#MokaleVha : पत्नी वेगळी राहते, घटस्फोट मिळेल?

Sucheta-Kadam
Sucheta-Kadam

पत्नी वेगळी राहते, घटस्फोट मिळेल?
माझे वय ४५ असून, विवाहित आहे. परंतु लग्नानंतर दोन वर्षेच पत्नी सोबत राहिली. नंतर कोणासही न सांगता आमच्या एक वर्षाच्या मुलीसह निघून गेली. हळूहळू आमच्यातील संवाद पूर्ण संपला. आता मुलगी १७ वर्षांची आहे. मी माझ्या आईसोबत राहतो. मुलगी कधीतरी आम्हाला भेटायला येते. पत्नीने निघून गेल्यानंतर कधीही घटस्फोटाचा विषय काढला नाही. त्यामुळे मीदेखील त्याबाबत विचार केला नव्हता. परंतु दोन वर्षांपासून एका घटस्फोटित स्त्रीसोबत माझी मैत्री झाली आहे. आम्ही एकत्र राहायचे ठरविले तर कायद्याने अडचण येऊ शकते का? 

तुम्ही पती-पत्नी १०-१२ वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतंत्र राहात आहात. तुमच्यात कोणताही संवाद नाही. तसेच आर्थिक बाबीही स्वतंत्र असाव्यात असे वाटते. कारण कोणत्याही बाबतीत वाद/भांडणे याचा उल्लेख नाही. तुम्ही कायदेशीररीत्या विभक्त होण्याकरिता अपील करू शकता. पत्नीला कोर्टामार्फत नोटीस जाईल. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, कोर्टात हजर झाल्या नाहीत, तरीदेखील तुमचा सेपरेशनचा काळ लक्षात घेता घटस्फोटाचा एकतर्फी निकालही तुम्हाला घेता येऊ शकतो. घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही लग्न केल्यास कायद्याने कोणतीही अडचण येणार नाही.

मुलगा नोकरीला असूनही माझ्याकडून खर्च घेतो
माझे वय ५२ असून, एक विवाहित मुलगा व सून यांच्यासमवेत राहते. मुलगा दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. सासऱ्यांनी त्यांचे छोटेसे राहते घर माझ्या नावे करून दिले. आम्ही अनेक वर्षे त्या घरातच राहात होतो. पतीच्या मृत्यूनंतर मी खासगी कंपनीत नोकरीला लागले. मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रामाणिकपणे कष्ट केले. मी आज चांगल्या पदावर काम करत आहे. परंतू ही खासगी कंपनी आहे व पेन्शनची सोय नाही. मुलगा नोकरी करतो. तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न करायचे म्हणून छोटे घर सोडून मोठ्या घरात भाड्याने राहायला जाऊ, असे मुलाने सांगितले. त्याच्यासोबत राहण्यासाठी स्वतःचे घर भाड्याने दिले. या घराचे दहा हजार भाडे मिळते व नवीन घरास तीस हजार भाडे द्यावे लागते. लाइट बिल २५००/३००० रुपये येते. हे सर्व खर्च मुलगा माझ्याकडून घेतो. त्यामुळे माझ्या पगारातून काहीच बचत करू शकत नाही. मुलाचे वागणे पटत नाही. परंतु वाद नको म्हणून मी बोलत नाही. माझ्या भविष्याबद्दल मला चिंता वाटते. स्वतःचे घर सोडून चूक केली का?

पतीच्या निधनानंतर तुम्ही खंबीरपणे स्वतः सर्व आर्थिक जबाबदाऱ्या घेतल्या व मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलाला तुम्ही घेतलेल्या कष्टाची जाणीव आहे का? त्याचे वागणे-बोलणे तुमच्याशी कशा प्रकारे आहे? मुलगा व सून यांचे एकमेकांशी असलेले नाते, त्यांचे आर्थिक व्यवहार हे सर्व तुम्ही स्वतः पाहत असाल. याबाबत तुमचा अनुभव काय आहे, यावर तुम्ही काय निर्णय घ्यावा हे ठरू शकते. जवळच्या नात्यात गृहित धरून वागण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. मुलाचे स्वतःचे येणाऱ्या पैशांचे नियोजन काय आहे, याबद्दल तुम्हाला सांगितले जाते का? मुलगा व सून यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळतात का, याचे बारकाईने अवलोकन करा. रिटायर्ड झाल्यानंतर स्वतःच्या खर्चासाठी काही बचत करणे आवश्‍यक आहे. मुलावर त्या वेळी आर्थिक भार नको. त्यामुळे आत्ताच काही पैसे बचत करणे आवश्‍यक आहे, हे त्याला सांगा. मुलाचे वागणे, आर्थिक व्यवहार यात बेजबाबदारपणा अधिक असेल तर तुम्ही स्वतःच्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णयही घेऊ शकता. वृद्धावस्थेत आर्थिक स्वावलंबी असणे अधिक महत्त्वाचे, तसेच सुरक्षितपणाचे आहे. 

बेजबाबदार पत्नीला सांभाळणे अशक्य
लग्न होऊन १५ महिने झाले आहेत. परंतु, बायको आमच्या घरी जेमतेम एकूण २-३ महिनेच राहिली. अचानक चिडणे, घर सोडणे असे चालूच आहे. माझे आईवडील अथवा माझ्याशी शुल्लक कारणावरून भांडणे झाली की माहेरी निघून जायचे. महिना-महिना तेथेच राहायचे. तिच्या आईवडिलांसोबत यावर मीटिंग घेतली. त्या वेळी त्यांनी तिचा स्वभाव हट्टी आहे, चिडखोर आहे हे मान्य केले. तुम्ही समजावून घ्या, असे म्हणाले. परंतु तिला आमच्यासमोर कधीही समजावून सांगितले नाही की, तिचे वागणे चुकीचे आहे. काही वेळेस माझ्याच आईवडिलांची उलट तपासणी केल्यासारखे तुम्ही तिला असे बोलला का? असे फोनवरून विचारतात. बायकोच्या वागण्यामुळे आम्हा तिघांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. मला अशी बेजबाबदार बायको आयुष्यभर सांभाळणे शक्‍य नाही. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काय करावे? 

जोडीदार निवडण्यासाठी कोणताही फॉर्म्युला तयार करणे शक्‍य नाही. विविधता आणि अपूर्णता हीच मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. शिवाय अनुभव व काळानुसार माणूस बदलतही जातो. कोणत्याही अवघड परिस्थितीत किमान एका जोडीदाराने माझे वैवाहिक जीवन सुखी करणारच अशी जिद्द बाळगली तरच विवाह सुकर होऊ शकतो. अर्थातच वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आदर, तडजोड, प्रामाणिकपणा, विश्‍वास व जबाबदारी घेण्याची तयारी किमान असावी लागते. तुमच्या पत्नीला नेमक्‍या कोणत्या गोष्टीमध्ये तडजोड करणे अवघड जाते. दैनंदिन सवयी, कामाची पद्धत, राहणे, वागणे, बोलणे यातील तफावत यातून अडचणी निर्माण होऊन माहेरी निघून जाण्याचे प्रमाण जास्त आहे का? हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर तिच्या स्वभावाची अधिक ओळख होऊ शकते. एक जोडीदार बेजबाबदार वागत असेल तर दुसऱ्या जोडीदारावर अधिक ताण येऊ शकतो. परंतू सहनशीलता यातून मार्ग काढू शकते. अन्यथा तडजोड करणे शक्‍य नसल्यास कायदेशीर मार्गाने विभक्त होण्याचा पर्याय आहेच. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com