
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार झाला तोच मुळी रावणवधासाठी! भगवान विष्णूंचा हा सातवा अवतार. अर्थात रावणवधाच्या अगोदरही ‘परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम’ या व्रताला अनुसरून त्यांनी वेळोवेळी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांचा नाश केलाच होता; पण जणू रावणवध होण्यासाठीच आधीच्या अनेक घटनांची साखळी तयार झाल्याचं आपल्याला नेहमीच जाणवतं. मग रामचंद्रांच्या वाट्याला आलेला वनवास असेल, सीतेनंही सोबत येण्याचा निर्णय घेणं असेल, एवढ्या वैभवाचा त्याग करणाऱ्या सीतेला सुवर्णमृगाचा झालेला मोह आणि मग सीतेचं हरण हे काही ठळक टप्पे. पण रावणाला मुळात सीतेचं हरण करावं हे कशामुळे वाटलं? तर त्याला कारणीभूत होती ती त्याचीच बहीण शूर्पणखा! रामायणातील एक खलनायिका. तिची व्यक्तिरेखा पाहिली की माणूस आतून कसा असू शकतो, त्याचा हेतू कसा वेगळाच असतो हे कळतं. माणसाची पारख करताना आजही उपयोग होऊ शकेल, असं वाटलं म्हणून ठरवलं की आज हिच्याविषयी लिहूयात.