उंब्रज (जि. सातारा) : अवकाळी पावसाने उंब्रजसह परिसरातील ऊस बागायतदार हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीन, भुईमूग, भातासह उसाचे अतोनात नुकसान झाले असून ऊस भुईसपाट झाला आहे. त्यातच कोरोना संकट, ऊस तोडणी कामगार तसेच अवकाळी पावसामुळे ऊसतोड लांबणीवर गेली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामाची सर्व तयारी केली आहे. येथील काही खासगी कारखान्यांनी लवकर बॉयलर पेटवून ऊस तोडणीसाठी सज्ज झाले आहेत. परंतु, अवकाळी पावसाने दुष्काळीसह ऊस पट्ट्यातही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तोडणी कार्यक्रम लांबणीवर टाकण्याशिवाय कारखान्यांपुढे पर्याय उरलेला नाही. उंब्रजसह परिसरात कार्यक्षेत्रात दोन साखर कारखाने असून एक सहकारी, तर दुसरा खासगी कारखाना आहे. बाहेरील अनेक कारखाने परिसरातील ऊस तोडणी करून नेतात.
गेल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात जो हाहाकार उडवून दिला, त्यामुळे खरीप पिकासह उसाचे मोठे नुकसान झाले. यंदा गाळपास जाणारा ऊस अतिपाणी आणि वाऱ्याने पूर्णपणे आडवा झाला आहे. त्यामुळे ऊसतोडणी 15 ते 25 दिवस लांबणीवर गेली आहे. कोरोनाची परिस्थितीत ऊस मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करून साखर आयुक्तांच्या सूचनांनुसार कारखाना प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. ऊस तोडणी लांबल्याने व ऊस पडल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.