तत्त्वनिष्ठ जीवनाची अखेर...

आमचे आई-वडील चळवळीतील होते. घरात ‘मराठा’ दैनिक नियमितपणे यायचे.
n dpatil
n dpatilsakal

वैचारिक भूमिकेत अंतर असले तरी एन.डी. पाटील नात्यांत कधीही दुरावा येऊ देत नसत. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.

सामाजिक आणि राजकीय जीवनात ६५ वर्षे सक्रिय असणाऱ्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे जाणे दुःखदायक आहे. त्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा परिचय हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात झाला. माझे मोठे बंधू वसंतराव पवार हे या चळवळीत सक्रिय होते. त्यामुळे बारामती हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र बनले होते. त्या काळात बारामतीमधील आमच्या घरी एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांचे येणे व्हायचे. त्यांच्यासोबत एन. डी. पाटीलही असायचे. त्यांचा परिचय वाढल्यावर काही दिवस रहातही होते. आमचे आई-वडील चळवळीतील होते. घरात ‘मराठा’ दैनिक नियमितपणे यायचे. त्यातील बातम्या, लेख यांवर चर्चा व्हायच्या. त्यामुळे घरामध्ये एक प्रकारचे वैचारिक आणि सामाजिक वातावरण होते. त्यामुळे डॉ. एन. डी. पाटील यांचा विचार आमच्या मोठ्या बहिणीसाठी करावा, असे आईने ठरवले. त्यातून बारामतीमध्ये सरोज (माई) आणि एन. डी. पाटील यांचा विवाह झाला. आमचे बंधू शरदराव पवार आणि आईने हा विवाह संपन्न केला. यातून शरदरावांचे नेतृत्व दिसून आले.

लग्नावेळी एन. डी. पाटील यांनी माईंना आपल्या समाजिक कामाची कल्पना दिली होती. कुटुंबासाठी वेळ आणि आर्थिक योगदान देता येणार नाही. तो सर्व भार तुम्हालाच उचलावा लागेल, असे त्यांनी सांगितले. संकटे आली तर तक्रार करायची नाही, तर त्यावर मात करायची अशी शिकवण आम्हा भावंडांना आईने दिली होती. माई यांनीदेखील कोणतीही तक्रार न करता संसाराचा भार उचलला. त्या शिक्षिका होत्या, पुढे प्राध्यापकही झाल्या. एन. डी. पाटील यांच्याशी त्या विचाराने एकरूप झाल्या होत्या. कोणतीही तक्रार न करता त्यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले. मुलांना वाढवले. एन. डी. पाटील यांच्या सामाजिक कार्यातही योगदान दिले.

एक काळ असा होता, की एकीकडे शरदराव पवार यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसमधून उत्कर्ष सुरू होता. दुसरीकडे प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे विरोधकाची भूमिका बजावत होते. समाजात हा चर्चेचा विषय होता. असे असले तरी एन. डी. पाटील यांनी कधी नात्यात दुरावा येऊ दिला नाही. त्यांच्या भूमिका, संघर्ष, साधी राहणी यामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर वाढला. पुढे आम्ही व्यवसायात उतरलो. उद्योजक झालो. डाव्या विचारसाणीच्या एन. डी. पाटील यांचे भांडवलदारांबद्दलचे मत वेगळे होते. पण त्यांनी कधीही आम्हाला अंतर दिले नाही किंवा तक्रार केली नाही. त्यांचे राहणे अत्यंत साधे होते. आमदार असतानाही ते नेहमी एस. टी. ने प्रवास करायचे. आपल्या जीवनशैलीचा त्यांनी ना कधी गवगवा केला नाही. कधी कोणाकडे तक्रारही केली नाही. त्यांचा व्यासंग, वाचन प्रचंड होते. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदानही मोठे होते. कामगार, शेतकरी, वंचित यांच्या प्रश्नावर अखेरपर्यंत संघर्ष केला. ९० वर्षांचे असूनही शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर ते रस्त्यावर उतरले. रयत शिक्षण संस्था हा तर त्यांचा श्वास होता. त्यांनी नेहमी समाजाच्या हिताचा विचार केला. आपली विचारसारणी, तत्त्वे व भूमिका यावर ते ठाम असत. त्यांच्या जाण्याचे एका तत्वनिष्ठ जीवनाची अखेर झाली.

(शब्दांकनः ओंकार धर्माधिकारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com