
ओगलेवाडी (जि. सातारा) : सामान्यांचे खाणे असलेली कांदा-लसूण चटणी तयार करण्याचा खर्च सध्या दीडपटीने वाढल्याने खर्चाचा आर्थिक मेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. बाजारात लाल मिरचीचे भाव किलोला 200 ते 300 रुपये झाले आहेत. आतापर्यंतचा मिरचीचा हा विक्रमी भाव आहे.
दिवाळी महिन्यावर आल्याने ग्रामीण भागात चटणी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी साधारण उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये घरगुती चटणी तयार केली जाते. परंतु, कोरोना संकटाच्या टाळेबंदीमुळे चटणी तयार करणे अशक्य झाले होते. त्यामुळे सध्या महिलावर्ग चटणी तयार करण्याच्या कामात मग्न दिसत आहेत. पाऊसही ओसरला असल्यामुळे मिरची उन्हात वाळविणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागात विकतची चटणी करण्याऐवजी ठसक्याची व कटाची घरगुती चटणी तयार करण्यावर महिलांचा अधिक भर असतो. बाजारात बेडगी मिरचीचा किलोचा भाव 280 ते 300, लवंगी मिरची 170 ते 200 व गुंटूर मिरचीचा भाव 170 ते 180 रुपये झाला आहे.
पावसामुळे मिरची उत्पादनावर झालेला विपरित परिणाम व मागणीच्या मानाने आवक कमी असल्याने मिरचीच्या भावात वाढ झाल्याचे येथील व्यापारी परेश व नरेश शहा यांनी सांगितले. लवंग, दालचिनी, मिरे व जिरे यांच्या भावातही अल्प वाढ झाली आहे, तर वाटी खोबऱ्याचा किलोचा भाव 165-180 रुपयांपर्यंत वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. चटणीला लागणाऱ्या कांद्याच्या भाव 40 ते 50 रुपये, पलसोडाचा भाव 120 रुपये किलो झाला आहे. तसेच मिरची कांडप मजुरीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे कांदा-लसूण चटणी तयार करण्याच्या खर्चात मोठी आर्थिक वाढ झाल्याने महिलांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागत असून, त्या त्रस्त झाल्या आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.