

AI and post‑2000 era
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
जग बदललं, माध्यमं बदलली, म्हणजे ऑर्कुट आलं, मग फेसबुक, ट्विटर (आता एक्स), मग
इन्स्टाग्राम आणि डेटिंग
ॲप्स वगैरे वगैरे. जंत्रीच नुसती. म्हणजे वैयक्तिक कॉम्प्युटर ही पहिली क्रांती, मग इंटरनेट क्रांती, मग मोबाईल, त्यातच स्मार्ट फोन क्रांती आणि डेटा क्रांती अशा विविध क्रांतीच, एकामागोमाग
एक रेल्वेगाडीच्या डब्यांसारख्या घडत गेल्या.
मोबाईल फोनची रिंग वाजली. नंबर अनोळखी होता. समोरून एका माणसाचा आवाज आला, ‘नमस्कार, प्रणव सर बोलताय का?’
बहुधा हा कॉल बँक किंवा फायनान्शियल प्रॉडक्ट देणाऱ्या ॲपच्या प्रतिधिनीचा आहे की काय, अशी शंका आली. असे कॉल फार इरिटेटिंग असतात. हे एजंट्स जेव्हा कमी व्याजात असं लोन मिळणार नाही सर, क्रेडिट घ्या आणि इन्वेस्ट करा असं सांगतात, तेव्हा तर जिवाचा नुसता राग राग होतो. पण मी डोक्यावर बर्फ ठेवून अशा कॉल्सना शांतपणे उत्तर देतो.
दररोज ती बाई किंवा तो बुवा कित्येकांना असे कॉल करतो, माहिती सांगतो आणि कित्येक जण त्याला नाही म्हणतात, कॉल कट करतात आणि काही तर शिव्या देतात... तर याचा त्या व्यक्तीच्या मनावर किती निगेटिव्ह परिणाम होत असेल, दिवसाच्या शेवटी त्याच्या मनात किती मोठ्या प्रमाणात राग, चीड आणि निराशा साठून राहत असेल? असा प्रश्न मला पडतो आणि म्हणून मी त्यांना शांतपणे नकार देऊन संभाषण संपवतो.
मी म्हणालो, ‘हो, बोलतोय.’
‘सर, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये दोन हजारोत्तरी साहित्य यावर दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित करतो आहे.’
‘अच्छा.’ म्हणजे हा कॉल स्पॅम नाहीये तर! कामाचा कॉल आणि स्पॅम कॉल एकमेकांत किती मिसळले आहेत!
तो पाठ केल्यागत, घडाघडा बोलत होता, ‘तुम्ही एका सत्रात यावंत असं वाटतं. तारखा आहेत... तर तुमची उपलब्धता कळवाल का?’
माझ्या डोक्यात चक्रं सुरू झाली. वर्ष दोन हजार नंतरचा काळ. त्यानंतरचं साहित्य, त्याबद्दलची चर्चा. त्यासाठी अख्खे दोन दिवस. व्वा, उत्तम. नव्या साहित्याचा विचार होतोय. एक मन म्हणालं, तू गेलं पाहिजेस. तुझ्या लेखनाच्या भूमिकेशी आणि जाणिवांशी सुसंगत आहे हे. पण दुसऱ्या मनाने मला रोखलं. मी थोडा विचार करूनच हल्ली कार्यक्रम स्वीकारतो. कुठे जायचं आहे, काय विषय आहे आणि कधी जायचं आहे हे समजल्यावरच होकार कळवतो. बरेचदा नकारच. बाहेरगावी- अगदी मुंबईला जरी जायचं म्हटलं, तरी प्रवासामधून जाण्यात खर्च होणारी ऊर्जा लेखनकामात किंवा वाचनात खर्च करणं मला जास्त योग्य वाटतं. पूर्वी लोकांपर्यंत जाण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रं ही माध्यमं होती, आता सोशल मीडियामुळे क्षणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं शक्य झाल्याने एखादा कार्यक्रम खरंच तितका वर्थ आहे का, याचा विचार करणं मला गरजेचं वाटू लागलं आहे. अर्थात, प्रत्यक्ष गाठीभेटी आणि बोलणं, संवाद साधणं मला अजून तरी- म्हणजे मिलेनियल पिढीचा असल्याने- आवडतं आणि महत्त्वाचं वाटतं, पण संवादातून खरंच किती क्वालिटेटिव्ह मिळणार आहे की तेच तेच जुनं गुऱ्हाळ आणि शिळ्या कढीला ऊत येणार आहे- पूर्वीचा काळ, लेखक, गाणी सारं किती छान होतं, आता कशी वाट लागली आहे वगैरे- याचा विचार करावासा वाटतो.