

India Team Travel Distance
esakal
शैलेश नागवेकर
भारतीय संघाचा प्रत्येकी एक सामना सर्व नियोजित शहरांना मिळेल असा कार्यक्रम तयार केला जातो. म्हणून पर्यटनाचा हा घाट. यावेळी हे पर्यटन जास्त नजरेत भरते, त्याचे कारण महिनाभराची स्पर्धा आणि त्यात २० संघांचा सहभाग, त्यामुळे दिवसाला तीन-तीन गट साखळी सामने खेळवावे लागले. परिणामी एक सामना संपला की दुसऱ्या दिवशी बॅग उचलून निघण्याची तयारी करावी लागली.
क्रिकेट हा केवळ खेळ राहिलेला नाही, तो कधीच व्यवसाय झालाय, हे आता नव्याने सांगायची गरज नाही. द्विपक्षीय मालिका सोडाच... पण आयसीसीच्या जागतिक स्पर्धांतही मोठी उलाढाल होत असते. कोणाचीही का असो ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैसा भांडवली बाजारात येत असतो. हे चांगलेच आहे, पैसा खेळता राहिला पाहिजे तरच पर्यायाने अर्थकारणाचे चक्र फिरत रहाते. प्रक्षेपण हक्कांपासून मीडिया राइट्स), हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग, विविध सेवा, जाहीरातबाजी, मार्केटिंग यांच्यापासून स्टेडियममध्ये पिझ्झा-बर्गर आणि चढ्या भावात पाणी विक्रेते तसेच स्टेडियमच्या बाहेर मंडप बाधणारे क्राँट्रेक्टर आणि त्यांचे कर्मचारीही यांनाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. एकीकडे हे सर्व चांगले घडत असताना दुसरीकडे खेळाडूंना आणि प्रामुख्याने भारतीयांना प्रवासाचे द्राविडी प्राणायाम करायला लागते. ‘बॅग भरो और निकल पडो’ या टॅग लाइननुसार त्यांच्या पायाला प्रवासाचे चक्र लावलेले असते. मायदेशात स्पर्धा असली की सर्वसाधारपणे यजमान संघाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.