

Indian Armed Forces Counter-Terrorism Operations
esakal
मधुबन पिंगळे - madhuban.pingle@esakal.com
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले आणि देशभरात संतापाची लाट उसळली. या दहशतवादी कृत्याला अभूतपूर्व प्रत्युत्तर देताना भारतीय संरक्षण दलांनी ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी व लष्करी तळांवर अचूक लक्ष्यभेद केले. या कारवाईमुळे पाकिस्तानचे कंबरडेच मोडले आणि ‘पाकिस्तानी डीजीएमओ’ने भारतीय ‘डीजीएमओ’शी संपर्क करीत संघर्ष थांबविण्याची विनंती केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्याच्या शिरपेचातील तुरा असून, ही कारवाई भारतीय संरक्षण दलांच्या ताकदीचे आणि उच्च व्यावसायिकतेचे प्रदर्शन होते. भारतीय संरक्षण दलांच्या शौर्याबरोबरच, भारताच्या बदलत्या आक्रमक धोरणाच्या दृष्टीनेही ‘ऑपरेशन सिंदूर’कडे पाहण्यात येते. त्यामुळेच, भारतीय इतिहासामध्ये निश्चितच या कारवाईला एक महत्त्वाचे स्थान असणार आहे.