राष्ट्रीय महामार्गावर २५ अपघात स्थळे

महामार्ग पोलिसांकडून ब्लॅक स्पॉटचा सर्व्हे; साताऱ्यासह सांगली, कोल्हापुरातील ३० हून अधिक गावांचा समावेश
25 accident sites on national highways Survey of black spots by highway police satara
25 accident sites on national highways Survey of black spots by highway police satara

कऱ्हाड - पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत २५ ठिकाणे अपघातग्रस्त झाली आहेत. महामार्ग पोलिस विभागाने त्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली. शेंद्रे ते पेठनाका ते किणी टोलनाका दरम्यान ३० हून अधिक गावांत २५ पेक्षाही जास्त ब्लॅक स्पॉट असल्याने वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १२५ हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्या अपघातात १०० वर नागरिकांना कायमची दुखापत झाली. मात्र, ब्लॅक स्पॉटवर कायमच्या उपाययोजना करण्याची मागणी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. त्यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह देखभाल-दुरुस्ती विभागही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यातील शेंद्रेपासून सांगली जिल्ह्यातील पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्यापर्यंतचा प्रवास धोक्याचा ठरतो आहे. त्या टप्प्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सहा तर इस्लामपूर व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वांत कमी केवळ प्रत्येकी एक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे. त्यापाठोपाठ उंब्रजला पाच, कऱ्हाड शहर, तालुका, कासेगाव या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी तीन ब्लॅक स्पॉट आहेत.

महामार्ग पोलिसांचा आराखडाही हायवे ऑथॉरिटी दुर्लक्षित करत असल्याने तेथे उपाय राबविले नाहीत. महामार्गावरील दुरुस्ती कामांमुळे सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा स्पष्ट होतो. काम सुरू असताना चुकीचे फलक लावणे, वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्याचे निर्देश असताना त्याचे पालन केले गेलेले नाही. त्यामुळेही अपघात वाढले आहेत. महामार्गावरील पट्ट्यात २२ हून अधिक गावांत उड्डाणपूल आहेत. मात्र, तेथेही खबरदारी घेतलेली नाही.

महामार्गावर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानेही तब्बल २५ अपघात झाले आहेत. मोऱ्या स्वच्छ न केल्याने तेथे कचरा अडकून सेवारस्त्यावर पाणी साचत आहे. किणी टोलनाक्यापर्यंतच्या पट्ट्यात तब्बल ४५ हून अधिक ठिकाणी पाणी साचते आहे. एकाही ठिकाणी उपाययोजना झालेली नाही. किणी व तासवडे टोलनाक्यावर दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्याची सूचना करूनही त्याचे पालन केले नाही. पर्यायाने सरासरी दिवसाआड एका दुचाकीचा तेथे अपघात होतो आहे. महामार्गाच्या या पट्ट्यात ट्रक, वाहन थांबा नाही. त्यामुळे चालक झोपू शकत नाहीत. पर्यायाने वाहनांचे अपघात होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com