साताऱ्यात स्वाभिमानीचा 'आक्रोश'; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

साताऱ्यात स्वाभिमानीचा 'आक्रोश'; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा
Updated on

सातारा : पोलिसांचा फौजफाटा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रीघ यामुळे पोवईनाक्‍यावर आज सकाळपासून तणावाचे वातावरण होते. स्वामिभानीचा कऱ्हाडला जाणारा आक्रोश मोर्चा कोणत्याही परिस्थीतीत रोखण्यासाठी गोपनीय पोलिस व अधिकाऱ्यांचीही धावपळही सुरू होती. आंदोलनासाठी साताऱ्यात आलेल्या राजू शेट्टींनाही रजतांद्री हॉटेलवरच पोलिसांनी रोखले. सकाळपासून पोलिसांची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर चाललेली पोलिसांची शिष्टाई प्रशासनाने राजू शेट्टींना दिलेल्या आश्‍वासनानंतर अखेरीस फळाला आली. स्वभिमानीच्या मोर्चाला स्थगिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच सतर्क असलेल्या जिल्हा पोलिस दलाले सुस्कारा सोडला. 

उसाला एकरकमी एफआरपी जाहीर करावी, हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना 200 रुपये द्यावेत, लॉकडाउन काळात आलेली वाढीव वीज बिले माफ करावीत, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सातारा ते कऱ्हाड पायी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात आज पोवईनाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होणार होती. आंदोलानच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला होता. दहा वाजल्यापासून आंदोलनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमू लागले होते. त्यामुळे पोलिसांच्यावरील ताण वाढू लागला होता. आंदोलन थांबावे यासाठी पोलिसांची मोर्चे बांधणी सुरू होती. गोपनिय विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. परंतु, मार्ग निघत नव्हता. 

कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. त्यांना राजू शेट्टींची प्रतीक्षा होती. परंतु, साताऱ्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोवईनाका येथील हॉटेलमधील एका खोलीत नेले. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी आगोदरच उपस्थित होते. कमराबंद खोलीत पोलिस अधिकारी, शेट्टी यांच्यात आंदोलनाच्या स्थगितीबाबत शिष्टाई सुरु होती. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फौजदारी शाखेचा एक कर्मचारी फौजदारी नायब तहसिलदार ए. ए. भुसे यांच्या सहीचे पत्र घेवून हॉटेलमध्ये दाखल झाला. त्याने सदर पत्र शेट्टी यांना दिले. सध्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता सुरु आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे मोर्चा रद्द करावा अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली होती. या पत्रावर पोलिस अधिकारी व शेट्टी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर अर्ध्यातासाने शेट्टी हॉटेलमधून बाहेर पडले. 

त्यानंतर त्यांनी आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाची विनंती सांगितली. या वेळी तुम्ही घ्याल तो निर्णय अखेरचा असे सांगत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्या भूमिकेस पाठिंबा दर्शविला. बाहेर आल्यानंतर शेट्टी व इतर पदाधिकाऱ्यांनी पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अभिवादनानंतर ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर राजू शेट्ठी यांनी आक्रोश मोर्चा स्थगित केल्याची घोषणा केली. त्यामुळे सातारा ते कऱ्हाडपर्यंत सकाळपासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुस्कारा सोडला. 

गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलकांची धडक

पायी आक्रोश मोर्चाचा एक भाग म्हणून स्वाभिमानीच्या वतीने ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार काही आंदोलन निवेदन घेवून ना. देसाई यांच्या निवासस्थानी गेले, मात्र त्याठिकाणी ना. देसाई हे उपस्थित नव्हते. कार्यालयात तसेच निवासस्थानी कोणीही नसल्याने आंदोलकांनी पुन्हा पोवईनाका गाठला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com