ग्रामीण संशोधनाला शहरी तंत्रज्ञानाची गरज

village.jpg
village.jpg

पहाट झाली. कोंबडा आरवला. सूर्याचा प्रकाश उंबरठ्याला लागला. नदीच्या झुळझुळ पाण्याचा आवाज घरापर्यंत आला. गावातील सारी मंडळी आपल्या कार्यात मग्न आहेत. कुणी सडा घालतंय, कुणी रांगोळी काढतोय, कोणी सायकलवर अवजारे घेऊन शेतात निघाले तर कुणी बैलगाडीची बांधणी करीत आहेत. काही मंडळी मारुतीच्या पारावर एकत्रित रेडिओची पहाट ऐकत आहेत तर काही मंडळींची शेकोटीच्या भोवती जग सफारी रंगली. प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये गुंतले आहेत. हे चित्र महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातील आहे. भारत देश हा सुमारे 70 टक्के ग्रामीण भागाने व्यापलेला आहे आणि भारतातील सुमारे 70 टक्के जनतासुद्धा खेडेगावातच राहते. जिथे शहरी भागांप्रमाणे सुखसोयी कदाचित फारच अल्प. तशाच दैनंदिन गरजासुद्धा कमी असतात. ग्रामीण भागात तंत्रज्ञानसुद्धा फार कमी पोहोचलेले असते आणि त्याचमुळे तेथे काहीतरी विक्री करण्याची संधीही जास्त आहे. इथल्या अडचणी लोक त्यांच्या कलात्मक पद्धतीने सोडवितात. कारण शहरी भागाप्रमाणे विकसित तंत्रज्ञान हे ग्रामीण भागापर्यंत अजूनही पोहोचलेले नाही. मात्र गमतीचा मुद्दा असा की खेड्यातील लोक ही सारी जुगाड टेक्‍नॉलॉजी वापरत असल्यामुळे त्यांच्यात संशोधनात्मक वृत्तीही उपजत असते. त्यामुळे मला असे वाटते की ग्रामीण भागात संशोधनाची संधी खूप जास्त असते.
गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजेच संशोधन म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणींवर शोधलेला उपाय होय. मग आता प्रश्न असा येतो की आपल्या देशात सुमारे 70 टक्के जनता ही अशा भागात राहते जिथे संशोधनाला अतिशय स्कोप आहे; मात्र संशोधन क्षेत्रात आपला जागतिक क्रमांक खूप मागे आहे. हे असे का होते, यावर विचार करणे नक्कीच आवश्‍यक आहे. मला असे वाटते की आपला देश ग्रामीण भाग आणि शहरी भागात विभागला आहे. एका ठिकाणी प्रॉब्लेम्स आणि स्किल्स आहेत तर दुसरीकडे म्हणजे शहरात माध्यम आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास खेडेगावामध्ये फिरता फिरता काही दृष्य आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यापैकी एक म्हणजे आपली पाण्याची तहान भागविण्याकरिता दोन:चार किलोमीटरपासून पाणी वाहून न्यावे लागते. मी फेरफटका मारताना बघितले की काही स्त्रिया डोक्‍यावर तीन-चार घागरी, हातामध्ये तीन चार घागरी पाणी वाहून नेत होत्या. या पाण्याचा वापर तुम्ही कसा करता, असे विचारले असता त्या म्हणाल्या की हे पाणी आम्ही एका ड्रममध्ये साठवतो आणि वापरतो. त्या एका ट्रिपमध्ये 25 लीटर पाणी वाहून नेत असाव्यात. माझ्या डोक्‍यात एक विचार आला की ज्या ड्रममध्ये त्या पाणी साठवतात तोच ड्रम आडवा करून त्यात पाणी भरून तो घरंगळत नेला तर साधारणपणे एक व्यक्‍ती 100-150 लीटर पाणी एकावेळी नेऊ शकतो. आणि त्यामध्ये श्रमही वाचणार. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती काढल्यावर लक्षात आले की असा प्रयोग आफ्रिकेतही झाला आहे. त्याच संशोधनात काही रचनात्मक बदल करून आम्ही नवीन संशोधन तयार केले. म्हणूनच मला वाटते की आता गरज आहे ती या दोन्ही माध्यमांना एकत्रित करण्याची. म्हणजेच ग्रामीण भागातील प्रॉब्लेम्सला, येथील जुगाडू वृत्तीला जोडणी करायची शहरी तंत्रज्ञानाची. मात्र हे सारे करायचे असेल तर त्याकरिता कुठेतरी संशोधनात्मक शिक्षण हे एकमेव माध्यम असेल. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी आजसुद्धा शिक्षणासमवेत वेगवेगळ्या गोष्टींशी निगडित असतात. विद्यार्थी मोठ्यांशी चर्चा करतात, हालचाली बघायला गावांमध्ये फिरतात, वेगळ्या कार्यात मग्न होतात आणि याचमुळे त्यांच्यातील सुप्त कलागुण हा जागा असतो. आता याच साऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत ते शिकत असलेल्या विषयांचा समावेश दैनंदिन जीवनात करणे, तसेच वैचारिक समुपदेशन शिकविले तर नक्कीच हे विद्यार्थी शिक्षण आवडीने आत्मसात करतील आणि त्याचमुळे त्यांच्या कलात्मक वृत्तीचा एक उच्चांक गाठता येईल आणि यातूनच घडतील नवनवीन आविष्कार आणि आपण म्हणू शकू की संशोधनाच्या जागतिक पातळीचा आपण उच्चांक गाठला आहे.

Remarks :
अजिंक्‍य कोत्तावार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com