
वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर तीन महिन्यांपासून वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या पाचवड उपबाजार आवारातील दर मंगळवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असून, पर्यायाने शेतकरी व व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. बाजार समितीचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, मंगळवारपासून (ता. नऊ) बाजार समितीने हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाचवड येथील जनावरांचा बाजार सातारा जिल्ह्यात सर्वांत मोठा मानला जातो. या बाजारात सातारा, सांगली, बारामती, पुणे या भागातील शेतकरी व व्यापारी विविध प्रकारची 250 ते 300 खिलार आणि जातिवंत जनावरे दरवेळी विक्रीसाठी घेऊन येतात. कर्नाटकातील जातिवंत बैलांचा समावेश असतो. अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांची जनावरांच्या खरेदी व विक्रीची उलाढाल प्रत्येक बाजारात होत असते. मात्र, आज संपूर्ण जगावर कोरोना विषाणूमुळे महामारीचे मोठे संकट कोसळले. त्यामुळे या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात 21 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाने लॉकडाउन लागू करून संचारबंदी जारी केली आणि बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे 17 मार्च 20 रोजी भरलेला पाचवड येथील जनावरांचा बाजार अखेरचा ठरला.
मागील अडीच-तीन महिने जनावरांचा हा बाजार बंद आहे. त्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेला शेतकरी आणि व्यापारी वर्ग अडचणीत आला असून, बाजार समितीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. नुकतीच राज्य शासनाने लॉकडाउनच्या नियमामध्ये शिथिलता आणून काही अटी व शर्तीवर बाजार सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू होत असून, ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या आणि पेरणीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या मशागती व पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बैलाची व इतर जनावरांची गरज भासते. अशा परिस्थितीत जनावरांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल मोठी होते. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने पाचवड येथील जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याची नोंद शेतकरी व व्यापारी यांनी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दीपक बाबर व सचिव राजेंद्र कदम यांनी केले आहे.
""जनावरांच्या बाजारासाठी येताना शेतकरी व व्यापारी बंधूंनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या अटी, शर्तींनुसार तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवून जनावरांची खरेदी-विक्री करून स्वतःच्या आरोग्याची दक्षता घेऊन बाजार समितीस सहकार्य करावे.''
-लक्ष्मणराव पिसाळ, सभापती, वाई शेती उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.