नागरिकांनो, एसीबीला करा फक्त कॉल

लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाचे पाऊल
ashok shirke acb
ashok shirke acbsakal media

सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नागरिकांचा विश्वास वाढू लागला असून, या गुन्ह्यांत शिक्षा लागण्याचा आलेख उंचावत आहे. तक्रारदारांनी फक्त कॉल केल्यास एसीबी तक्रारदारापर्यंत पोचत आहे. लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

प्रश्न : जिल्ह्यात लाचखोरांविरुद्ध तक्रारींचे प्रमाण व शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. त्याची कारणे काय?

शिर्के : जिल्ह्यात लाचखोरांविरुद्ध तक्रारींचे प्रमाण वाढू लागले असून, नागरिक धाडसाने पुढे येत आहेत. कोरोनामुळे तक्रारींचे प्रमाण काही प्रमाणात कमी होते. शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. न्यायालयात एखाद्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असेल तर त्या प्रकरणातील तक्रारदार, साक्षीदार, पंच आदींनी साक्ष फिरवू नये, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. तक्रारदारांना मार्गदर्शन केले जाते. यामध्ये सरकारी वकिलांचे योगदान मोठे आहे. यामुळे दाखल गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण चांगले आहे.

प्रश्न : तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यामागचा हेतू काय ?

शिर्के : लाचखोरांविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. तक्रारदाराला कोणताही त्रास होऊ नये आणि या प्रकरणात त्याच्यावर कोणताही दबाव येऊ नये, यासाठी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. एखाद्या अधिकाऱ्याकडे तक्रारदार तक्रार घेऊन आला, तर संबंधित अधिकारी कारवाई होईपर्यंत गोपनीयता पाळतो. यामुळे या तक्रारीविषयी इतर कोणाला माहिती नसते.

प्रश्न : जिल्ह्यात लाचखोरीत कोणता विभाग आघाडीवर आहे?

शिर्के : गेल्या काही वर्षांत महसूल आणि पोलिस विभाग लाचखोरीत आघाडीवर असल्याचे समोर आले असून, त्यापाठोपाठ नगरविकास, वन असे इतर विभागही लाचखोरीत पुढे आहेत. अशा कार्यालयांमधील लाचखोरी रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून, हे पथक तेथे गुप्त भेटी देतात.

प्रश्न : नागरिकांनी पुढे यावे, यासाठी काय योजना करता?

शिर्के : अनेकदा तक्रार कुठे आणि कशी करावी, याविषयी अनेक नागरिकांना फारशी माहिती नसते. यामुळे असे नागरिक तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, या नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे म्हणून दर वर्षी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रबोधन करण्यात येते.

तक्रारीसाठी साधा संपर्क

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. १०६४ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह ०२१६२ - २३८१३९ येथे संपर्क साधावा, तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता, असे उपअधीक्षक शिर्के यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com