

Women Empowerment in Rural India
esakal
प्रभा जोशी - saptrang@esakal.com
छत्तीसगड इथल्या राजनांदगावजवळच्या सुकुलदेहान या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या फुलबासन यादव यांच्या संघर्षमय जीवनावर फिल्म्स डिव्हिजनने लघुपट काढला. ही संघर्षगाथा भारतातील कोट्यवधी स्त्रियांसमोर आदर्श ठेवते. शहरात सुशिक्षित, सुस्थितीत घरात जन्मलेल्या स्त्रियांना फुलबासन यांच्या खडतर जीवनाची सत्यकथा लघुपटात विचार करायला भाग पाडते.
भारत अथवा इंडिया ही आपल्या देशाची ओळख आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ समान असला तरी एका मोठ्या पटावर याच्या अर्थात एक अदृश्य विषमता आहे. महानगरातील उंच इमारती, शहरी सुविधा आणि आधुनिकता, वेगवान जीवनशैली जगणारे नागरिक ‘इंडिया’त राहतात. दूरवर खेड्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय इथे आधुनिक सुविधा नसलेली संथ जीवनशैली जगणारे नागरिक ‘भारता’त राहतात, असं हे एक अदृश्य विभाजन आहे. ही विषमता देशातील अनेक प्रश्नांचं मूळ आहे. भारतीय समाजाच्या एकूण व्यवस्थेत अशा विषमतेत स्त्रिया अधिक भरडल्या जातात. कुटुंब व्यवस्थेतील स्थान, सामाजिक स्थान, निरक्षरता आणि गरिबी याच्याशी संघर्ष करणाऱ्या अगणित स्त्रिया आपल्या देशात आहेत.