कोरोनाच्या खात्म्यासाठी सातारा जिल्ह्याला तब्बल 40 कोटी; चाचण्या वाढविण्याची तयारी सुरु

कोरोनाच्या खात्म्यासाठी सातारा जिल्ह्याला तब्बल 40 कोटी; चाचण्या वाढविण्याची तयारी सुरु
Updated on

सातारा : कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत असून, मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. पण, आगामी काळात पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोकाही वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला 40 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांत निधी उपलब्ध झाला होता. तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला निधीची लॉटरी लागली आहे. आगामी काळात संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. 

कोरोना निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तब्बल 89 कोटी रुपयांची मागणी केली होती. सप्टेंबरमध्ये कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने उपाययोजना कमी पडल्या. परिणामी, मृत्यूचे प्रमाण वाढले. आतापर्यंत जिल्ह्यात दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मृत्यूचा दर कमी करण्यासोबतच कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांवर भर दिला. त्यासाठी लागणारा निधी राज्य व केंद्र शासनाकडून मिळण्यासाठी मागणी केली होती. आतापर्यंत केवळ राज्य शासनाकडूनच जिल्ह्याला निधी उपलब्ध झालेला आहे. केंद्राकडून अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. 

राज्य शासनाने तीन टप्प्यांत निधी उपलब्ध केला आहे. पहिल्या टप्प्यात पाच कोटी, दुसऱ्या टप्प्यात 15 कोटी आणि आता तिसऱ्या टप्प्यात 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून आता कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसह इंजेक्‍शन, औषधे, पीपीई किट, ऑक्‍सिजनची उपलब्धता आणि सर्वेक्षणावर खर्च केला जाणार आहे. यामध्ये एक तारखेपासून पुन्हा कोरोना चाचण्या वाढविण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे. चाचण्या वाढविल्यास पुन्हा कोरोनाबाधित सापडण्याचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन त्या प्रमाणात आगामी उपाययोजना करून ठेवणार आहे. त्यासाठी मिळालेला हा 40 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी कोरोना केअर सेंटरचीही उभारणी केली जाणार आहे. सध्या संसर्गाचा वेग मंदावला असला तर मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या तातडीच्या उपाययोजनाही जिल्हा प्रशासनाला कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काळात पुन्हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व त्या सुरक्षितता व जागृतीबाबतच्या उपाययोजनांवरही भर द्यावा लागणार आहे. 

आगामी दोन महिन्यांत पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. हे ओळखून आम्ही कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविणार आहोत. त्यामध्ये निकट सहवासीत आणि सौम्य, लक्षणे विरहित व्यक्तींच्याही चाचण्या करण्यावर भर देणार आहोत. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखता येईल. बाधितांना तातडीने उपचार मिळून ते बरे होतील.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com