

Vinod Kumar Shukla Hindi literature contemporary writer
sakal
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे २३ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. समकालीन हिंदी कवितेतील हे अत्यंत महत्त्वाचे नाव. ज्यांच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वाची मोठी हानी झाली, ते शुक्ल समजून घ्यायला मनाची बैठक घालावी लागते. नव्या पिढीला त्यांची ओळख झाली, ती मात्र फेसाळत्या ‘सोशल मीडिया’तून!
तुम्हाला या जगातून जाऊन आता साधारणतः दीड महिन्यांपेक्षा थोडे कमी दिवस झाले आहेत. नेमकं सांगायचं तर एक महिना नऊ दिवस. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात हे पत्र लिहायला तसा प्रचंड उशीरच झालाय असं म्हणायचं. पण मला तत्काळ एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ तयार करावासा वाटला नाही. मला ते जमलं नाही. तुमच्या जाण्याचं दुःख तर झालं होतं, पण कुणी अत्यंत जवळचा किंवा निकटवर्तीय, रोज भेटणारा माणूस गेल्यावर जसं दुःख होतं इतकंही झालं नाही. कारण आपला तसा रोजचा परिचय नव्हता, तसा तो असण्याचा काही संबंधही नव्हता. किंवा माझं आणि तुमचं मानलेल्या गुरु-शिष्याचं नातंही नव्हतं. तुमची लेखनशैली, पद्धत वेगळी, माझी वेगळी. आपली स्कूल्स, काळ दोन्ही भिन्न आणि वेगळे.
आपली ओळखदेख होती ती शब्दांतून. तीही एकतर्फी मी तुमचे शब्द वाचले होते, तुम्ही माझे शब्द वाचण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तुम्ही गेल्याची बातमी कळल्यावर भडभडून आलं नाही; वाईट मात्र वाटलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून हे कधी ना कधीतरी घडणार याची जाणीव झाली होती. पण तरी तुम्ही गेल्याला काही काळ गेल्यावर एक पोकळी मात्र जाणवली. मनात फुग्यासारखी वर-खाली तरंगणारी पोकळी. म्हणून हे पत्र लिहायचं ठरवलं.