

Managing the Restless Mind
esakal
‘मन’ म्हणजे केवळ दोन अक्षरांचा शब्द; पण तुम्ही सुखात आहात की दुःखात हेसुद्धा अनेकदा परिस्थितीपेक्षा मनस्थितीच ठरवते. न दिसणाऱ्या मनाची पटकन आठवणारी वैशिष्ट्ये म्हणजे ते चंचल, चपळ आणि अधीर असतं. ध्यान लावणं पटकन जमत नाही, कारण मन स्थिर होत नाही.
आजोबा घरात येतायेताच कडाडले, ‘‘करा करा माझ्या उपवासाच्या दिवशीच भरीत करत जा.’’ भाजलेल्या वांग्याचा दरवळ अंगणातही पोहोचला होता. आजोबांना खडसावू शकेल अशी त्यांची मोठी बहीण बेबीआत्या म्हणाली, ‘‘वसंता, तुझ्यासाठीही भरीत केलंय भोपळ्याचं. लहानपणी पेपरात मिळवलास तोच आता ताटात.’’ घरात एकच हशा पिकला. ‘‘ताई, पण मुद्दाम का करावं म्हणतो मी. खावसं वाटतं ना मग.’’ ‘‘इथेच चुकतं तुझं वसंता, अरे खावसं वाटलं इथेच उपवास मोडला. उपवास काय फक्त जिभेचा असतो? तो मनालाही घडायला हवा, आवडीच्या पदार्थांपासून मनाने लांब राहणं हा खरा उपवास. खरंतर उपवास म्हणजे बरंच काही; पण इतकं तरी जमायला हवं. मनाला आवर!’’ असे संवाद आपणही ऐकले असतील. एखादी गोष्ट कटाक्षाने न करणं किंवा नित्यनेमाने करणं यामध्ये जसा श्रद्धेचा भाग असतो, तसाच मनाला वळण लावणं हासुद्धा उद्देश असल्याचं जाणवतं. चातुर्मासाचे नेम, पारायणं, स्तोत्रांची आवर्तनं... ठरवल्याप्रमाणे तो संकल्प पूर्ण केला, की मनाला समाधान मिळतंच, पण आत्मविश्वास वाढतो आणि मनाची शक्तीही.