाठी महत्त्वाचे आहे वर्तमानात राहणे, भूतकाळाकडे योग्य दृष्टिकोन ठेवणे, आपल्या अपेक्षा व भीती न टाळता त्याला सामोरे जाणे, अतिविचार थांबवून कृतीकडे अधिक लक्ष देणे इत्यादी स्वतःवर प्रेम करायला शिकणे अधिक महत्त्वाचे आहे. परिस्थिती अनुकूल असताना आपण स्वतःला स्वीकारतो; पण थोडा त्रास झाला की दोष देतो, स्वतःबद्दल शंका घेतो हे चालू होते. नाही म्हणण्याची कलाही स्व-परिवर्तनाला मदत करते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लक्षात ठेवा, स्वतःचे परिवर्तन एक शेवटचा उपाय किंवा गरज नसून ती एक स्वतःसाठी स्वतः केलेली निवड असावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com