अचानक का कमी होतो अभ्यासातला परफॉर्मन्स?

exam
exam

सर मागच्या महिन्यापर्यंत ज्या टेस्ट झाल्या, त्यामध्ये आमच्या मुलाला सर्व विषयांत 90 ते 90 टक्के मार्क्‍स मिळायचे, पण मागच्या आठवड्यात जी परीक्षा झाली, त्यात 5, 8, 11 टक्के असे मार्क्‍स मिळाले. आजपर्यंत त्याचा परफॉर्मन्स इतका खाली कधीच आला नव्हता. त्याला विचारले तर म्हणतो-मला काहीच आठवत नाही. आजकाल त्याचा अभ्यासही होत नाही. मी परीक्षाच देणार नाही असे म्हणतो...


अशा स्वरूपाची तक्रार घेऊन अनेक पालक मला भेटतात. ते गोंधळून गेलेले असतात. मुलांनाच दोष देत असतात. मुलगा आणखी जीव तोडून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, पण परफॉर्मन्स वाढण्याऐवजी आणखी कमी होऊ लागतो. त्याला नैराश्‍य येऊ लागते. मला काहीच जमणार नाही, मी नापास होईन, मी परीक्षाच देत नाही, असे तो म्हणू लागतो. आता काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. 


रोज सहा तास शाळा, चार ते पाच तास ट्युशन, दोन ते तीन तास होम असाईमेंटस्‌ असे सुमारे 14 ते 15 तास विद्यार्थी परिश्रम करीत असतात. शिवाय टेस्ट सिरीज सुरू झाल्यावर यात आणखी दोन तासांची भर पडते. रविवार आणि सुटीचा दिवसदेखील मोकळा नसतो. हाच दिनक्रम न थांबता सलग आठ ते दहा महिने अमलात आणल्यावर अचानक आपले मन अभ्यासात सहकार्य करणे थांबवते. ब्लॉक किंवा डेड लेव्हल ऑफ लर्निंग येते आणि परफॉर्मन्स एकदम खाली येतो. 

अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही अवस्था नेमकी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या वेळी येते व टेस्ट परीक्षेत 80-90 टक्के मार्क मिळविणारा विद्यार्थी एकदम 50 टक्‍क्‍यांवर येतो. 

एकेका प्रश्नाचे उत्तर 50-50 वेळा लिहून पाहणे, एका दिवशी दोन-दोनशे गणित सोडवणे, खूप पाठांतर करणे, खूप लिहून बघणे अशा पद्धतीने जे विद्यार्थी अभ्यास करतात, त्यांच्याबाबत ही समस्या जास्त प्रकर्षाने जाणवते. शिकवणाऱ्यांच्या पद्धतीच तशा असतील तर विद्यार्थी काहीच करू शकत नाहीत. अभ्यासाच्या ओझ्याखाली फक्त भरडले जातात. 

नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्यानंतर काही दिवस आपली स्मरणशक्ती खूप चांगली काम करते. आपण कुठल्याही स्वरूपाचे ज्ञान चटकन आत्मसात करतो. दीर्घकाळ अभ्यास करू शकतो. एकाग्र होऊ शकतो. अभ्यास एंजॉय करू शकतो. अचानक एखाद्या दिवशी या सर्व गोष्टी थांबतात. आपल्याला असे वाटते की, आपली लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. अगदी साध्या साध्या गोष्टीदेखील डोक्‍यात शिरत नाहीत. आपल्याला आपल्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेबद्दल शंका यायला लागते. आपली स्मरणशक्ती कमी झाली, असे आपल्याला वाटायला लागते. 

यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काही बदल करावे लागतील. पाठांतर वारंवार लिहून बघणे, खूप पेपर्स सोडवून, लिहून बघणे याऐवजी तो विषय नीट समजून घेणे, मेमरी मॅप तयार करणे, की वर्डस काढणे, मेंटल रिव्हिजन करणे या पद्धती वापराव्या लागतील. 

रोज किमान 20 ते 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करावा लागेल. यामुळे ट्युशनमध्ये किंवा वर्गामध्ये झोप येणे, उत्साह नसणे, आळस वाटणे, चिडचिड होणे, या तक्रारी दूर होतील. रोज दिवसातून दोनवेळा दहा मिनिटे रिलॅक्‍सेशनसाठी द्या. यामुळे आळस, थकवा, कंटाळा निघून जाईल. मनाची एकाग्रता व ग्रहणशक्ती वाढेल. मनावरचा ताण कमी होईल. 

तुमच्या आवडीचा एखादा छंद जोपासा. रोज किमान 30 मिनिटे छंदासाठी राखून ठेवा. यालाच आम्ही पोलरायझेशन ×क्‍टिव्हिटी असे म्हणतो. यातून मन प्रसन्न, आनंदी होत. इतर गोष्टींमधील, अभ्यासातील उत्साह वाढतो. या पद्धती वापरून आपल्या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो...आणि तरीही गरज पडली तर कौन्सिलरला भेटण्यात काहीही वावगे नाही. 

- कन्सल्टन्ट सायकॉलॉजिस्ट, 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल हेल्थ, 
शंकरनगर, नागपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com