

Vat Purnima Significance
esakal
श्रीराम भट - saptrang@esakal.com
विश्व हे अखंड आणि नित्य स्पंदनशील आहे आणि या स्पंदनशीलतेशी श्रीगणेशांचा संबध जसा आहे, तसाच आपल्या संस्कृतीत वडाच्या वृक्षाचाही या अखंड स्पंदनशीलतेशी संबंध जोडण्यात येतो. भगवद्गीतेतही भगवंतांनी पंधराव्या अध्यायात या आकाशात मूळ असलेल्या किंवा ते मूळ धरून राह्यलेल्या अश्वत्थाचे मूलभूत चिंतनच केले आहे. या आद्य चिंतनाशी जवळीक साधणे किंवा त्याच्याशी जवळीक साधून राहणे हीच जीवात्म्याची साधना म्हणता येईल!
देवाचिये द्वारी उभा क्षण भरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेण्या ।।
या ज्ञानेश्वरांच्या अभंगातून, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार मुक्ती जीवात्मा परमेश्वराच्या चिंतनातून अनुभवत, त्या मूळ चैतन्याशी समरस होत असतो. गंमत म्हणजे या मुक्तींचा अधिष्ठाता श्रीगणेशच होय. श्रीगणपती अथर्वशीर्ष या मुक्तींशी जवळीक साधत मनोलय साधून घेण्याचा मार्ग दाखवते. ज्ञानेश्वरीत हीच ती श्रीगणेश विद्या गुप्तपणे पदोपदी वर्णिली आहे आणि हाच तो माणसाच्या आत्मचिंतनाचा मार्ग होय. माणसाच्या जीवनातील क्षण हा एक चिंतनाचाच भाग म्हणता येईल. उदा. एखादी हृदयस्थ प्रिय व्यक्ती भेटली की माणूस काळ विसरतो किंवा त्या भेटीचा क्षण अनंत स्वरूपाचे दर्शन घडवत असतो.