स्वछंदी निर्भय प्रेमासाठी; कहानी पहिल्या जाहीर तृथियपंथी विवाहाची

स्वछंदी निर्भय प्रेमासाठी; कहानी पहिल्या जाहीर तृथियपंथी विवाहाची

देशातला पहिला तृतीयपंथी जाहीर विवाह करणाऱ्या जोडप्याशी निवांत गप्पा मारल्यानंतर याची अनेक उत्तरे मिळाली. या जोडप्यामधील माधुरी ही तृतीयपंथी आहे आणि जय हा इतरांप्रमाणे सर्वसामान्य पुरुष. यांच्या प्रेमविवाहाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांचेही आयुष्य अगदी सुखात, आनंदात सुरू आहे. माधुरी म्हणते, "मी वेगळी नाही "मी स्पेशल' आहे. आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्पेशलच करायची असे मी ठरवले आहे. पण माझं हे स्पेशल असणं समाजाला स्विकारहार्य नाही. आरशासमोर विवस्त्र होऊन स्वतःला पाहिल्यावर वाटायचं की मी वेगळ्याच शरीरामध्ये कैद आहे. पण ते चूक होतं मी चुकीच्या शरीरात नाही तर चुकीच्या समाजात कैद आहे.'' 

तो चुकीचा समाज म्हणजे आपण आहोत. का आपण त्यांचं वेगळेपण स्वीकारू शकत नाही? त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला मान्य नाही? स्त्री आणि पुरुष यांच्यापलिकडे माणूस असूच शकत नाही का? स्त्री-पुरुषांप्रमाणे तृतियपंथांना माणूस म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही का? आपण त्यांना न स्वीकारल्याने त्यांच्यात नैसर्गिक काही बदल होणार आहेत का? त्यांनाही कोणावर प्रेम करण्याचा, मुक्तपणे भावना व्यक्त करण्याचा, आपली ओळख न लपविता बिनधास्त जगण्याचा हक्क नाही का? तर आहे. आपला जेवढा हक्क आहे तेवढाच त्यांचाही आहे. आपल्याला मान्य असू अगर नसू... पण या देशाच्या संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे. आता देशाच्या संविधानाला आपण मानत असू, तर त्यांनाही स्वीकारणे आपली जबाबदारी आहे. 

माधुरी सोबत लग्नाच्या निर्णया विषयी बोलताना जय म्हणाला, ""माधूरीच्या प्रेमात पडलो तेव्हा ती स्त्री आहे का तृतीयपंथी हे सुद्धा मला माहीत नव्हते. जेव्हा समजले तेव्हाही काही फरक पडला नाही कारण ती कोण आहे हे पाहून तिच्यावर प्रेम केले नव्हते. मी फक्त माधूरीवर प्रेम केले होते.'' 

एवढं हे नात निखळ आणि सहज आहे. त्याला आपण उगाचच नैतिक-अनैतिक, धार्मिक, स्त्री-पुरुष, समाज, प्रतिष्ठा, मर्यादा, इच्चत, अब्रू आदी नको-नकोत्या चष्म्यातून बघून किचकट बनवून टाकतो. रस्त्यावर, पार्क मध्ये, ट्रेन मध्ये हातावर टाळ्या वाजून पैसे मागणाऱ्यांना आपण "हिजडा, छक्का' यांसारखे शब्द वापरून हिडीस-फिडीस करतो किंवा त्यांना घाबरतो किंवा शिव्या देतो. पण एक मात्र नक्की, त्यांच्याविषयी चांगलं कधी बोलत नाही. पण त्यांच्या असे असण्यालाही आपणच जबाबदार आहोत. त्यांच्यातले वेगळेपण आपण वेळीच स्वीकारले असते तर त्यांच्यावर भीक मागत फिरण्याची वेळ आली नसती. ते सुद्धा आपल्या सोबतच चांगल्या ठिकाणी काम करताना, बोलताना, व्यक्त होताना दिसले असते. ते ही सहज. 

माधुरी म्हणते, ""मी अशी आहे हे समजल्यानंतर माझ्या आई वडिलांनी, बहिणींनी मला कधीच स्वीकारले नाही. त्यांनी मला सोडून 25 वर्ष होऊ गेली आहेत. आई-वडील आता या जगामध्ये नाहीत. आमच्यातही इतरांप्रमाणे अनेक कौशल्य आहेत. पण ती न पाहता केवळ एका गोष्टीमुळे आम्हाला डावलले जाते. स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. पण या समाजात मी पण आहे. मी कुणाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहू. पुरुष किंवा स्त्री दोघेही म्हणू शकतात आम्ही शंभर टक्के स्त्री किंवा पुरुष आहे. पण मी पण 200 टक्के खरी आहे. कारण मी एक स्त्री पण आहे आणि पुरुषही.'' 

आज अशा शेकडो माधुरी आणि जय ला केवळ तुमच्या आमच्या आधाराची गरज आहे. त्यांच्यासाठी आपल्याला विशेष काही करण्याची गरज नाही. तशी त्यांची आपल्याकडून अपेक्षाही नाही. त्यांना केवळ माणूस म्हणून स्वीकारा एवढीच साधी आणि प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्यासाठी आपण काही चांगलं जरी करू शकलो नाही तरी आपल्यामुळे त्यांना त्रास, नुकसान होईल असे जरी काही केले नाही तरी त्यांचे आयुष्य सुखी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com